गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

'उन्मादीन' स्वातंत्र्य !

                                       'उन्मादीन' स्वातंत्र्य !

              'नेमिची येतो स्वातंत्र्यदिन' याप्रमाणे वर्ष मोजत आयुष्य ढकलणारे आपण एका परकिय देशाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या दिवसाचे औपचारिक कोडकौतुक सोहळ्यापुरते मर्यादित झालो आहोत. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय ह्याचा कधी शोध न घेता केवळ मुक्तपणा तोहि सोयीस्कर उधळत जगण्याला आपले स्वातंत्र्य समजत त्याची पाठराखण करण्यातच आपण धन्यता मानतो आहोत.प्रत्येक गोष्ट करताना काही नियम आवश्यक असतात आणि ते काय करावे व काय करू नये यास्वरूपाचे असतात. या नियमांची आवश्यकता ही ती गोष्ट व्यवस्थित पुर्णत्वाकडे नेण्याबरोबरच त्यामुळे कोणतेही वैयक्तिक अथवा सामाजिक दुष्परिणाम होऊ नयेत याकरिता गरजेची असते. आजकाल नियम न पाळणे हे भुषणावह ,कोणीतरी 'व्ही.आय. पी.' असण्याचा परवाना अशाप्रकारची मानसिकता समाजात रूजलेली आहे. नियम हे दुसऱ्याने पाळावयाचे,त्यांनी ते नाही पाळले तर ते कसे मुर्ख आहेत असे दुसऱ्याला सांगताना स्वतःच्या नियम न पाळण्याचा वृत्तीचे लंगडे समर्थन करित आजच्या जगात असेच वागावे लागते नाहीतर माणसं आपल्याला नेभळट समजतात अशी पुस्ती जोडतात.अशाप्रकारे नियमबाह्य वागण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपत स्वतःचे योगदान न तपासता 'आपला देश नां,कधी सुधारणार नाहीं 'असा  कळकळीचा सुर आळवतात.
      माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात स्वतःला अडकवून स्पर्धात्मक युगाच्या नावाखाली सर्व गोष्टींचा अगदी भावनांपासून व्यवहारापर्यंत ते विकासापासून प्रगतीपर्यंत बाजार मांडला जातोय. कुठलीही शिस्त, धरबंद न मानता, प्रचार व प्रसार या तत्वाचा वापर करीत प्रत्येकाच्या डोक्यात तो भिनत चाललाय. लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी शेखी मिरवणारे व बहुतांशपणे गैरफायदा घेणारे पत्रकारिता माध्यम या सगळ्यावर कढ़ी करते आहे. कोणतीही बातमी सर्वात आधी आम्ही दाखवली अशी स्वस्तुती करत स्वत:चीच पाठ थोपटण्याचा अगोचरपणा व्यवसाय युक्ति म्हणत उघडपणाने केला जातो तर एखादी बातमी नैतिकतेसाठी आम्ही कशी दाखवली नाही असे वारंवार सांगून चोरट्या तात्विकतेचे प्रदर्शन देखिल मांडले जाते.
      नुकत्याच झालेल्या याकूब या बॉम्बस्फोट प्रकरणातील सिध्द गुन्हेगाराच्या फाशीचा सरकारने स्वत:च्या धोरणीपणाची पाठ थोपटत सार्वजनिकरित्या जाहिर केलेला दिवस तर समांतर न्यायालय चालवणारे स्वयंसिद्ध कायदेपंडितांपासून हिट अँण्ङ रन करणारा तारा तसेच तथाकथित सन्माननीय बुद्धिवंत चेहरे यानीं मानवतावादाच्या नावाखाली फाशीला विरोध करीत बडवलेला उर व या सर्वांच्याही एक पाऊल पुढे माईक नावाचे अस्त्र व कँमेरारूपी शस्त्र परजत एखाद्या ऐतिहासिक प्रसंगाचे इत्यंभूत सादरीकरण करण्यासाठी आतूर झालेले माध्यमवीर यांनी याकूबला फाशी देण्या अगोदर त्याने काय काय केले याची क्रमवार माहिती तो कधी उठला, त्याने आंघोळ केव्हा केली, कोणता नाष्टा केला असले फालतू व नसत्या उठाठेवी करीत त्याच्या फाशी नंतर त्याच्या नातेवाईकांचा अशा परिस्थितीत पिच्छा पुरवून त्यांचे 'बाईट्स' घेण्याचा किळसवाणा प्रकार करीत तसेच त्याच्या अंत्यविधीचा दफनभूमीतूनच थेट प्रक्षेपणाचा घातलेला घाट (सुदैवाने सरकारने वेळीच हस्तक्षेप करीत तो  थांबविला). या सर्वांचा 'तमाशा' आपल्या देशा बरोबर सर्व जगाने पाहिला. परंतु या सर्वाचे आपल्या देशावर होणाऱ्या दुष्परिणामांचा व त्या बरोबरच ईतर देश आपल्याकडे कोणत्या विचाराने पाहतात या बाबींचा गांभीर्याने विचार केला जातोय का ? जर आतंकवादी गुन्हेगाराच्या अत्यंयात्रेला गर्दी होत असेल अन् त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागत असेल तर देशात पडणारी ही उभी फूट हे सुदृढ लोकशाही व्यवस्थेचे फार मोठे अपयश आहे. मग केवळ असल्या उठवळ माध्यम स्वातंत्र्याच्या आपण गप्पा मारणार असु तर ते उज्ज्वल भविष्यासाठी दुर्दैवच ठरेल.
     तुम्ही कोठेही जाऊ नका बातम्यांचा ओघ असाच सुरु राहील असे अवाहन करणाऱ्या वृत्त वाहिन्या केवळ नैतिक सोपस्कर पार पाडण्यापुरत्या थोड्याफार चांगल्या बातम्या दाखवितात व ईतर वेळी २४*७ त्याच त्याच बातम्यांचा भडिमार करीत असतात. स्वतःच्या मर्यादा विसरुन, समाजाला जागृत करत दिशा देण्याऐवजी नुसत्या बातम्यांचा रतीब घालत या देशाला दिशाहीन भरकटवतायत असे मला वाटते.
      फोनपुरते स्मार्ट झालेल्यांचे एखादी अनैसर्गिक अथवा विपरीत घटना घडली की ती सावरण्यासाठी हात उठण्याऐवजी कँमेऱ्यात ती गोष्ट कैद करण्यासाठी ते उंचावतात हे दाहक वास्तव आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर कलामसरांच्या जाण्याने  श्रद्धाजंलीच्या  सहानुभूतीची लाट निर्माण करणारे त्यांच्या दूरदृष्टिचा मार्ग न स्विकारता तिथेच विरून जाणार असतील व याकूबला फाशीच्या बाजूने बोलणारा देशप्रेमी परंतु त्याविरूद्ध बोलणारा हा मात्र देशद्रोही असे विवेकशुन्य सरधोपट मार्ग स्विकारत असतील तसेच केवळ लाईक अन् फॉरवर्ड यामधील बंदिस्तपणा खऱ्या विचारांना स्वातंत्र्य देणार नसेल तर असे कितीही स्वातंत्र्यदिन खर्ची पडले तरी आपण स्वातंत्र्यदृष्ट्या प्रगल्भ होणार नाही.
      सर्वात मोठी लोकशाही असलेला देश बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे स्वातंत्र्य नैतिकदृष्ट्या अबाधित राहण्याकरिता नियमांचे काटेकोर कुंपण घालत संविधानाच्या चौकटीत बसविले आहे परंतु ही कुंपणेच आता शेतं खाऊ लागली आहेत. तेव्हा अशा अतिरेकी स्वातंत्र्याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही.
     ज्याप्रमाणे एखादा गर्दुल्या खोट्या धुंद वातावरणात जगतो परंतु ती धुंदी त्याचे आयुष्य आतुन पोखरत त्याला एका निरर्थक शेवटाकडे ढकलत असते. त्याप्रमाणे असले बेलगाम स्वातंत्र्य आपल्याला नकळतपणे उताविळ बनवत मानसिक व आर्थिक दृष्ट्या कॉर्पोरेट गुलामगिरीत ढकलत आहे.
नेहमीप्रमाणे १५ अॉगस्ट निमीत्त देशप्रेमाचे भरते येईलच. स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना स्वातंत्र्याचा हा उन्माद सारासार विवेकाला निशब्द करीत त्याला खऱ्या अर्थाने दीन बनवेल. ही आशंका खोटी ठरो व लोकांना सुबुद्घी मिळो हीच स्वातंत्र्यदिनी सदिच्छा !
                   नैतिक स्वातंत्र्य चिरायु राहो !
                             
                                                                                              संदिप महामूनी 
                                                                                             ९६३७१३०२०६         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा