रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

भावना प्रधान अन् बुद्धि सेवक....!

                                     
                                                   भावना प्रधान अन् बुद्धि सेवक....!
       
                             आपल्या देशातील कोणतीही ज्वलंत बातमी घ्या मग ती काश्मीर प्रश्न असो की कावेरी पाणी तंटा अथवा गुजरात मधील पटेल आरक्षण;उना दलित अत्याचार ते पुर्वांचल मधील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना; उल्फा, बोडोलैंड चा नक्षलवाद, उभा-आडवा भारत समस्याग्रस्तच दिसेल.
                             या समस्यांच्या मुळाशी गेल्यास भुप्रदेशीय अतिरेकी अस्मिता अथवा व्यवहारिक दृष्टिकोना एवजी भावनिक चिकटलेपण हेच कटू सत्य निदर्शनास येईल.परंतू एखाद्या समस्येच्या मुळाशी जाण्यापेक्षा वर वर घुटमळत उथळ प्रतिक्रिया देत,ऐकायला अन् बोलायला सोप्या उत्तराशी सलगी करण्यातच आपण धन्यता मानतो कारण सर्वसाधारणपणे आपल्याला बुद्धिपेक्षा भावना जवळची वाटते.नेमक्या याच कळपातील मेंढऱ्या वृत्तीचा आधार घेत वेगवेगळ्या राजकारणाची चुल मांडली जाते अन् धुर्त राजकारणी याचा फायदा उचलत त्यावर आपली भाकरी भाजतात.
                            स्त्री विषयी बहुतांश दांभिक आदर दाखवित तिच्या वरील अत्याचाराला जातीय रंग देत सत्ते साठीच्या अथवा आपले उपद्रव मुल्य सिद्ध करण्यासाठीच्या कुरघोड्या पुर्वंपार चालत आल्या आहेत.खैरलांजीचे दलित कार्ड ते कोपर्डीचे मराठा कार्ड एवढेच काय तो बदल.परंतू त्याच्या मुळाशी असलेला नराधमपणा,पुरषी माज जिथल्या तिथे ठेचणारी व्यवस्था शासन पातळीवर रूजलीय का?आरक्षण असो की स्व-रक्षण केवळ शिरगिणतीचे संख्याबळ व तीचे रस्त्यावरील शक्ती प्रदर्शन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आपले राजकीय उपद्रव मुल्य सिद्ध केले की हवे ते पदरात पाडून घेण्याची कसब दाखवणारा हा खरा लोकनेता ठरतो त्याने केवळ भावनिक मुद्याला फुंकर घातली की तुमच्या साठी कायपण म्हणणारे हवशे,नवशे,गवशे उरलेले भडकवण्याचे काम अनेक माध्यमांचा चपखलपणे वापर करीत बोभाटपणे करतात.एकंदर मुद्दा कितीही व्यवहार्य नसो मतांचा गठ्ठा हातून सुटू नये म्हणून सत्ताधारी व सत्ताभिलाषी दोघेही साम,दाम,दंड,भेदाचे शस्त्र वापरत आखाड्यात उतरतात.निवडणूक आली की अशा मुद्द्यांवर भर देत विकासाच्या नावाखाली गोंडस घोषणा करीत भावनिक लाट निर्माण केली जाते व त्या लाटेवर स्वार होत सत्तेचा सोपान मिळवतात अन् लाट ओसरल्यावर पुन्हा जैसे थे.वर्षोंवर्षे बेरजेचे राजकारण करीत राजकीय घराणी निर्माण केली जातात मग स्वतः,भाऊ,मुलगा, मुलगी,सुन,पुतण्या,मेव्हणा,नातवंडं....वैगरे यांच्या भोवतीच अख्ख्या राज्याचं राजकारण फिरवत ठेवायच बाकी कार्यकर्ते भावनिकपणे गळ्यात पक्षचिन्ह असलेला उपरण्याचा फास लावत व स्वतःलाच टोप्या घालत हाय कमांड, साहेब,नेताजी,लालूजी,अम्माजी चरणी लीन होतात.नंतर फरपट झाली की विठ्ठलाचा झेंडा हातात घेण्या एवजी त्यालाच कोणता झेंडा घेऊ हाती म्हणून विचारतात.
                            केवळ राजकारण क्षेत्रातच नव्हे तर धर्म, अध्यात्म,चित्रपट,खेळ या क्षेत्रात देखिल भावनिकतेला उधान येते.अपंगानां दिव्यांग म्हटलं की आपला त्यांच्याप्रती आदर व्यक्त होतो भले १९ जणांच्या पथकात विश्वविक्रम सहित २सुवर्णपदक,१ रौप्यपदक,१ कांस्यपदक मिळवित पँरालंपिक स्पर्धेत यश मिळविणाऱ्यांची योग्य दखल न का घेईना. वास्तविक सुदृढ व्यक्तीपेक्षा दिव्यांग व्यक्तीचे यश विशेष उल्लेखनीय असते.असो.
                           एखादे लहान मुल कुपनलिकेत पडले,एखादा माणूस बायकोचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालला की मोठ्या प्रमाणात याची दखल घेत भावनिक उमाळ्याने लाखोची आर्थिक मदत करीत इति कर्तव्य पार पडल्याचे पुण्य पदरी पाडतात पण अशा घटना घडण्या पाठीमागे असणारी सडकी व्यवस्था बदलण्यासाठी आपण आग्रही असतो का? का केवळ देवस्थानाला श्रीमंत बनवत स्वतःचे पापक्षालन करण्यात धन्यता मानतो वास्तवात लेखापालांच्या अहवालानुसार देवस्थानच्या व्यवहार भोंगळ व अपहारिणी आहे अन् हेच भक्तांच्या अंध भावनांचेच फळ आहे.
                           खरे हिंदुस्तानी,----असाल तर लाईक कराल असल्या पोस्ट टाकून फुकाच्या राष्ट्रवादाचे प्रदर्शन मांडणाऱ्या व इतरांना राष्ट्रप्रेमीपणाचे प्रशस्तिपत्र देण्याचा ठेका घेणाऱ्या पिढीला नागरिकांसाठीची मुलभूत कर्तव्य ठावूक असणे व तीचे पालन करणे दिवास्वप्नच आहे दुसरीकडे या विरुद्ध भावनांना खतपाणी घालत अतिरेकी संघटना फोफावतात मग ईद दिवशी अमेरिकन कैद्यांना बकऱ्यांप्रमाणे उलटे लटकवत द मेकिंग अॉफ इल्यूशन्स म्हणत त्यांच्ये गळे चिरताना ईसिसच्या अतिरेक्यांना आनंद वाटतो कारण त्यांच्या भावनांशी ते निगडित असते.तिथे भावना प्रधान असते व बुद्धि केवळ सेवकाची भुमिका बजावते.
                           जिथे भावना जास्त प्रभावी असते तिथे कट्टरता आपसूक वाढीस लागते अन् ती धोकादायक असते पण जर भावनेला बुद्धिप्रामण्याची जोड असेल तर तिथे सहिष्णुता अंगिकारली जाते अन् त्यातच सकलजनांचे हित सामावलेले असते.म्हणून काय प्रधान असावे व कोण सेवक असावा हे प्रत्येकाने आपापल्या वैचारिक पातळीनुसार ठरवावे..!

संदिप महामुनी
9637130206

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा