शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

अभासी जगण्याची ओढ....!

                                  अभासी जगण्याची ओढ....!

               रोजच्या जगण्यात अवाढव्य लोकसंख्ये प्रमाणे भरमसाठ घटनाही रोज घडतात अन् त्यातील काही बातम्या आपल्याला धडकतायेत.त्या ताज़्या म्हणत म्हणत केव्हा शिळ्या होतात ते सुद्धा समजत नाही इंस्टंट चा जमाना आहे.अलीकडील कोपर्डी बलात्कार, महाड पुल दुर्घटना त्यापैकीच.या वरवर लक्षवेधक बातम्या हो लक्षवेधकच कारण नेहमी पेक्षा काहीतरी वेगळे बघायला किंवा ऐकायला मिळाले की आपली उत्सुकतावश मनस्थिति सुखावते.वरवर अरेरेरे..!, अबब..! करत चुकचुकतो पण खरचं आपण तेवढे संवेदनशील राहिले आहोत का? मग भ्रष्टाचाराचे मोठे आकडे असो की अपघातात अथवा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माणसांचे आकडे, ते ऐकून आपले डोळे आता फिरत नाहीत डोळेझाक मात्र आपण आवर्जून करतो.
                कोपर्डी बलात्कारावरून आठवलं नुकतेच उत्तरप्रदेशात बलात्काराच्या व्हिडीओ सीडीज् विकताना सापडल्या अन् त्याचे दर सुद्धा आतील घटकानुसार वेगवेगळा होता.मग यात बलात्कार करणारा,त्याचे व्हिडिओ शुटिंग करणारा,ते विकणारा व विकत घेणारा असं कितीही कायदेशीर वर्गीकरण केले तरी मुळ प्रवत्ती एकच आहे.बलात्कार सवर्णावर झाला की दलित महिलेवर किंवा श्रीमंत की गरीब अथवा घराबाहेरील की घरातील,बलात्कार हा तेवढाच भयंकर असतो.अन् तो शरीरापेक्षा मानसिक आघात अधिक असतो.आपल्या कडे मात्र राजकारण असो की समाजकारण विषयाच्या गंभीरते पेक्षा जाती-पाती किंवा मताच्या अनुषंगानेच ते चालत राहतं त्यावरच त्यांची चुल पेटते.महाड सारख्या दुर्घटनेत शंभर वर्ष जुन्या पुलाचे अभियंते थातूरमातूर स्ट्रक्चरल अॉडीटचे सोपस्कार पाडतात कारण माणसांच्या जीवाची काहीही किमंत उरलेली नाही.याउपर गुटख्याचा तोबरा भरून पत्रकाराला कँमेरासमोरच उद्धट बोलत धमकावण्याचा मुजोरपणा पालकमंत्री करतात तसेच मुख्यमंत्री पत्रकारांना संबोधत असताना पाठिमागे उभारून खुशाल सेल्फी काढतात असले 'आपत्ती पर्यटन'करणारे तथाकथित लोकप्रतिनिधी असतील तर अच्छे दीन च येणार.या नेत्यांची तथाकथित राजकीय ताकद कार्ल मार्क्स च्या भाषेत सांगायची झाल्यास 'लुपेन वर्ग' आहे ज्याला सरकार कोणतं आहे, विचारधारा काय तसेच समाजाची संस्कार मुल्य कोणती या सर्वाशीं काही देणेघेणे नाही केवळ आपल्याला खायला प्यायला व पैसे मिळाले की झाले.
                नविन प्रथेप्रमाणे एखादी घटना कितीही छोटी असो वा मोठी त्यावर दोन ओळीची टिव्-टिव् केली की आपली आधुनिकते बरोबर कार्यतत्परताही दिसून येते व जबाबदारीचे ओझे देखिल हलके होते. आपल्या सारख्यांच्या लोकभावना आपल्या स्मृती इतक्याच तकलादू व क्षणभंगूर असतात तेव्हां एका पाठोपाठ एक घटना घडत राहतात आपण मात्र अंर्तमुख होण्या ऐवजी मूक साक्षीदार होतो.
                आजुबाजूला असलेले whats up,facebook,internet सारखी सोशल माध्यमांचा विळखा त्यातून निर्माण झालेले अभासी जगच आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय.शेअर, लाईक पुरते मर्यादित सुविचार आपल्या खऱ्या जगण्याची मुल्ये असू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.पोकेमोन गो सारखे व्हर्च्युअल गेम्स जगात लोकप्रियतेचे उच्चांक मोडतायेत हे त्याचेच द्योतक आहे. या खेळाच्या अभासी जगात हरवल्यामुळे वास्तवात अपघात, लुटमार,बलात्कार यासारख्या दुर्घटना घडतायत असे हळुहळु समोर येऊ लागलय.आपण वास्तवात जगण्या ऐवजी अभासी जगालाच प्राधान्य क्रम देत वेगवेगळ्या मानसिक, शारीरिक व्याधींना आमंत्रण देतोय.अभासी जगण्याची ओढ इतकी बळावलीय की कळतय पण वळत नाही अश्या अवस्थेला पोचलो की काय अशी भीती वाटते आहे ही भीती भासच ठरो ही प्रार्थना...!

संदिप महामुनी
९६३७१३०२०६
http://www.sandeepmahamuni.blogspot.in 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा