मनमौजी जगायचे....!
आज नेहमीप्रमाणे चहा पित बसलो होतो, सौ जेवण बनवण्यात व्यस्त होत्या अन् आमचे लाडके चिरंजीव राजवर्धन टिव्ही पाहण्यात गुंग होते अर्थात कार्टूनच चालू होते माझ्या मते आकार उच्चार बदलले तरी कार्टून्स गैर नाहीत कारण आपल्या लहानपणी सुद्धा ते आपल्याला खुणावत होतेच पण मोठेपण येता येता वास्तवात त्या प्रतिमा धुसर होत गेल्या इतकचं.या वास्तवाचे अचुक भान असणाऱ्या तमाम आयांचे प्रतिनिधित्व करत आमच्या अर्धांगिनी स्वयंपाकघरातूनच गरजल्या "अरे काय करतोयस गा** स्कॉलरशिपला बसलायस लक्षात आहे का विसरलास..." मग नेहमीची ठरलेली उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक वाटणारी काय करावे काय करू नये या सदरात मोडणारी सु भाषीतील घोकंपट्टी करून माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकत अहो बघतायना काही तरी सांगा त्याला अशी सुचना वजा आदेश दिला मी पण वडिलकीचे कर्तव्यरूपी सोपस्कार पार पाडणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत अरे काय करायचय,अवघड आहे पुढे म्हणत काही आदर्श तथाकथित यशस्वी लोकांची ऐकून ऐकून गुळगूळीत झालेली उदाहरण देत छातीत भरलेली हवा मोकळी केली.तुला नेमके काय करायचेय ह्या उत्तराची अपेक्षा न ठेवता विचारलेल्या प्रश्नाने ठरलेला शेवट करावा हा प्रघात पाळत चहाचा घुटका घेतला अन् चिरंजीवाच्या आकस्मिक उत्तराने एकदम ठसकाच लागला.उत्तरच तसे होते " मनमौजी जगायचे".१२ वर्षीय मुलाचे उद्गार ऐकून मी अन् सौ दोघेही स्तब्ध होऊन त्याचाकडे पाहत राहिलो.थोड्याश्या अंतरालाने मला त्याच्या उस्फूर्त व मनस्वी उत्तराने समाधान वाटले कारण आपल्यातील प्रत्येकालाच असे जगायची सुप्त महत्वाकांक्षा असते अन् ती कधीतरी नक्कीच पुर्ण होईल या आशेवर आपण आपल्या आयुष्याचा सारीपाट मांडत असतो.
खरतर मनमौजी जगणे म्हणजे मनाला वाटेल तसे बंधन नसलेले स्वैर असे आपणास वाटते पण प्रत्यक्षात कुठल्याही कामात मन रमणे नाहीतर रमवणे म्हणजे मनमौजी कारण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचे भान अन् मनाला शिस्त असेल तसेच कल्पना व वास्तव यातील तफावत ओळखून ती स्विकारण्याची मानसिकता असेल तरच आपण कोणतेही काम आनंदाने करू शकू व तीच त्यातील मौज आहे.मनमौजीपन हे काय साध्य नव्हे तर तो आयुष्याकडे पाहण्याचा व जगण्याचा दृष्टिकोन होय.आपण एक स्वतंत्र व्यक्ती असलो तरी या निसर्गाचा व समाजाचा घटक आहोत तसेच त्याचे नियंत्रण एकतर्फी नाही हे विसरून चालणार नाही.असो राजवर्धनच्या उत्तराने पुन्हा एकदा उजळणी झाली अन् हो आजपासून नव्या वर्षात २०१७ मधे पदार्पण करीत आहोतच तेव्हा त्याला तो मनमौजी दृष्टिकोन लाभो ही सदिच्छा व्यक्त करीत आपणही मनमौजीपणे जगुया त्यासाठी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा...!
संदिप महामुनी
९६३७१३०२०६