मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

विलेक्षण....!

सध्या राजकारण म्हणज दे टाळी जमलं नाहितर टाळाटाळी मग घसा बसोसतर एकमेकांच्या करा टवाळी अन् वाजवा टाळी एवढंच उरलय.
निवडणूक म्हणजे थापांचा पूर अन् पैशाचा धुर.
विकासाच्या नावानं पाडून भूल भावनांच्या बाजाराला मात्र मतांचा कौल.
आज ह्यों उद्या त्यों कितीही फिरवली भाकरी तरी परिस्थिती ज्यों की त्यों.
ईलेक्शन फिवरमधे टैक्स फ्री एन्टरटेनमेंटचा शो, उतरला फिवर की धक्क्याची लोकल अन् खड्याच्या रस्त्यासाठी ठेकेदारांची टक्केवारीची शक्कल.
यादीत असला की कामा पुरता राजा
एकदाका बोटाला लागली शाई मग कसलं मत अन् कसली किंमत श्रद्धा सबुरी मेरा साई.

संदिप महामुनी.

सोमवार, २३ जानेवारी, २०१७

आभासाचे प्रतिक......!

           
             
                 प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधीला औरंगाबाद येथे नुकतीच एक घटना घडली ती म्हणजे स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या त्रिसदस्यीय समितीतील तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.कारण त्यांनी पालिका आयुक्तांकडे औरंगाबादचे अव्वल शहरांच्या यादीत नाव टाकण्यासाठी पाच लाखांची लाच मागीतली.विशेष म्हणजे या पाहणी पथकातील सदस्यांनी या कामानिमित्ताच्या मुक्कामात २५/३०हजाराची दारू ढोसली असे देखिल निदर्शनास आले आहे.सार्वजनिक स्वच्छतेबाबत कागदोपत्री जागरूक असणारे असले (दारू)अमलदार म्हणजे माकडाच्या हातात कोलीतच.नंतर फार फार तर चौकशी समितीचा फार्स करीत वेळकाढूपणा होईल मग ते प्रकरण प्रोसिडिंगच्या फेऱ्यात अन् कारवाई गुलदस्त्यात.
                भारतीय राज्यघटना जगात अनेक बाबतीत उत्कृष्ट राज्यघटना तसेच जगातील सर्वोत्कृष्ट मुल्यांचा परिपाक असणारी मुलभूत मुल्ये असून देखिल सध्या सर्व स्तरांवर एखाद्या मुलभूत विकासापेक्षा त्याच्या दृश्य स्वरूपातील प्रतिकात्मक सोपस्कारावर अधिक लक्ष केंद्रित करून त्याचाच प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला जातो मग ती सरकारी धोरणे असो की जगण्याची रीतभात.त्यासाठी मग माध्यमं छापील ते ईलेक्ट्रानिक कोणतेही असो.
                  सरकारी दवाखान्यात एखादा अनोळखी गंभीर रूग्ण असो की मृतदेह त्यांचा वेळवर व योग्य उपचार असो की अंतिम सोपस्कार ज्या बेफिकिरपणे केला जातो ते पाहता मानवी संवेदना कितीही बोथट असल्या तरी मोबाईल ची रिंगटोन मात्र भक्तिमय ठेवलेली असते.भिंतीवर 'रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' असे छान प्रभावी वाक्य लिहून ठेवायचे सरकारी नियमानुसार कर्मचाऱ्यांचा सर्व कोटा भरला अन् सोशल वर्कर नावाने पदं भरली की झाले भले त्याने नेमून दिलेली सेवा मन लावून न का करो पगार व अन्य सोयीसुविधांचा मेवा नेमाने घेण्याबाबत मात्र ते आग्रही असतात रुग्ण मात्र अनास्थेचे बळीच ठरतात.दुसरीकडे सुरक्षा सप्ताहाचे निमित्त साधून हप्ता गोळा करण्यात मग्न असणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक शिस्तीपेक्षा नियमांच्या अज्ञान व उल्लंघनातच फायदा दिसतो.एकिकडे अशी वेगवेगळ्या सरकारी खात्यातील वेगवेगळ्या तऱ्हा अन् दुसरीकडे निवडुन आलेले लोकप्रतिनिधी त्या त्या सभागृहात लोकांच्या हितासाठी चर्चा करायची सोडून अर्धे अधिवेशन आरडाओरडा करण्यातच घालवतात अन् स्वतःचे पगार,भत्ते न चर्चा करता बहुमताने वाढवतात.एकिकडे संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हणत पायरीवर डोके ठेवणारे स्वतःच्या निर्णयाचे उत्तरदायित्व स्विकारत संविधानात्मक मत मांडून चर्चा करण्यापेक्षा व्टिटरला प्राधान्य देतात.चरख्यावर सुत काततानाचा फोटो टाकून एखाद्याची अहिंसावादी प्रतिमा पुसताही येत नाही अन् अंगिकारताही येत नाही.तसेच केवळ 'हलवा सेरेमनी' करून देशाची आर्थिक घडी व्यवस्थित करणारा अर्थसंकल्प गोड होऊ शकत नाही तर त्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय निरपेक्ष अन् कठोरपणे तसेच दुरदृष्टि ठेवून घेतले पाहिजेत.
              अशा सगळ्या वरवरचा आदर्शवाद मिरवण्यातच समाधान मानणाऱ्या व शोधणाऱ्या मानसिकतेचे आपण सर्व बळी ठरतो आहोत अन् केवळ आदर्शवाद मुल्यांचा प्रतिकात्मक स्विकार करून मुलभूत बदलाचा आभास निर्माण करतो आहोत आता ही आभासाची प्रतिकेच आपले जगणं व्यापून टाकतायेत तेव्हा जगणं प्रतिकात्मक होण्या आधी सावध होऊया..!

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

शनिवार, १४ जानेवारी, २०१७

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

               
                   सुर्याचा मकर राशीत प्रवेश(संक्रमण) होत त्याचे उत्तरायण सुरू होते अन् यालाच आपण मकरसंक्रांत म्हणत ती साजरी करतो.थोडक्यात काय एका टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्याकडे प्रवास करताना आधी काय वाईट घडलं असेल तर ते सोडून या निमित्ताने चांगली सुरवात करायला स्वतःला व दुसऱ्याला संधी देणे इतकचं अन् ती गोड असेल तर तिळात गुळ...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, १ जानेवारी, २०१७

मनमौजी जगायचे....!

                     
                        मनमौजी जगायचे....!

                     आज नेहमीप्रमाणे चहा पित बसलो होतो, सौ जेवण बनवण्यात व्यस्त होत्या अन् आमचे लाडके चिरंजीव राजवर्धन टिव्ही पाहण्यात गुंग होते अर्थात कार्टूनच चालू होते माझ्या मते आकार उच्चार बदलले तरी कार्टून्स गैर नाहीत कारण आपल्या लहानपणी सुद्धा ते आपल्याला खुणावत होतेच पण मोठेपण येता येता वास्तवात त्या प्रतिमा धुसर होत गेल्या इतकचं.या वास्तवाचे अचुक भान असणाऱ्या तमाम आयांचे प्रतिनिधित्व करत आमच्या अर्धांगिनी स्वयंपाकघरातूनच गरजल्या "अरे काय करतोयस गा** स्कॉलरशिपला बसलायस लक्षात आहे का विसरलास..." मग नेहमीची ठरलेली उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक वाटणारी काय करावे काय करू नये या सदरात मोडणारी सु भाषीतील घोकंपट्टी करून माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकत अहो बघतायना काही तरी सांगा त्याला अशी सुचना वजा आदेश दिला मी पण वडिलकीचे कर्तव्यरूपी सोपस्कार पार पाडणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत अरे काय करायचय,अवघड आहे पुढे म्हणत काही आदर्श तथाकथित यशस्वी लोकांची ऐकून ऐकून गुळगूळीत झालेली उदाहरण देत छातीत भरलेली हवा मोकळी केली.तुला नेमके काय करायचेय ह्या उत्तराची अपेक्षा न ठेवता विचारलेल्या प्रश्नाने ठरलेला शेवट करावा हा प्रघात पाळत चहाचा घुटका घेतला अन् चिरंजीवाच्या आकस्मिक उत्तराने एकदम ठसकाच लागला.उत्तरच तसे होते " मनमौजी जगायचे".१२ वर्षीय मुलाचे उद्गार ऐकून मी अन् सौ दोघेही स्तब्ध होऊन त्याचाकडे पाहत राहिलो.थोड्याश्या अंतरालाने मला त्याच्या उस्फूर्त व मनस्वी उत्तराने समाधान वाटले कारण आपल्यातील प्रत्येकालाच असे जगायची सुप्त महत्वाकांक्षा असते अन् ती कधीतरी नक्कीच पुर्ण होईल या आशेवर आपण आपल्या आयुष्याचा सारीपाट मांडत असतो.
                   खरतर मनमौजी जगणे म्हणजे मनाला वाटेल तसे बंधन नसलेले स्वैर असे आपणास वाटते पण प्रत्यक्षात कुठल्याही कामात मन रमणे नाहीतर रमवणे म्हणजे मनमौजी कारण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचे भान अन् मनाला शिस्त असेल तसेच कल्पना व वास्तव यातील तफावत ओळखून ती स्विकारण्याची मानसिकता असेल तरच आपण कोणतेही काम आनंदाने करू शकू व तीच त्यातील मौज आहे.मनमौजीपन हे काय साध्य नव्हे तर तो आयुष्याकडे पाहण्याचा व जगण्याचा दृष्टिकोन होय.आपण एक स्वतंत्र व्यक्ती असलो तरी या निसर्गाचा व समाजाचा घटक आहोत तसेच त्याचे नियंत्रण एकतर्फी नाही हे विसरून चालणार नाही.असो राजवर्धनच्या उत्तराने पुन्हा एकदा उजळणी झाली अन् हो आजपासून नव्या वर्षात २०१७ मधे पदार्पण करीत आहोतच तेव्हा त्याला तो मनमौजी दृष्टिकोन लाभो ही सदिच्छा व्यक्त करीत आपणही मनमौजीपणे जगुया त्यासाठी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा...!

संदिप महामुनी
९६३७१३०२०६