रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

DNA चा झोल अन् डोक्यात केमिकल लोच्या...!

DNA चा झोल अन् डोक्यात केमिकल लोच्या....!

         नुकताच कराड येथील एका राजकीय कार्यक्रमामधे एक वानर सर्व झेड प्लस सुरक्षा व्यवस्था(?)भेदून मंचा समोर जाऊन बसले. व्यासपीठावर नेते मंडळी,खाली वानर. थोडीफार भितीयुक्त मनोरंजन झाले.परंतु माझ्या मनात विचार आला तो म्हणजे वानराला सुद्धा आपल्या उत्क्रांत पिढीतील नेत्यांबद्ल उत्सुकता असावी. मात्र नेत्यांचे साचेबद्ध बोलणं अन् आपणच कसे योग्य तारणहार आहोत ह्या त्यांच्या अर्विभावातून लोकांना गृहित धरून केलेल्या अश्वासनांची भाषणबाजी ऐकून हे अजूनही माकडचेष्टाच करीत आहेत याची जाणीव त्याला झाल्याने काहीशा भ्रमनिराशेने तसेच आपण माकडच राहण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे समाधान मानत ते आले तसे निघून गेले.
          मग मला नुकत्याच बिहार निवडणुकीनंतर शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांचे ' कुणाच्या DNAत मला जाब विचारण्याची हिम्मत आहे 'असे विधान केले होते त्याची आठवण झाली. एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या DNA तच ती असावी लागते असा त्यांचा दावा होता. जाब विचारण्यासाठी तुमच्याकडे ते गुण अंगभूत असावे लागतात नाहीतर न विरोध करता निमुटपणे सहन करत त्याला सहिष्णुतेचे नाव देत आत्मिक समाधान मानत राहणे एवढाच पर्याय शिल्लक राहतो.क्रिया-प्रतिक्रिया हे जरी नैसर्गिक असले तरी लोहा लोहे को काटता है अशा फिल्मी ज्ञाना बरोबरच आगीला आग नव्हे तर पाणीच थांबवू शकते हे सामान्यज्ञान असणे आवश्यक असते. तेव्हा सद्याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता हिंसकपणा प्रचंड वाढला असुन त्याचे मुळ कारण सहनशीलतेची घसरलेली क्षमता अन् त्यामुळेच विचाराने, जीभेने सोडलेली पातळी एखादी परिस्थिती अजूनच बिघडवू शकते. कधी कधी सारखी सारखी केलेल्या बडबडीपेक्षा मौनात त्याचे उत्तर सापडू शकते. शब्दाने शब्द वाढत भांड्याला भांडं लागण्यापेक्षा मौन तुम्हाला आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडतं. तेव्हा देशाला सहिष्णू-असहिष्णूचे लेबल लावत फिरण्यापेक्षा भौतिक विकासाच्या स्पर्धात्मक युगात वैयक्तिक पातळीवर प्रत्येकजण अस्थिर व पर्यायाने आक्रामक झालो आहोत हे प्रामाणिकपणे मान्य केले पाहिजे. केवळ आपापली मते मांडणे म्हणजे स्वातंत्र्य नसून समाज शांत, सुसंस्कृत असणे अधिक गरजेचे आहे. छानछोकी जीवनशैली चे आकर्षण व त्याला पोषक आजुबाजूची साधने यामुळे आपल्या DNA चा झोल झाला असल्याचे लक्षण असुन त्यामुळे आपल्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे.
           एखादा दोष वारंवार दाखवत बसल्याने आपली प्रतिमा तुसडी होण्याची शक्यता अधिक असते. एखादी रेष पुसून कमी करण्यापेक्षा तीच्या शेजारी आणखी मोठी रेष काढून तिचा खुजेपणा दाखविता आला पाहिजे. त्याप्रमाणेच नुसते दोष काढत बसण्यापेक्षा चांगल्या योग्य गोष्टीचा अवलंब तसेच त्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. त्यासाठी जी लोकं समाजासाठी काम करतात, ज्यांचा जनमानसावर प्रभाव असतो अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या वागण्या बोलण्याबाबत अधिक जागरूक असणे महत्वाचे आहे. जीभेला झालेली जखम लवकर बरी होते परंतू जीभेने केलेली जखम लवकर बरी होत नाही.शत प्रतिशत योग्य असे काही असू शकत नाही त्यामुळे काही समाजकंटक लोकं अशा परिस्थितीचा गैरफायदा घेत स्वतःचे भले करण्यात गुंतलेले असतात. मदारी ज्याप्रमाणे माकडाचा वापर करीत खेळ मांडत स्वतःचे पोट भरत असतो त्याप्रमाणेच काही मंडळी आपल्याला माकडाप्रमाणे त्यांच्या तालावर नाचवत स्वतःचा सत्तास्वार्थ साधत असतात.
            गरज आहे ती आपण तटस्थपणे पाहण्याची व स्वतःच स्वतःला सावरण्याची. चांगले व्यक्तिमत्व असण्यासाठी आपल्यातील चांगले अस्तित्व जपले पाहिजे." शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी "या संत तुकारामांच्या उक्ति प्रमाणे आपल्या येणाऱ्या पिढीवर योग्य संस्कार झाले पाहिजेत तरच त्यांच्या DNAतील झोल दुरूस्त होईल व त्यामुळे डोक्यातील केमिकल लोच्या थांबून योग्य वैचारिक मानसिकता प्राप्त होऊन तीचे कृतीत रूपांतर होईल.


संदिप महामुनी
९६३७१३०२०६

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

असहिष्णुतेची बोंबाबोंब......!


                               असहिष्णुतेची बोंबाबोंब......!

                पुरस्कार परत करण्याची साथ आली असून तीचे जे लोण पसरते आहे ते पाहता समाजातील समाजमान्य चौकटीद्वारे सिद्ध झालेले बुद्धिमान व केवळ शासकीय गौरव किंवा पुरस्कार प्राप्त अथवा मिळवलेले मान्यवर कारण पुरस्कार प्राप्तचं पुरस्कार वापसीने निषेध नोंदवू शकतात. अगदी लेखक ते कलाकार, निवृत सैन्याधिकारी ते शास्त्रज्ञ सर्व क्षेत्रातील व्यक्ती कोणीही  त्यास अपवाद नाही. या सर्वांच्या मतानुसार सध्याच्या भारत देशामध्ये अतिशय असुरक्षित वातावरण आहे. सरकार देखिल असहिष्णुपणे वागत सर्वांची मुस्कटदाबी करीत आहे तेव्हा समाजात कमालीची अराजकता माजली असुन सरकारचा अनागोंदी कारभार चालू आहे असे चित्र प्रसार माध्यमातून दाखविले जाते आहे.
               सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. इथेच हिंदू, जैन, बौद्ध धर्माची स्थापना व प्रसार झाला. ज्याचा पाया हाच मुळात सहिष्णुतेवर अवलंबून आहे.  इंग्रजांच्या जुलमी राजवटी नंतर मिळालेल्या स्वातंत्र्यात आपण धर्मनिरपेक्ष, सार्वभौम लोकशाहीचा स्वीकार केला तेंव्हापासून आजपर्यंत अनेक दुर्दैवी घटना घडल्या अगदी फाळणीच्या दंगलीपासून ते बाबरी मस्जिद पाडण्यापर्यंत,काश्मीर पंडितांवरील अन्यायांपासून लादलेल्या आणीबाणीपर्यंत,खलिस्तान ते इंदिरा गांधीच्या हत्येनंतर झालेल्या शिखांच्या शिरकाणापर्यंत,अगदी दलितांवर झालेले अनेक हल्ले महाराष्ट्रातील खैरलांजी ते बिहार मधील घटनेपर्यंत.दाभोळकर,पानसरे यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांपासून कलबुर्गींसारख्या लेखकांपर्यंत अनेकांच्या झालेल्या हत्या तसेच ज्या घटनेमुळे पुरस्कार वापसी सुरू झाली ते गोमांस बंदी ते दादरी अशा सर्वच घटना या निषेधार्यच आहेत त्याबद्दल विवेकवादी विचार करणाऱ्यांच्या मनात कोणतीही शंका नाही.
एवढ्या अफाट लोकसंख्येमधे वेगवेगळ्या जाती-धर्माची,विचारधारेची लोकं इथे राहत असताना आपापल्या जाती-धर्माचे, विचारधारेचे समुह तयार होत आहेत. ते करीत असताना आधुनिक सोशल मीडिया आपल्या हाताशी आहेच. तेव्हा असे गट तट तयार होणे स्वाभाविकच आहे अन् त्याचे उपद्रव मुल्य देखिल लक्षवेधी असते. पन्नास, शंभर जणांनी नुसता रस्त्यावर गोंधळ घातला तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.गुजरातेतील पटेल अंदोलनावेळी असा प्रत्यय आला आहेच. तेव्हा घडणाऱ्या घटनांचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या अत्यल्प असले तरी २४ तास बातम्यांचे रतिब घालणाऱ्या वाहिन्या तसेच अनिर्बंध सोशल मीडियामुळे याची व्याप्ती अनेक पटीने वाढते आहे. वारंवार केलेल्या अधोरेखितपणा मुळे ती बातमी ठळकपणे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबली जाते व सामान्य विचार तशाप्रकारेच व्यापला जातो.
              विद्यमान सरकार मधील सत्ताधारी पक्ष हा मुख्यतः विशिष्ट धर्माच्या विचाराने प्रभावित आहे परंतू ते ज्या परिस्थितीत म्हणजे जनता घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई ने त्रस्त असताना ज्या विकास या मुद्यावर निवडून आले परंतू नेमके तेच विकासाचे चित्र विद्यमान सरकारच्या कार्यशैलीतून परावर्तित होत नसून त्यांच्या मुळ विचारधारेविषयी आक्रामक व राजरोसपणे सरकार मधील लोकप्रतिनिधीच बेताल वक्तव्य करीत असतील व सरकारचे प्रमुखच सोयिस्कर मौन बाळगत असतील तर संपूर्ण सरकारची प्रतिमा मलीन होणार हे देखिल स्वाभाविक आहे. त्यातून राजकारणाला कोणत्याही मुद्याचे वावडे नसल्याने त्याचा सत्ताप्राप्तीसाठी घेतला जाणारा फायदा अनिवार्य आहे. तसेच विद्यमान सरकारनेच सत्ता मिळविताना एखाद्या घटनेचा वा विषयाचा भडिमार करून बेजार करण्याची योजलेली युक्ती व तिची नेटकी प्रसिद्धी यंत्रणा सध्याचे विरोधी पक्ष अवलंबित आहेत. तेव्हा एखादे खोटे शंभरवेळा छातीठोकपणे उगाळले तर ते लोकांना खरे वाटू शकते कारण सध्याच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जगात दुसऱ्याचा विचार करायला व शहानिशा करायला कुणाला वेळच नाहिये, जो तो आपापल्या भौतिक विकासात गुरफटलेला आहे.तस पाहिलं तर त्यामुळेच प्रत्येकजण एक दुसऱ्याशी असहिष्णुपणे वागतो आहे अन् असहिष्णुतेची भाषा करणारे कलाकार स्वतःच्या अहंकाराने नियम पाळताना एखाद्या सुरक्षा रक्षकाशी किती सहिष्णूपणे वागतात तसेच घरापुढे अनाधिकृत रँप बांधून रहदारीला कसा अडथळा करतात हे आपण पाहिले आहेच.व्यापक देशहितासाठी कोणत्या मुद्या भोवती राजकारण केले पाहिजे याचे नैतिक भान सत्ताधारी व विरोधी या दोन्ही पक्षांना असले पाहिजे केवळ आपल्याकडील नेतृत्व गुण व वकिली बुद्धी आपापल्या राजकीय फायद्यासाठी खर्च करीत असतील तर देश दिवाळखोरीत निघायला वेळ लागणार नाही.
जगाचा ईतिहास आपण पाहिला तरी आपापला समुह करणे अन् त्याला विशिष्ट चौकटीत बसवणे, तसेच इतर समुहांवर आक्रमण करणे किंवा आक्रमणला प्रत्युत्तर देणे हे सर्व मानवी जनुकीय वृत्तित आहे.परंतु वैचारिक संस्कारामुळेच आपल्या पेक्षा वेगवेगळ्या आचार, विचारधारांशी सामावून घेणे शक्य आहे. त्यातूनच सहिष्णुता निर्माण होऊ शकते. परंतू ते करीत असताना आजुबाजूचे वातावरण त्याला पोषक पाहिजे जर गोष्टीतील सश्याप्रमाणे पान पडलं म्हणून आभाळ कोसळलं अस समजून बोंबाबोंब केली व त्यातून भिती अन् संशयाचे वातावरण निर्माण झाले तर आधीच अस्थिर समाज जास्तच बिथरेल व त्यातील समाजकंटक टोकाची पाऊले उचलतील त्यातून केवळ अराजकताच माजेल. तसेच माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी आपली प्रतिमा हा तर अजूनच गंभीर प्रश्न आहे.
देशातील प्रत्येकाला अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे तेव्हा देशातील प्रतिभावान, बुद्धिजीवी मंडळींनी संयम दाखवत आपल्या लिखाण, कला, प्रबोधन अशा अनेक माध्यमातून समाजातील व सत्ताधाऱ्यांच्या धोरणातील वैचारिक त्रुटी दाखवल्या पाहिजेत अन् देशाच्या सांस्कृतिक विचारधारेला योग्य दिशेला नेले पाहिजे. केवळ प्रतिकात्मक कृती करून प्रसिद्धी मिळवत राहिली तर जनता रोजचं मडं त्याला कोण रडं याप्रकारे घेतील व त्यातील महत्वाचा गाभा दूर राहिल.केवळ असहिष्णुता असहिष्णुता अशी बोंबाबोंब न करता सहिष्णुपणे त्यातून मार्ग काढला पाहिजे.

चला नैतिक विचारांच्या प्रकाशाने दिपावली उजळून टाकूया !

संदिप महामुनी
९६३७१३०२०६