बिन पैशाचा तमाशा......!
अर्थ निश्चलीकरणाच्या निर्णयाने देश चांगलाच ढवळून निघाला अन् आठवड्याभरात जुने ५००/१००० रूपयाचे चलन जमा करण्यासाठीची मुदत देखिल संपेल तेव्हा निणर्याला ५० दिवस पुर्ण झाल्या प्रित्यर्थ त्याचा नेमक्या रद्द झालेल्या अन् जमा झालेल्या चलनाच्या आकडेवारीचा तसेच काळ्या पैशाचा सरकारी हिशोबासहित सरकारी निर्णयाचा लेखाजोखा यथावकाश सुवर्णक्षणी यथार्थपणे मांडला जाईल आपण त्याचे नेहमीप्रमाणे मुक साक्षीदार होऊचं.
या निर्णयानंतर तब्बल १२५ वेळा नियम बदलले त्यामुळे सामान्य जनते बरोबरच सरकार सुद्धा संभ्रमित होते तेव्हा अर्थशास्त्र हा विषय बहुतांशी पर्यायी असल्याने त्याच्या दुर्बोधते बद्दल वावडे असणे क्रमप्राप्तच आले तेव्हा डोक्याला जास्त ताण न देता आलिया भोगासी असावे सादर हा संस्कार गिरवणे उत्तम म्हणत देशभक्तीच्या वीररसाने स्वतःची करमणूक करावी एवढाच पर्याय आपल्या कडे उरतो.या निर्णयाने सोशल मीडिया वरील दोन्ही कडच्या प्रतिभाशाली वर्गाला संधी मिळाली अन् त्यांनी त्याचे सोने केले (आनंदाची बाब म्हणजे या सोन्यावर मात्र कोणताही कर अथवा कोणाची नजर नाही असो) काहींनी हे सोने मनमोहनी पद्धतीने येथेच्छ लुटले मग व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला म्हणून काही फरक पडत नाही.तसही व्यवस्थेने लोकांना गृहित धरलेले असते अन् सरकारने व्यवस्थेला.
या सगळ्या घडामोडीमधे अनेक मनोरंजक अन् आपल्या सारख्या पामरांना अचंभित करणाऱ्या घटना घडल्या.एकिकडे स्वतःच्या २०००रूपयांसाठी ३-४ तास रांगेत उभारून देशप्रेम व्यक्त करणारे तसेच स्वत:चे पांढरे केस काळे करायला सुद्धा वैतागणारे आपण अन् दुसरीकडे बिनदिक्कत १००/२०० कोटी काळ्याचे चुटकीसरशी पांढरे करणारे,१०-१० कोटी नविन चलनात लॉकर मधे ठेवणारे तसेच तिजोरीच्या चाव्या कनवटीला बांधून जमादारकीचा सौदा करणारे आधुनिक मनसबदार पाहिले की काही लोकं जास्तच समान असतात हे उमगते.एका बहाद्दराने वर्तमानपत्रात जुन्या नोटा बदलून देण्याची रीतसर जहिरातच दिली अन् ती वर्तमानपत्राने बिनदिक्कत छापली देखील ! त्याला वाटलं छोटी जहिरात असल्यामुळे नेहमीप्रमाणे जो गरजवंत असेल तोच बघेल नाहीतरी मसाज, लैगिंक समस्या निवारण,ज्योतिष सल्ला अश्या जहिरातींशी थोडाच संपादकाचा अथवा सरकारी खात्याचा दुरान्वये संबध असतो या त्याच्या प्रामाणिक भाबड्या आशावादाला सलामच ठोकला पाहिजे.
८ नोहेंबरनंतर बँके व्यतिरिक्त रद्दी झालेल्या नोटा राजकीय पक्षात देणगीरूपी गुंतवणूक करण्याची मुभा मिळाल्यामुळे किमानपक्षी काही ठेकेदाराचं तरी कोटकल्याण झाले तसेच २०००० रूपयापर्यंतचा व्यवहार गुप्त ठेवण्याचा व त्या पटीतच व्यवहार करण्याची मुभा असल्याने शिवाय जनता जर्नाधनाच्या सेवेचे पवित्र कार्य करण्याचे व्रत घेतले असल्याकारणाने अन्य कशाही प्रकारचे देशप्रेम व्यक्त करण्याची आवश्यकता नसल्याने त्यांना करमुक्त केलेले आहेच तेव्हा असा महत्वपूर्ण निर्णय सर्व पक्षांच्या पथ्यावर पडला त्यामुळे सर्वांनी आळी मिळी गुपचिळीचे धोरण कोणताच आक्रोश न करता स्विकारलेले आहे.
काळा पैसा संपवणे,नकली नोटांचे उच्चाटन,आतंकवादाची आर्थिक रसद तोडणे हा व्यापक उद्देश ठेवून घेतलेला निर्णय किती सफल ठरला ते येणारा काळ ठरवेलच परंतू कँशलेसच्या चकचकीत रँपरमधे तो सादर करून जर भूल पाडली जात असेल तर घडलेेला या बिन पैशाचा तमाशामुळे झालेले तथाकथित मनोरंजन नसून अंगावर येणारे बोचरे वास्तव असेल.कुठलाही भुकंप न होता काहीतरी चांगले घडो या आशावादावर वाट पाहत आहोतच.
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
