रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

भावना प्रधान अन् बुद्धि सेवक....!

                                     
                                                   भावना प्रधान अन् बुद्धि सेवक....!
       
                             आपल्या देशातील कोणतीही ज्वलंत बातमी घ्या मग ती काश्मीर प्रश्न असो की कावेरी पाणी तंटा अथवा गुजरात मधील पटेल आरक्षण;उना दलित अत्याचार ते पुर्वांचल मधील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना; उल्फा, बोडोलैंड चा नक्षलवाद, उभा-आडवा भारत समस्याग्रस्तच दिसेल.
                             या समस्यांच्या मुळाशी गेल्यास भुप्रदेशीय अतिरेकी अस्मिता अथवा व्यवहारिक दृष्टिकोना एवजी भावनिक चिकटलेपण हेच कटू सत्य निदर्शनास येईल.परंतू एखाद्या समस्येच्या मुळाशी जाण्यापेक्षा वर वर घुटमळत उथळ प्रतिक्रिया देत,ऐकायला अन् बोलायला सोप्या उत्तराशी सलगी करण्यातच आपण धन्यता मानतो कारण सर्वसाधारणपणे आपल्याला बुद्धिपेक्षा भावना जवळची वाटते.नेमक्या याच कळपातील मेंढऱ्या वृत्तीचा आधार घेत वेगवेगळ्या राजकारणाची चुल मांडली जाते अन् धुर्त राजकारणी याचा फायदा उचलत त्यावर आपली भाकरी भाजतात.
                            स्त्री विषयी बहुतांश दांभिक आदर दाखवित तिच्या वरील अत्याचाराला जातीय रंग देत सत्ते साठीच्या अथवा आपले उपद्रव मुल्य सिद्ध करण्यासाठीच्या कुरघोड्या पुर्वंपार चालत आल्या आहेत.खैरलांजीचे दलित कार्ड ते कोपर्डीचे मराठा कार्ड एवढेच काय तो बदल.परंतू त्याच्या मुळाशी असलेला नराधमपणा,पुरषी माज जिथल्या तिथे ठेचणारी व्यवस्था शासन पातळीवर रूजलीय का?आरक्षण असो की स्व-रक्षण केवळ शिरगिणतीचे संख्याबळ व तीचे रस्त्यावरील शक्ती प्रदर्शन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आपले राजकीय उपद्रव मुल्य सिद्ध केले की हवे ते पदरात पाडून घेण्याची कसब दाखवणारा हा खरा लोकनेता ठरतो त्याने केवळ भावनिक मुद्याला फुंकर घातली की तुमच्या साठी कायपण म्हणणारे हवशे,नवशे,गवशे उरलेले भडकवण्याचे काम अनेक माध्यमांचा चपखलपणे वापर करीत बोभाटपणे करतात.एकंदर मुद्दा कितीही व्यवहार्य नसो मतांचा गठ्ठा हातून सुटू नये म्हणून सत्ताधारी व सत्ताभिलाषी दोघेही साम,दाम,दंड,भेदाचे शस्त्र वापरत आखाड्यात उतरतात.निवडणूक आली की अशा मुद्द्यांवर भर देत विकासाच्या नावाखाली गोंडस घोषणा करीत भावनिक लाट निर्माण केली जाते व त्या लाटेवर स्वार होत सत्तेचा सोपान मिळवतात अन् लाट ओसरल्यावर पुन्हा जैसे थे.वर्षोंवर्षे बेरजेचे राजकारण करीत राजकीय घराणी निर्माण केली जातात मग स्वतः,भाऊ,मुलगा, मुलगी,सुन,पुतण्या,मेव्हणा,नातवंडं....वैगरे यांच्या भोवतीच अख्ख्या राज्याचं राजकारण फिरवत ठेवायच बाकी कार्यकर्ते भावनिकपणे गळ्यात पक्षचिन्ह असलेला उपरण्याचा फास लावत व स्वतःलाच टोप्या घालत हाय कमांड, साहेब,नेताजी,लालूजी,अम्माजी चरणी लीन होतात.नंतर फरपट झाली की विठ्ठलाचा झेंडा हातात घेण्या एवजी त्यालाच कोणता झेंडा घेऊ हाती म्हणून विचारतात.
                            केवळ राजकारण क्षेत्रातच नव्हे तर धर्म, अध्यात्म,चित्रपट,खेळ या क्षेत्रात देखिल भावनिकतेला उधान येते.अपंगानां दिव्यांग म्हटलं की आपला त्यांच्याप्रती आदर व्यक्त होतो भले १९ जणांच्या पथकात विश्वविक्रम सहित २सुवर्णपदक,१ रौप्यपदक,१ कांस्यपदक मिळवित पँरालंपिक स्पर्धेत यश मिळविणाऱ्यांची योग्य दखल न का घेईना. वास्तविक सुदृढ व्यक्तीपेक्षा दिव्यांग व्यक्तीचे यश विशेष उल्लेखनीय असते.असो.
                           एखादे लहान मुल कुपनलिकेत पडले,एखादा माणूस बायकोचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालला की मोठ्या प्रमाणात याची दखल घेत भावनिक उमाळ्याने लाखोची आर्थिक मदत करीत इति कर्तव्य पार पडल्याचे पुण्य पदरी पाडतात पण अशा घटना घडण्या पाठीमागे असणारी सडकी व्यवस्था बदलण्यासाठी आपण आग्रही असतो का? का केवळ देवस्थानाला श्रीमंत बनवत स्वतःचे पापक्षालन करण्यात धन्यता मानतो वास्तवात लेखापालांच्या अहवालानुसार देवस्थानच्या व्यवहार भोंगळ व अपहारिणी आहे अन् हेच भक्तांच्या अंध भावनांचेच फळ आहे.
                           खरे हिंदुस्तानी,----असाल तर लाईक कराल असल्या पोस्ट टाकून फुकाच्या राष्ट्रवादाचे प्रदर्शन मांडणाऱ्या व इतरांना राष्ट्रप्रेमीपणाचे प्रशस्तिपत्र देण्याचा ठेका घेणाऱ्या पिढीला नागरिकांसाठीची मुलभूत कर्तव्य ठावूक असणे व तीचे पालन करणे दिवास्वप्नच आहे दुसरीकडे या विरुद्ध भावनांना खतपाणी घालत अतिरेकी संघटना फोफावतात मग ईद दिवशी अमेरिकन कैद्यांना बकऱ्यांप्रमाणे उलटे लटकवत द मेकिंग अॉफ इल्यूशन्स म्हणत त्यांच्ये गळे चिरताना ईसिसच्या अतिरेक्यांना आनंद वाटतो कारण त्यांच्या भावनांशी ते निगडित असते.तिथे भावना प्रधान असते व बुद्धि केवळ सेवकाची भुमिका बजावते.
                           जिथे भावना जास्त प्रभावी असते तिथे कट्टरता आपसूक वाढीस लागते अन् ती धोकादायक असते पण जर भावनेला बुद्धिप्रामण्याची जोड असेल तर तिथे सहिष्णुता अंगिकारली जाते अन् त्यातच सकलजनांचे हित सामावलेले असते.म्हणून काय प्रधान असावे व कोण सेवक असावा हे प्रत्येकाने आपापल्या वैचारिक पातळीनुसार ठरवावे..!

संदिप महामुनी
9637130206

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

खेळाडूंची व्यथा अन् व्यवस्थेचा खेळ....!

                                   खेळाडूंची व्यथा अन् व्यवस्थेचा खेळ....!
                   
                   रिओ २०१६ ओलिंपिकचे सुप वाजले.चार वर्षांची मेहनत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक खेळाडू अन् देश उत्सुक असतो तसेच जीवाचे रान देखिल करतो किंबहुना करायलाच पाहिजे.तस पाहिलं गेल्यास ते एक प्रकारचे शस्त्र व हिंसे शिवाय खेळले गेलेले युद्धच असते.तिथे गुणवत्ता सिद्ध करण्याची धडपड, जिंकण्याची चढाओढ,जास्तीत जास्त पदके मिळवत वर्चस्व गाजवण्याची संधी सर्व काही नैतिक असते.वैयक्तिक पातळीवर खेळाडूंना स्वतःच्या चांगल्या वाईट भावनांचा निचरा करण्याचे व आपली राष्ट्रीय अस्मिता व्यक्त करण्याचे व्यासपीठ असते.
                 आज निश्चितच दोन पदकं त्यातील पहिलं महिला कुस्तीतील साक्षी मलिक हीने ब्राँझपदकाने खातं खोलत इतरांना जिंकण्याची इर्षा दिली तर दुसरे पदक पी.व्ही.सिंधूने एकेरी बँडमिंटन मधिल पहिले-वहिले वैयक्तिक महिला रौप्यपदक मिळवून आनंद दिला परंतू समाधान मात्र मिळाले असं म्हणता येणार नाही.जगातील लोकसंख्येनुसार दुसऱ्या स्थानावर असलेल्या अन सर्वात तरूण व जागतिक महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या देशाची कामगिरी पाहता आपण मुर्खांच्या नंदनवनात राहतो आहोत असे वाटते आहे.मग यात खेळाडू कमी पडतायत का तर बहुतांशी याच उत्तर नाही असचं म्हणायला हवं.कारण खेळ विश्वातील वैयक्तिक पातळीवरील त्यांची कामगिरी ते ज्या आर्थिक परीस्थितीत जगतात अन् खेळांसाठीच्या ज्या सोयी सुविधें अभावी ते खेळतात ते अतुलनीय आहे.क्रिडा प्रशासन व त्या विभागाचे मंत्री यांचे योगदान अन् मुख्य म्हणजे त्यांची तळमळ इतकी सुमार आहे की शोभा डे नी खेळाडूं एवजी क्रिडा प्रशासन,व्यवस्थेवर भाष्य केले असते तर सोशल मिडीयाने त्यांना डोक्यावर घेतले असते.कपडे सुद्धा दुसऱ्याचे वापरणारी दिपा कर्माकर सारखी खेळाडू प्रोडूनोव्हा या भारताला अपरिचित खेळात चौथ्या स्थानी राहते तसेच कविता बाबर सारखी धावपट्टू बुट घेण्याची ऐपत नसतानाही चमकदार खेळते किंवा नौकायन मधील दत्तू भोकनाळ ही सर्व नावें व्यवस्थेपेक्षा वैयक्तिक मेहनतीच्या जोरावर तिथपर्यंत पोहचू शकलेत याचीच साक्ष देतात.
                   नरसिंग यादवच्या उत्तेजक चाचणीमुळे नाडा अन् वाडा च्या वादात त्याच्या सहभागावर ओढवलेली नामुष्की अन् दुसरीकडे ४२कि.मी. मँरेथॉन मधील ओ. पी. जैशा हीने स्पर्धे दरम्यान भारतीय एनर्जी ड्रिंकचा एकही स्टॉल नव्हता तसेच व्यवस्थापनातील कोणीही उपस्थित नव्हते आणि आपण मरता मरता वाचलो असा गंभीर आरोप केला आहे.परंतू व्यवस्थापनाने तिला सुविधा देऊ करून सुद्धा तीने त्या स्वतःच नाकारल्या होत्या असा प्रतिवाद केला आहे सत्य नंतर बाहेर येईलच पण समन्वयाच्या अभावी व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह अधिकच गडद झालं त्याचे काय.
                   एवढी मेहनत करून,यश मिळवून देखिल प्रत्येक खेळाडूला त्याचा योग्य मोबदला मिळेलच याची शाश्वती नाही तेव्हां अनेक ऐशियन,पँराओलिंपिक स्पर्धेत जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून देखिल खेळाडूंची आर्थिक स्थिती खालावलेली असेल तर प्रतिभा असूनसुद्धा नविन पिढी त्याकडे पाठच फिरवेल.मिल्खा सिंगला हरवून चमकदार खेळ करणारा माखन सिंगला अपघातात पाय गमावल्यावर सर्व मेडल भंगारात घालावे लागले,पहिले वैयक्तिक ओलिंपिक ब्राँझ मिळवणाऱ्या खाशाबा जाधव यांना स्वतःच्या खर्चाने जावे लागले होते,१९५०ला फुटबॉल मधे सुवर्णपदक मिळवणारा युसूफ खान,एशियन स्पर्धेत चमकदार खेळ करणारी अश्विनी नच्चप्पा,११० मि अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारा टॅक्सी ड्रायव्हर सर्वण सिंग,५० मि फ्री स्टाइल मधे वर्ल्ड रेकॉर्ड करणारे मुरलीकांत पेटकर, भालाफेकमधे सुवर्णपदक मिळवणारा देवेंद्र झाझेरियी,हॉकीत ओलिंपिकमधे २ सुवर्णपदक १ रौप्यपदक तसेच एशियनमधे २ सुवर्णपदक १ रौप्यपदक मिळवणारा गोली असलेला पहिला आंतरराष्ट्रीय कप्तान शंकर लक्ष्मण(Rock of Gibraltar),कुस्तीत पहिले वैयक्तिक महिला ओलिंपिक ब्राँझ मिळवणारी करनम मल्लेश्वरी,बिलियर्डसमधे २ वेळा जागतीक विजेता व १२ वेळा राष्ट्रीय विजेता ठरलेला विल्सन जोन्स, ट्रॅक वरील वेगवान भारतीय महिला आशा रॉय,६ एशियन पदके मिळवणारा जलतरणपट्टू शरत गायकवाड, बँडमिंटनपट्टू गिरीश शर्मा असे अनेक ज्ञात अज्ञात प्रतिभाशाली परंतू झाकाळलेले आयुष्य असणाऱ्या खेळाडूंचा आपल्याकडे भरणा आहे.पण शारापोवा तेंदुलकरला ओळखत नसेल तर आपल्याला कोण राग येतो मात्र या प्रतिभावान खेळाडूंची माहिती नाही याची आपल्याला लाज वाटत नाही ही शोकांतिका.२०११ च्या स्पेशल ओलिंपिक स्पर्धेत २ ब्राँझपदक मिळवणारी सीता साहू ही खेळाडू रस्त्यावर पाणीपुरी विकत असेल आणि २०११ मधे महिला कबड्डी विश्वविजेता संघाला रेड कार्पेट सोडा पण डुगडुग रिक्षामधे बसून घरी जावे लागत असेल तर खेळ व खेळाडूं विषयीची मानसिकता तसेच व्यवस्थेची डागडुजी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे हेच खरं.२९ ऑगस्ट आपण ज्यांच्या नावाने क्रिडा दिन साजरा करतो ते हॉकीचे जादूगार ज्यांचा खेळ बघून स्वतः हिटलरनी जर्मनीचे नागरिकत्त्व स्विकारण्याचा त्यांना प्रस्ताव ठेवला होता अन् तितक्याच देशाभिमानाने तो ज्यांनी नाकारला ते ध्यानचंद आजदेखिल मरणोत्तर भारतरत्नाच्या प्रतिक्षेत आहेत.
                अर्धा-एक गुणांनी,अर्धा-एक सेकंदांनी मागे राहणाऱ्यांना आपण दुर्लक्षीत करणार असू तर त्यानां उभारी कशी मिळणार कारण यशाचे अनेक बाप असतात अपयश मात्र नेहमीच पोरकं असते.एकूणच खेळाकडे बघण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन त्यात केवळ पैसा,प्रसिद्धीला प्राधान्यक्रम असेल अन् खेळाविषयी ओढ,तळमळ नसेल तर त्या खेळाचे योग्य पोषण होणार नाही.दुसरीकडे सरकार, प्रशासन यांचे क्रिडा धोरण अत्यंत उथळ व केवळ प्रसिद्धीन्मुख असेल तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पोषक सोयी सुविधांची वानवाच राहणार.ह्या खेळाडूंच्या व्यथा अन् व्यवस्थेचा खेळ जागतीक स्पर्धेत भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या मुळाशी येणार हे मात्र नक्की..!