गुरुवार, १७ मार्च, २०१६

सावधान ! काळ सोकावतोय ....

                                              सावधान ! काळ सोकावतोय......

            नुकत्याच चर्चेत असलेल्या बातम्या पाहता देशात नेमकं चाललंय काय हा प्रश्न पडतो. विजय मल्या नावाचा रंगेल उद्योगपती तथा माननीय खासदार देशातील १७ बँकांचे नऊ हजार कोटी कर्ज (ऐकूनच डोकं बोजड होतंय) न चुकवता यंत्रणांच्या नाकावर टिच्चून १३ सुटकेस घेऊन निघून जातो.अन् आपले CBI खाते कोर्टात डिटेंशन एवजी लुक आउट नोटिस काढल्याच्या चुकीची कबुली देत मल्या पळून गेला हे निलाजरेपणे सांगते. तो मात्र लंडन मधून मी पळालो नाही मी काही चुकीचे केले नाही ( कारण माझ्यासारख्या बलाढ्य माणसाने कर्ज घेऊन बँकावर उपकार केले आहेत अन् बँकादेखिल असा असामी कर्जदार लाभल्यामुळे उपकृत झाल्या होत्या असाच त्याचा अविर्भाव आहे ) तसेच मीडियाने मला लक्ष्य न करता मी त्यांच्यावर केलेल्या खैरातीची जाण ठेवा असा उपरोक्त सल्ला देणारी टिव टिव केली.
        रघुराम राजन सारख्या कर्तव्यदक्ष गवर्नरनी कोणत्याही दबावाची तमा न बाळगता सततची कर्जाची फेररचना न करता सर्व खाती व्यवस्थित करण्यासाठी बँकावर लादलेल्या आदेशामुळेच बँकांनी विजय मल्याच्या पाठी तगादा लावला व त्याचेच पर्यवसन त्याच्या पळून जाण्यात झाले.
           दुसरीकडे सरकारी संत श्री श्री ( सामान्यांसारखे एका श्री ने यांची स्तुती पुर्ण होत नाही ) रविशंकर जगाला आर्ट अॉफ लिविंग चे धडे देण्यासाठी एका भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यासाठी यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्रात सपाटीकरण करीत झाडे झुडुपे तोडून तसेच काही ठिकाणी पात्राची दिशा बदलून नैसर्गिक जैवविविधतेचे नुकसान करण्यास कारणीभूत झाले असताना त्या विरोधातील याचिकेची हरित लवादाकडून दखल घेत त्यांना ५ कोटींचा दंड ठोठावला परंतू या आधुनिक संतानी एक छदाम देणार नाही हवे तर अटक करा असा उद्दामपणा दाखवत नविनच कला भक्तगणांना शिकवली परंतू लगेच जमिनीवर येत २५ लाख रू भरत उर्वरित रक्कम हफ्त्याने भरू असे सांगितले. वास्तविक कोणत्याही दंडाने पर्यावरणाचे नुकसान भरून येऊ शकत नाही.शिवाय हरीत लवादाने २५ लाख रू जमा करत उर्वरित रक्कम माफ केल्याचे ऐकिवात आहे तसे असेल तर हरीत लवाद दबावापुढे झुकून काम करीत आहे या शंकेस वाव आहे.तेव्हा 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे सांगणाऱ्या आपल्या पुर्वश्रमीच्या संतांची शिकवण आपण केव्हाच मातीमोल केली असून आधुनिक संतांसारखे भव्य दिव्य ईवेंट साजरे करीत समाजाचे आध्यात्मिक भले करण्याच्या नावाखाली सत्ताधारी मुजोरपणाच बाळगण्याचे जगण्याचे तंत्र मिळवले आहे व त्याचाच उदो उदो करण्याचे काम भक्तगण भक्तिभावाने करतीलच.
        महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सर्वच अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा करीत दंडरूपी महसूल गोळा करण्याचा फंडा तसेच आगामी महापालिका निवडणूक असा दुहेरी उद्येश  साधला आहे. तेव्हा ज्या गोष्टीला चाप बसला पाहिजे त्याचे शुद्धीकरण करण्याचे राजकारणी तंत्र जनतेला मिळत आहे.
            एकिकडे झटपट फुकटात प्रसिद्धि मिळणाऱ्या विद्यार्थी नेत्याकडे देशाचे लक्ष वेधले जात असताना ९३ च्या बॉम्बस्फोटातील एक महत्वपूर्ण आरोपी तब्बल१५ वर्षांनी २००४मधे  मिळालेल्या त्याच्या थोड्याश्या माहिती वरून मुंबई पोलीस युनीट ६ ने त्याला शिताफीने अटक केली परंतू प्रामाणिक पोलिसांना प्रसिद्धी तर सोडाच त्या आरोपीवर CBIने ठेवण्यात आलेले बक्षिस आजअखेर जवळ जवळ १२वर्ष मिळाले नाही शिवाय बक्षिसाच्या रकमेसाठी कायदेशीर पाठपुरावा करण्याची वेळ त्यांच्यावर येत असेल तर एक तपास यंत्रणा दुसऱ्या तपास यंत्रणेच्या कार्यतत्परते बद्दल असंवेदनशील आहे याचेच प्रदर्शन मांडत आहे.
             मग विजय मल्या, आधुनिक संत रविशंकर, राज्याचे सर्वेसर्वा, तपास यंत्रणा सर्वच जण आपापल्या भातावर डाळ ओढण्यात मश्गूल आहेत ' गरज सरो अन् वैद्य मरो ' असेच सुविचार त्यांना अभिप्रेत आहेत.व्यवस्थेत शिरलेली सुस्त व भ्रष्टाचारी मानसिकता व त्याचा पुरेपूर फायदा उचलणारा विजय मल्या वर्ग हे कशाचे द्योतक आहे त्यातून जगातील सर्वाधिक युवा तसेच सोशल मीडियावर एखाद्या घटनेबाबत मनोरंजनापुरते मर्यादित राहणाऱ्या पिढीला कोणता आदर्श मिळतो आहे. "भपकेबाज पणा करून पैसा मिळवा अन् देशाला बुडवून अय्याश जीवन जगा किंवा पर्यावरणाचे, सरकारी नियमांचे हवे तसे उल्लंघन करा नंतर सटर फटर दंड भरून त्या गोष्टी नियमित करून घेत समाजात प्रतिष्ठित पणे मिरवा ."मात्र रघुराम राजन यासारखे केवळ महत्वाकांक्षी व सतशिल न राहता ठाम, न डगमगाता, दबावाला अथवा हितसंबध या गोंडस आमिषाला न बळी पडता कर्त्तव्यतत्पर राहणाऱ्या तसेच १५ वर्ष जुना तपास सुद्धा तेवढ्याच हिरीरीने करणारे उमदे व प्रामाणिक पोलिस कर्मचारी हे आदर्श जरी मोजके असले तरी 'कर्त्तव्यदक्ष राहून देशसेवे साह्य करू अवघे धरू सुपंथ' हा सुविचार आपल्या देशाला जगात उज्वल भविष्य निर्माण करू शकेल.
            परंतू अति प्रमाणात घडणारे भ्रष्ट आचरण व कुठेही कठोर शासन होत नाही असा संदेश समाजात पसरतोय व तो समज दृढ़ होत आहे तेव्हा आपल्या सत्ताधाऱ्यांनी तसेच प्रशासनानी शिवाजी महाराजांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप ही काळाची गरज आहे कारण आप्त स्वकियांकडून स्त्रीच्या शिलावर झालेला अत्याचार कदापीही न सहन करता व कोणतीही भिडभाड न ठेवता अशा नराधमाचे हातपाय तोडण्याचे असो की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याचे महसूल कर्मचाऱ्यांना दिलेले आदेश असो त्यातून नैतिक तसेच कर्त्तव्याबाबत योग्य तो संदेश महाराजांनी त्यांच्या कृतीतून समाजाला दिला होता. त्याचीच नितांत गरज सद्यस्थितीला जाणवते आहे अन् त्याचीच वाणवा आहे.
         तेव्हा चुकीच्या गोष्टी घडण्याबद्दल दु:ख नाही तर त्यानां समर्थनीय प्रशासन व राज्यकर्ते हा संदेश घातक आहे. म्हणूनच म्हातारी मेल्याचे दु:ख नसते तर काळ सोकावता कामा नये हे महत्वाचे अन्यथा अराजकता दूर नाही.
तेव्हा सावधान ! काळ सोकावतोय ....
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
http://www.sandeepmahamuni.blogspot.in

   

बुधवार, २ मार्च, २०१६

स्थितप्रज्ञस्तदोच्यते ...........!

                                 
                                                   स्थितप्रज्ञस्तदोच्यते ...........! 

                 थोड्या दिवसापुर्वी बेंगलोर येथे एक २३वर्षीय 'हरीश निंजप्पा' नावाचा युवक निवडणूक मतदान करून देवदर्शनाला चालला असताना त्याच्या दुचाकीस ट्रकची धडक बसून त्यात त्याचे अक्षरशः दोन तुकडे झाले. परंतू पुढील ३० मिनिटे तो जिवंत होता अन् मदती साठी लोकांना अवाहन करीत होता. काहींनी याचा व्हिडिओ देखिल बनवला परंतू तात्काळ मदतीच्या बाबतीत त्याची निराशा होत होती.शेवटी काही लोकांनी रूग्णवाहिका बोलवून त्यातून त्याला दवाखान्यात पोहचवण्याची व्यवस्था केली.ह्या दरम्यान रूग्णवाहिकेतील नर्सशी हरीश जे बोलला ते मन सुन्न करणारे व संपूर्ण सामाजिक व्यवस्थेवर विचार करायला भाग पाडणारे होते.तो म्हणाला
             " मी आता जगू शकणार नाही हे मला माहित आहे पण मी मेल्यानंतर माझा समाजातील काही गरजू लोकांना उपयोग झाला पाहिजे त्यासाठी माझे अवयव दान करा."
                स्वतःला इतका भयंकर अपघात झाल्यावर जिथे शुद्धीत राहणे हेच आश्चर्यकारक असताना तुमचा विवेक जागृत ठेवणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. यातुनच त्याची वैचारिक स्पष्टता तसेच स्थितप्रज्ञता कमालीची प्रगल्भ असल्याचे ते द्योतक आहे. अखेर तो गेला व त्याच्या ईच्छेनुसार अवयवदान सुद्धा झाले. त्याच्या मावशीने 'हरीशचा आम्हाला अभिमान आहे' अशी मोजकीच पण बरेच काही सांगून जाणारी प्रतिक्रिया दिली.
               स्वतः मृत्यूच्या दाढेत असताना दुसऱ्यांच्या हितांचा विचार करण्याची दातृत्व वृत्ती ह्यातून त्याची जडणघडण किती सुस्पष्ट विचारधारा व प्रगल्भ सामाजिक जाणीवांच्या सुसंस्कारात झाली असेल याची कल्पना येते.
              एकिकडे समाजात र्निमाण होणारी तेढ,फुट पाडणारे गट, तोंडदेखली सोशल मिडिया पुरती सामाजिक जाणीव ,अस्थिर करणारी विचारधारा व त्याचा प्रसार अशा अनेक गोष्टींची बजबजपुरी झाली आहे. त्यात हरीश निंजप्पा सारखे तरूण म्हणजे मिणमिणता का होइना आशेचा किरण अजून शिल्लक आहे याचीच प्रचिती देत आहेत.
आपण नेहमी एकतो माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही त्याला समुहाची आवश्यकता भासते. परंतू ह्या बरोबरच मानवाला निसर्गाने इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विचार करणारा मेंदू दिला आहे. तसं प्राण्यांना दिलेला नैसर्गिक क्रियेसाठी आवश्यक मेंदू अन् मानवाला मिळालेला अधिक कार्यक्षम मेंदू यात नक्की कोण योग्य आहे हा प्रश्न मला तरी अनुत्तरित आहे. कारण अधिक वैचारिक क्षमते बरोबर अधिकची सामाजिक, निसर्ग याविषयीची जबाबदारी देखिल आपलीच आहे याची जाणीव खरच रूजली आहे का ? ती रूजवण्यात काय कमतरता आहेत याचा धुंडोळा संवेदनशीलपणे घेतला गेला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर तो आवश्यक आहेच पण सामाजिक पातळीवर या विषयाशी निगडित शिक्षण जे वेगवेगळ्या सरकारी खात्यांतर्गत देणे जसे शिक्षण, आरोग्य, रस्ते सुरक्षा वैगेरे हे केवळ कागदोपत्री सोपस्कार न राहता लोकांच्या वर्तणूकीतून ते परावर्तित झाले पाहिजे.
            नुकत्याच महिला वाहक, पोलिस तसेच अन्य धर्मिय पोलिस अधिकारी यांच्यावर उनमत्त चवऱ्या बहाद्दरांकडून घडलेले हल्ले  व इतर सुज्ञांचा तटस्थपणा ( भ्याडपणा ) हे सामाजिक भानाची घसरलेली पातळी अधोरेखित करते आहे. तेंव्हा सुसमाजाची र्निर्मितीसाठी व्यक्तिगत पातळीवर तसेच शासन पातळीवर गांर्भियाने विचार झाला पाहिजे व त्याची तत्परतेने अंमलबजावणी केली गेली पाहिजे. तरच एक नागरिक म्हणून समाजात वावरताना आपली कर्तव्ये कोणती आहेत व तशा प्रकारचे योगदान देण्याची सहजप्रवृत्ती अंगिकारली गेली पाहिजे. नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील मुलभूत कर्तव्ये केवळ परिक्षेपुरती पाठ करून प्रत्यक्षात वागताना मात्र त्याची वाणवा असेल तर कर्मभोग अटळ आहेत. शैक्षणिक कार्यभागातील पुस्तकी ज्ञानाने मनुष्य प्रगल्भ होतोच असे नाही. ते केवळ त्याच्या अंर्तमनाने त्या गोष्टी किती जाणीवपूर्वक स्विकारल्या आहेत यावर ते अवलंबून असते.
           हरीश निंजप्पा याच्या नावातच हरीचा ईश असला तरी त्याच्या कृतीतून असामान्य अशी उच्चतम स्थितप्रज्ञता तसेच दातृत्व गुण त्याला खऱ्या अर्थाने देवत्व प्राप्त करून देतात व आपल्या सारख्या मानवाला ते प्रेरणादायी आहेत.
हरीश चा प्राण गेला पण त्याचा विचार अमर रहे हीच त्याला प्रार्थनारूपी श्रद्धांजली !