गुरुवार, ५ मे, २०१६

सैराट व्हाया झिंगाट.....

                                           सैराट व्हाया झिंगाट.....

                       नुकताच 'सैराट' नावाचा मराठी चित्रपट पाहिला. प्रेमाचा प्रवास अन् त्याचा शेवट यातून जाणावणाऱ्या समाजव्यवस्थेत आपण भौतिक दृष्ट्या २१व्या शतकात आहोत मात्र समाजमन मध्ययुगीन विचारधारेला फेविकोल का जोड है टुटेगा नहीं याप्रमाणे चिकटलेले आहे हेच अधोरेखित करते.
                       समाजातील तथाकथित आहेरे वर्गातील सरंजामांनी पिढ्या न पिढ्याची मान मरातबाची पांघरलेली झूल त्यातून निर्माण झालेली सत्ता-संपत्ती व यातूनच आलेला दुराभिमान केवळ नाहीरे वर्गालाच नव्हे तर स्वजातीयांना देखिल कस्पटासमान लेखण्याची प्रवृत्तीला खतपाणी घालतो आहे. त्यांच्या घराण्याचा तथाकथित परंपरेला छेद देण्याची कल्पना त्यानां अस्वस्थ करणारी व त्यासाठी टोकाचे पाऊल उचलणारी असते.दुसरीकडे तोच प्रकार जात पंचायतीच्या नावाखाली अख्ख्या कुटूंबाची आर्थिक मानसिक वाताहत करीत हतबल करणारा देखिल असतो.
                      सध्याच्या युगात बाहेर दाखवण्यापुरती असणारी विकसित पुरोगामी मानसिकता घरात मात्र टोकाची संकुचित असते हा जगण्यातला विरोधाभास केवळ ठराविक वर्गातच नव्हे तर सर्व समाजात आहे.स्वतःच्या अहंकारापुढे दुसऱ्याचे मन,ईच्छा याला काडीचीही किंमत नसते.पुस्तकी अभ्यासक्रमातून घेतलेल्या शिक्षणापेक्षा घरातून, समाजातून मिळणाऱ्या बाळकडूचा परिणाम खोलवर रुजतो.
                     चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे,त्याचा समाजमनावर होणारा परिणाम याविषयी कमालीचे संवेदनशील असणारे सोशलमिडियीस्टमुळे चित्रपटाच्या केवळ टिजरवरून मत,प्रतिक्रिया,आमचा-तुमचा वादविवाद यांचा नुसता महापूर आला होता मात्र तो चित्रपट पाहिल्यानंतर खरचं ते नेमकं काय बोध घेतात हा माझ्यासाठी तरी औत्सुक्याचा विषय आहे. कारण दिग्दर्शकाने व्यावसायिकपणे आकर्षण,ओढ,प्रेम, जबाबदारीचं भान आणि वास्तव हा प्रवास आपल्या पुढे ठेवला आहे त्यातून नेमका संदेश घेतला जाऊन स्वत:च्या विचारात जाणिवपूर्वक परीवर्तन केले जाते का? का फक्त आपल्याला रूचणारे,पचणारे तेवढे सोयिस्कर घेत बेभान होत केवळ झिंग-झिंग, झिंग-झिंग झिंगाट करत येरे माझ्या मागल्या होणार असेल तर कसले प्रबोधन अन् कसला विचार नुसतेच मनोरंजनरूपी टाईमपास.
                    वैचारिक सहिष्णुता ( आपल्या विरुध्द अथवा विरोधी विचार सद्सद्विवेक व बुद्धीप्रामाण्याने स्विकारणे ) हा महत्वाचा गुण अंगिकारणे गरजेचे आहे नाहीतर प्रत्येक टप्प्यावर आपल्या सारखे विचार करणारे व न करणारे अशी उभी फुट निर्माण करणार असू तर येणाऱ्या पुढच्या पिढीचे पाय रक्ताने माखलेले असतील तसेच वैचारिक पोरकेपणाने ती ग्रासली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.पहिल्यांदा विषमता निर्माण करणाऱ्या व्यवस्थेवर भिरकावलेल्या दगडानी झालेला शेवट नंतर पुढच्या टप्प्यावर निशब्द क्रुरतेवर थांबेल एवढाच काय तो बदल बाकी सर्व प्रवासी आपापल्या जीवजगतासाठी स्वतःच जबाबदार असतात !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा