मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

अर्थ निश्चलाच्या मनी....!

                        अर्थ निश्चलाच्या मनी....!

             अचानक निघालेल्या सत्ताधारी फतव्याने मानवीय व्यवहार स्वातंत्र्य किती क्षणभंगुर अन् तकलादू असू शकते तसेच क्षणात होत्या चे नव्हते अन् अर्थाचा कसा अनर्थ ओढावतो ते नुकत्याच सरकारने घेतलेल्या ५००/१००० च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनांना अनुभवावा लागत आहे.
            गैरव्यवहार,काळा पैशावर अंकुश,सुरक्षितता किंवा तत्सम अपरीहार्यता, धाडसी अथवा आतबट्ट्याचा निर्णय या चुक की बरोबर वादाला माझ्या मते काहीही मोल नाही कारण बहुतांश मानसिकतेनुसार जबाबदारीच घोंगडं दुसऱ्याच्या गळ्यात टाकून स्वैर जगण्याला प्राधान्य देणाऱ्यांना त्याच घोंगडयांवर बसणाऱ्याचे किर्तन ऐकावे लागणार मग सोयीस्कर हितासाठी लोकशाहीच्या नावाने गळे काढून काय उपयोग? एखाद्या कागदाला असलेले मोल दुसऱ्या क्षणी मातीमोल होत असेल तर या जास्तीत जास्त संग्रह करून स्वतःचे मोल वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या वृत्तीला ती एक चपराकच आहे. प्रत्येक श्वासानंतर येणाऱ्या श्वासाची जिथे अनिश्चितता असते तिथे भ्रमात वावरणारे व त्यातच रमणारे आपण सत्यापासून फारकत घेत सत्यमेव जयते चा आदर्श नारा देत जगत असतो.या आपल्या दुटप्पी वागण्यामुळे आपण तथाकथित निश्चिंतीसाठी अविरत धावपळ करीत सोयीस्कर व्यवस्थेचा स्विकार करतो अन् ही व्यवस्था कितीही बेकायदेशीर असली तरी एकदा का ती अंगवळणी पडली की ती बदलण्याची भाषा देखिल सहन होत नाही अन् त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
             भारतीय साहित्यात नैतिकता व त्यातून निर्माण होणारी नितीमत्ता याचे उदात्तीकरण हे व्यक्तिकेंद्रित केले गेले आहे त्याचेच प्रतिबिंब चित्रपटात पडलेले आढळते.म्हणूनच चित्रपट अधिक तर नायकप्रधान फार फार तर बलात्कार पिडितेचा बदला घेणाऱ्या नायिकाप्रधान असतात अन् हे सर्व पडद्यावरील आदर्श हिरो-हिरोइन पदोपदी नाडणाऱ्या जुलमी,भ्रष्ट व्यवस्थेशी तोंडी लावण्या करिता रोमान्स करीत संघर्ष करून सर्वमान्य व्हिलनला खल्लास करीत शेवट गोड करतात मग प्रेक्षक ही समाधानानी घरी जातात अन् हिरो-हिरोइन प्रसिध्दी मिळवित आपापली घरे भरतात.इथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संपवत व्यक्तिगत न्यायनिवाडा करते परंतू व्यवस्थेचं काय तीचे उत्तरदायित्व कुणाचे का केवळ हिरो-हिरोइन,व्हिलन बदलत राहणारे चित्रपट पाहत बोचेऱ्या वास्तवापासून पळ काढत समाधान मानायचे.
              व्यक्ती पेक्षा व्यवस्था श्रेष्ठ असेल तरच खऱ्या अर्थाने स्थिरता व समानता लाभू शकते.सर्व संकल्पना आपापल्या सोयीनुसार गृहित धरत जगताना आयुष्यात अनेक तरंग उमटले तर निभावून नेता येते परंतू जर का लाटा निर्माण झाल्यास नुकसानीची शक्यताच अधिक तेव्हा संकल्पना तपासून त्या तटस्थपणे आत्मसात करता आल्या तर अचानक उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीत अगदी अर्थिक आणिबाणीत देखिल अर्थ निश्चल झाले तरी मनाने निश्चल राहता येईल.
                 अर्थ मुलोही धर्मा ।

संदिप महामुनी
9637130206

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा