दादरी ते युनो व्हाया .....' अकलाख '
उत्तरप्रदेशातील 'दादरी' या गावात 'मोहम्मद अकलाख' यांचा घरामधे गोमांसाचा साठा करतात व ते खातात या अफवेवर विसंबून संतप्त जमावाने खून केला अन् धर्मनिरपेक्ष लोकशाहीला गालबोट लागले. मानवाचा आहार हा नेहमीच त्या त्या भौगोलिक वातावरणाला उपयुक्त तसेच त्याची उपलब्धता यावर अवलंबून असतो. अर्थात दळणवळणाची सोय झाल्यामुळे कुठलाही पदार्थ कोणत्याही ऋतुत कुठेही उपलब्ध होत असला तरी नैसर्गिकपणे जे मिळते त्यावर बहुसंख्यकांची भिस्त असते. पुर्वीपासून समुहानी राहत असलेला मनुष्य हा त्या त्या आहाराला महत्व देत त्याचा समावेश त्यांच्या विशिष्ट चालीरीती व परंपरांशी निगडित ठेवू लागला. मग त्यातूनच पुढे खाण्यापिण्यावरून जाती-धर्माचे वर्गीकरण होऊ लागले. ढोबळमानाने शाकाहार, मांसाहार तसेच मिश्र आहार असे देखिल विभागणी आपण करू शकतो. त्यात शाकाहार श्रेष्ठ, मांसाहार निषिद्ध असे जे मांडले जाते तो देखिल गैरसमज आहे. त्याला देखिल भुगोल व उपलब्धता याची किनार असते. सर्वजण शाकाहारी झाले तर त्यांच्यासाठी लागणारे अन्नधान्य,भाजीपाल्याचा पुरवठा शेतकरी करू शकतो का? आधीच निसर्गाचा लहरीपणा व त्यामुळे उद्भवणाऱ्या त्याच्या कहरतेचा अनुभव पाहता ते अशक्य आहे त्यात भर म्हणून अती किटकनाशकांचा वापर तसेच भेसळीचा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा होय. अन् जर मांसभक्षणासाठी वापरणारे प्राणी तसेच भाकड जनावरांची संख्या बेसुमार वाढली तसेच त्यांच्या चारापाणीची कमतरता यामुळे असमतोल निर्माण होईल त्याच काय.
मनुष्य ज्या धर्मात, संस्कृतीत जन्म घेतो वाढतो त्यामुळे त्याच्या सुप्त मेंदूवर ते ठसले जाते, हे जरी नैसर्गिक असले तरी अनेक वर्षांच्या स्थित्यंतरानंतर शिक्षित झालेल्या मनुष्याला इतर जणांचे सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीत खाणे, पिणे, राहणे असु शकते तसेच नानाविध जात धर्म असलेल्या ठिकाणी त्यांचे त्यांचे स्वातंत्र्य हक्क अबाधित राखणे हे अपेक्षित आहे. हिंदू धर्मात गाय या प्राण्याला मातेचा दर्जा दिला आहे.तसेच वर्षोंवर्षांच्या संस्कारांमुळे तो भावनेशी निगडीत प्रश्न बनला आहे तसेच मुस्लिम धर्मामधे डुक्कर हा प्राणी निषिद्ध मानला जातो.त्यामुळेच भावनेला भडकावण्यासाठी ह्याचा चपखल वापर इंग्रजांच्या १८५७ च्या बंडानंतर निदर्शनास आला आणि संघटित शक्तिचा धोका ओळखत त्यानंतर आपल्या देशावर राज्य करताना 'फोडा अन् राज्य करा ' हे धोरण राबवित दंगली घडवून व देश सोडून जाताना भारत-पाकिस्तान अशी फाळणी करून आपल्याला स्वातंत्र्याबरोबरच धर्म द्वेषाची ठसठसणारी जखम सुद्धा दिली. दुर्दैव म्हणजे आपल्या देशातील राजकारण्यांनी त्याचा गैरवापर करीत इंग्रजांचाच कित्ता गिरवला व जात धर्मांच्या विषयांवर आज देखिल त्यांचा तोच उद्योग चालू आहे. आपण कितीही शिक्षित झालो तरी समस्यांचे मुळ समजून घ्यायच्या ज्ञानाचा अभाव आपली कुत्तरओढ करतो आहे. नुकतेच महाराष्ट्रात काँग्रेसने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध म्हणून बैलगाडी अंदोलन केले तेव्हा बैलगाडीत चक्क १५ते१६ नेते मंडळी बसली होती.अन् त्यांच्या ओझ्याने बैलं पुरती बेजार झाली होती. ते पाहता ही नेते मंडळी एखादे प्रतिकात्मक अंदोलन करताना पशूंच्या आरोग्यापेक्षा स्वत: च्या चमकोगिरीला अधिक महत्व देतात परत हीच मंडळी पशुधनाच्या बाता टिव्ही समोर करीत राहतात. त्यामुळे जनता ही रूग्णवाहिकेतील अत्यवस्थ पेशंट सारखी असुन तिला लवकरात लवकर उपचारार्थ पोहचवण्या ऐवजी त्यालाच वाऱ्यावर ठेवित रूग्णवाहिकेच्या ड्रायव्हर व रूग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या पोटाचाच विचार करीत ढाब्यावर ताव मारणाऱ्या कर्तव्यशुन्य वृत्तीचेच हे नेते पाईक बनलेत ही शोकांतिका आहे.
वरील घटनेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूने येत असताना आझम खान या मुखंड नेत्याने मुस्लिमतेचा वापर करीत देशातील मुस्लिमांवर होणाऱ्या अन्याय बाबत तसेच आर. एस. एस. चा हिंदू राष्ट्र बनवण्याकडे असलेला कल व त्या विचारांचेच विद्यमान सरकार या आशयाचे पत्र युनोला लिहण्याचे पत्रकार परिषदेत अभिमानाने सांगितले. परंतु यातून देशाच्या इभ्रतीचा आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर पंचनामा करून सगळेच मुसळ केरात घालण्याचा उपटसुंभपणा त्यांनी केला आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीर मधील अपक्ष विधायक शेख अब्दुल रशीद यांनी विधानभवन परिसरातच गोमांस पार्टी ठेवली त्याचा परिणाम विधानसभेत गोमांस बंदी साठीचे विधेयक मांडताना हाणामारीत झाले. मुस्लिम लोकांवर होणाऱ्या अन्यायाचे कुठलेही समर्थन होऊ शकत नाही तसेच केंद्रातील सरकार हे आपलेच असल्याचा उद्दामपणा करत कोणत्याही उजव्या संस्थानी धुमाकूळ घालणे हे धर्मनिरपेक्ष लोकशाहीला धोक्याचे आहे. विशेष म्हणजे ज्या विकास या मुद्यावर सध्याचे सरकार निवडून आले त्याचे प्रमुख पंतप्रधान हे सोयीस्कर मौन बाळगत आहेत हे अधिकच धोकादायक आहे. मन की बातच्या माध्यमातून एकतर्फी स्वतःला हवा तो विषय लोकांना सांगून जनतेशी खऱ्या अर्थाने संवाद साधू शकत नाही. या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांच्या मनात नेमके काय आहे हे देखिल आपल्याला कळले पाहिजे. न बोलणे म्हणजे मुकसंमती हाच अर्थ त्यातून स्वाभाविकपणे निघेल. अन् पंतप्रधानांनी या महत्वपूर्ण मुद्याकडे दुर्लक्ष केले तर पुढे येणाऱ्या संकटाला देखिल सर्वस्वी तेच जबाबदार असतील.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा ही इतर देशांना उपयुक्त अशी बाजरपेठ व त्यास अनुकूल वातावरण अशी करीत फिरणारे पंतप्रधान यांनी जेव्हा युनो मधे भाषण केले तेव्हा त्यांनी आतंकवाद या विषयावर जोर देत सगळ्या देशांनी त्या विरोधात एकत्र येऊन दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे या आशयाचे भाषण केले परंतू जर आपल्याच देशात उभी फुट पडण्यासारखी परिस्थिती व त्यास अनुकूल वातावरण दिसत असताना तसेच ती फुट पाडण्यासाठी त्यांचेच समर्थक अग्रभागी असतील तसेच अकलाख च्या निमित्ताने दादरी सारखा विषयात पंतप्रधानांनी बाळगलेले मौन त्याच युनोमधे त्यांचा दुतोंडीपणा जगासमोर उघड करेल.संयमासाठी अनुसरलेले मौन संयुक्तीक असते परंतू देशाच्या उज्वल भविष्याला खोडा घालणाऱ्या संवेदनशील प्रसंगात तेच मौन हे उपरोधिक ठरू शकते.तेव्हा दादरी ते युनो व्हाया अकलाख ह्या प्रवासाचे गांभिर्य वेळीच ओळखून पंतप्रधानांनी ते त्यांच्या बोलण्यातून व कृतीतून दाखवावे अशीच प्रत्येक धर्मनिरपेक्ष देशप्रेमी व्यक्तींची माफक अपेक्षा आहे !
संदिप महामुनी
९६३७१३०२०६