शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

सत्यापुढे सत्तेचाच शहाणपणा......!

          सत्यापुढे सत्तेचाच शहाणपणा......!

                  'सलमान खान' या एका बॉलीवुड अभिनेत्याची ' हिट अँड रन ' केसमधे  'अपराध कुणी केला?' हा प्रश्न अनुत्तरित ठेवत न्यायालयाने १३ वर्षांनी निर्दोष मुक्तता केल्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यां(भक्तां)चे जीव भांड्यात पडले असतील आता जल्लोष करण्यासाठी उताविळ असणाऱ्यांनी हे लक्षात घेणे अत्यंत जरूरीचे आहे की ही मुक्तता सबळ पुराव्या अभावी झाली आहे तेव्हा ते न्यायालयीन अपयश तसेच व्यवस्थेचा दोष आहे.ज्यांना चिरडले त्यांना असंवेदनशील, मुजोर, सत्ताधिश, धनदांडग्या, पैसा फेकल्यावर उभ्या राहणाऱ्या उच्च शिक्षित वकील ,सरकारी अधिकाऱ्यांच्या फौजा असतील तर खरा न्याय मिळणे किती दुरापस्त आहे.
               या केस मधील मुख्य साक्षीदार तसेच सर्वात प्रथम फिर्याद नोंदवली तो सलमानचा अंगरक्षक रविंद्र पाटील यांनी मृत्युपुर्व सलमान विरोधात जी महत्वपूर्ण साक्ष सत्र न्यायालयात नोंदवली ती मुंबई हायकोर्टाने तो हयात नसल्याने(सलमानच्या सुदैवाने) तसेच काही तांत्रिक कारणास्तव ग्राह्य धरली नाही.तसेच घटनास्थळी उपस्थित कमाल खान याची उलट तपासणी घेतली नाही,गाडीचा टायर अपघातापुर्वी फुटला का नंतर फुटला याविषयीचा तांत्रिक अहवाल योग्य प्रकारे सादर केला नाही,रक्तातील अल्कोहल मात्रा तपासणीसाठी २४ तासापुर्वी न घेतलेले नमूने या व इतर निरक्षणांतून सत्र न्यायालयाचे सर्वच निष्कर्ष चुकीचे ठरवत(!!!) उच्च न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सलमान स्वतः निर्दोष नसुन त्यासाठीचे पुरावे सक्षम नाहीत एवढेच.
              डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानानुसार न्यायदेवतेने उदात्त हेतूने डोळ्यावर पट्टी बांधली असुन शंभर अपराधी सुटले तरी एका सुद्धा निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये हे तत्व अवलंबलेले आहे, तेव्हा सलमान उरलेल्या शंभर पैकी एक असू शकतो ( अर्थात सलमान जर अंर्त:मनाचा आवाज ऐकत असेल तर त्याच्या अंर्त:मनालाच याची शंभर टक्के खात्री देता येइल ) अन् ते देखिल शासकीय कर्तव्य तत्परतेचा लाभधारक असल्यामुळे हेच उच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे.स्वातंत्र्य पुर्व काळात बाबासाहेबांनी मागास वर्गाला उच्च वर्गाकडून ज्या अत्याचार व शोषणाला बळी पडावे लागले त्या विरोधात आवाज उठवत 'शिका,संघटित व्हा व संघर्ष करा' हा मुलमंत्र दिला.६५ वर्षांनंतर आताचा उच्च वर्ग हा केवळ जातीनेच नव्हे तर सत्ता,पैसा, प्रसिद्धी, धनदांडगे यांनी व्यापलेला आहे.तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ केवळ हिरोने चौकड्याचा शर्ट घातला की निळी जीन्स,त्याचे कोणकोणते पै पाहुणे अगत्याने उपस्थित होते, त्याच्या चाहत्यांनी भर उन्हात केलेल्या प्रार्थना कशा कामी आल्या ( आपण साले किती कर्मदरिद्री  त्या चिरडले गेलेल्या निष्पाप जीवांसाठी आपल्या प्रार्थना मात्र कुचकामीच ठरल्या ) सलमानच्या भक्त गणांच्या जल्लोषांचे थेट प्रक्षेपण अशा बातम्यांचा भडिमार करण्यात व्यस्त होत्या.तेव्हा आपण बाबासाहेबांच्या मुलमंत्राचा व्यापक अर्थ घेत नुसत्या नोकऱ्या मिळवण्यापुरत्या डिग्र्या घेण्याला व माहितीला ज्ञान समजण्यास शिकणे न समजता खऱ्या अर्थाने मुलभूत शिक्षण घेतले पाहिजे.अशा सर्वांनी एकी दाखवत संघटित झाले पाहिजे व समाजातील वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी संघर्ष करीत निर्ढावलेल्या व सुस्त व्यवस्थेला ताळ्यावर आणले पाहिजे.
               ' सत्यमेव जयते ' हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे. शेवटी विजय सत्याचाच होतो या आपल्या आशेचा (भोळ्या भाबड्या) व्यवस्थेने विनोद केला असून ' बळी तो कान पिळी ' हीच म्हण जास्त सयुक्तिक ठरवली आहे.सत्तेपुढे सत्याचे शहाणपण चालत नाही एखाद दुसऱ्या महात्माने सत्याचे प्रयोग करून देशाला सत्याचे महत्व थोडेच पटणारे.पोटात पैशाची बकासुरी हव्यास असणाऱ्या बेधुंदाना कोण चिरडल काय कोण मेलं काय.चित्रपटात भावनांचा बाजार मांडणाऱ्यांना व त्यांच्या कृत्रिम प्रतिमेला भावूक होत आपण डोक्यावर घेतो अन्  प्रत्यक्षात हीच मंडळी रस्त्यावर झोपणाऱ्या (अभिजीतच्या भाषेत कुत्र्यांना )गरीबांना चिरडतात तेव्हा आपला मुर्खपणा ठळकपणे अधोरेखित होतो परंतू या सत्यापेक्षा भ्रमाची चंदेरी दुनिया आपणास जास्त प्रिय असते.तरी सुद्धा वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे सांगणाऱ्या आपल्या परंपरेवर विश्वास ठेवत न्यायाच्या प्रतिक्षेत आहोतच....!

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

http://www.sandeepmahamuni.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा