गुरुवार, १७ मार्च, २०१६

सावधान ! काळ सोकावतोय ....

                                              सावधान ! काळ सोकावतोय......

            नुकत्याच चर्चेत असलेल्या बातम्या पाहता देशात नेमकं चाललंय काय हा प्रश्न पडतो. विजय मल्या नावाचा रंगेल उद्योगपती तथा माननीय खासदार देशातील १७ बँकांचे नऊ हजार कोटी कर्ज (ऐकूनच डोकं बोजड होतंय) न चुकवता यंत्रणांच्या नाकावर टिच्चून १३ सुटकेस घेऊन निघून जातो.अन् आपले CBI खाते कोर्टात डिटेंशन एवजी लुक आउट नोटिस काढल्याच्या चुकीची कबुली देत मल्या पळून गेला हे निलाजरेपणे सांगते. तो मात्र लंडन मधून मी पळालो नाही मी काही चुकीचे केले नाही ( कारण माझ्यासारख्या बलाढ्य माणसाने कर्ज घेऊन बँकावर उपकार केले आहेत अन् बँकादेखिल असा असामी कर्जदार लाभल्यामुळे उपकृत झाल्या होत्या असाच त्याचा अविर्भाव आहे ) तसेच मीडियाने मला लक्ष्य न करता मी त्यांच्यावर केलेल्या खैरातीची जाण ठेवा असा उपरोक्त सल्ला देणारी टिव टिव केली.
        रघुराम राजन सारख्या कर्तव्यदक्ष गवर्नरनी कोणत्याही दबावाची तमा न बाळगता सततची कर्जाची फेररचना न करता सर्व खाती व्यवस्थित करण्यासाठी बँकावर लादलेल्या आदेशामुळेच बँकांनी विजय मल्याच्या पाठी तगादा लावला व त्याचेच पर्यवसन त्याच्या पळून जाण्यात झाले.
           दुसरीकडे सरकारी संत श्री श्री ( सामान्यांसारखे एका श्री ने यांची स्तुती पुर्ण होत नाही ) रविशंकर जगाला आर्ट अॉफ लिविंग चे धडे देण्यासाठी एका भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यासाठी यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्रात सपाटीकरण करीत झाडे झुडुपे तोडून तसेच काही ठिकाणी पात्राची दिशा बदलून नैसर्गिक जैवविविधतेचे नुकसान करण्यास कारणीभूत झाले असताना त्या विरोधातील याचिकेची हरित लवादाकडून दखल घेत त्यांना ५ कोटींचा दंड ठोठावला परंतू या आधुनिक संतानी एक छदाम देणार नाही हवे तर अटक करा असा उद्दामपणा दाखवत नविनच कला भक्तगणांना शिकवली परंतू लगेच जमिनीवर येत २५ लाख रू भरत उर्वरित रक्कम हफ्त्याने भरू असे सांगितले. वास्तविक कोणत्याही दंडाने पर्यावरणाचे नुकसान भरून येऊ शकत नाही.शिवाय हरीत लवादाने २५ लाख रू जमा करत उर्वरित रक्कम माफ केल्याचे ऐकिवात आहे तसे असेल तर हरीत लवाद दबावापुढे झुकून काम करीत आहे या शंकेस वाव आहे.तेव्हा 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे सांगणाऱ्या आपल्या पुर्वश्रमीच्या संतांची शिकवण आपण केव्हाच मातीमोल केली असून आधुनिक संतांसारखे भव्य दिव्य ईवेंट साजरे करीत समाजाचे आध्यात्मिक भले करण्याच्या नावाखाली सत्ताधारी मुजोरपणाच बाळगण्याचे जगण्याचे तंत्र मिळवले आहे व त्याचाच उदो उदो करण्याचे काम भक्तगण भक्तिभावाने करतीलच.
        महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सर्वच अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा करीत दंडरूपी महसूल गोळा करण्याचा फंडा तसेच आगामी महापालिका निवडणूक असा दुहेरी उद्येश  साधला आहे. तेव्हा ज्या गोष्टीला चाप बसला पाहिजे त्याचे शुद्धीकरण करण्याचे राजकारणी तंत्र जनतेला मिळत आहे.
            एकिकडे झटपट फुकटात प्रसिद्धि मिळणाऱ्या विद्यार्थी नेत्याकडे देशाचे लक्ष वेधले जात असताना ९३ च्या बॉम्बस्फोटातील एक महत्वपूर्ण आरोपी तब्बल१५ वर्षांनी २००४मधे  मिळालेल्या त्याच्या थोड्याश्या माहिती वरून मुंबई पोलीस युनीट ६ ने त्याला शिताफीने अटक केली परंतू प्रामाणिक पोलिसांना प्रसिद्धी तर सोडाच त्या आरोपीवर CBIने ठेवण्यात आलेले बक्षिस आजअखेर जवळ जवळ १२वर्ष मिळाले नाही शिवाय बक्षिसाच्या रकमेसाठी कायदेशीर पाठपुरावा करण्याची वेळ त्यांच्यावर येत असेल तर एक तपास यंत्रणा दुसऱ्या तपास यंत्रणेच्या कार्यतत्परते बद्दल असंवेदनशील आहे याचेच प्रदर्शन मांडत आहे.
             मग विजय मल्या, आधुनिक संत रविशंकर, राज्याचे सर्वेसर्वा, तपास यंत्रणा सर्वच जण आपापल्या भातावर डाळ ओढण्यात मश्गूल आहेत ' गरज सरो अन् वैद्य मरो ' असेच सुविचार त्यांना अभिप्रेत आहेत.व्यवस्थेत शिरलेली सुस्त व भ्रष्टाचारी मानसिकता व त्याचा पुरेपूर फायदा उचलणारा विजय मल्या वर्ग हे कशाचे द्योतक आहे त्यातून जगातील सर्वाधिक युवा तसेच सोशल मीडियावर एखाद्या घटनेबाबत मनोरंजनापुरते मर्यादित राहणाऱ्या पिढीला कोणता आदर्श मिळतो आहे. "भपकेबाज पणा करून पैसा मिळवा अन् देशाला बुडवून अय्याश जीवन जगा किंवा पर्यावरणाचे, सरकारी नियमांचे हवे तसे उल्लंघन करा नंतर सटर फटर दंड भरून त्या गोष्टी नियमित करून घेत समाजात प्रतिष्ठित पणे मिरवा ."मात्र रघुराम राजन यासारखे केवळ महत्वाकांक्षी व सतशिल न राहता ठाम, न डगमगाता, दबावाला अथवा हितसंबध या गोंडस आमिषाला न बळी पडता कर्त्तव्यतत्पर राहणाऱ्या तसेच १५ वर्ष जुना तपास सुद्धा तेवढ्याच हिरीरीने करणारे उमदे व प्रामाणिक पोलिस कर्मचारी हे आदर्श जरी मोजके असले तरी 'कर्त्तव्यदक्ष राहून देशसेवे साह्य करू अवघे धरू सुपंथ' हा सुविचार आपल्या देशाला जगात उज्वल भविष्य निर्माण करू शकेल.
            परंतू अति प्रमाणात घडणारे भ्रष्ट आचरण व कुठेही कठोर शासन होत नाही असा संदेश समाजात पसरतोय व तो समज दृढ़ होत आहे तेव्हा आपल्या सत्ताधाऱ्यांनी तसेच प्रशासनानी शिवाजी महाराजांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप ही काळाची गरज आहे कारण आप्त स्वकियांकडून स्त्रीच्या शिलावर झालेला अत्याचार कदापीही न सहन करता व कोणतीही भिडभाड न ठेवता अशा नराधमाचे हातपाय तोडण्याचे असो की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याचे महसूल कर्मचाऱ्यांना दिलेले आदेश असो त्यातून नैतिक तसेच कर्त्तव्याबाबत योग्य तो संदेश महाराजांनी त्यांच्या कृतीतून समाजाला दिला होता. त्याचीच नितांत गरज सद्यस्थितीला जाणवते आहे अन् त्याचीच वाणवा आहे.
         तेव्हा चुकीच्या गोष्टी घडण्याबद्दल दु:ख नाही तर त्यानां समर्थनीय प्रशासन व राज्यकर्ते हा संदेश घातक आहे. म्हणूनच म्हातारी मेल्याचे दु:ख नसते तर काळ सोकावता कामा नये हे महत्वाचे अन्यथा अराजकता दूर नाही.
तेव्हा सावधान ! काळ सोकावतोय ....
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
http://www.sandeepmahamuni.blogspot.in

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा