'भुकेला कोंडा अन् निजेला धोंडा' ही म्हण मी नुसती ऐकली होती मात्र कमीतकमी गरजेचे वर्णन करणे अन् ती अनुभवणे किंबहुना भोगणे हे कल्पनातित आहे.
आज वर्तमानपत्रातील एका वृद्ध दांपत्याविषयी बातमी वाचली अन् मन हेलावून गेलं. सोलापूरातील श्रमिक वसाहतीत राहणाऱ्या माचर्ल वृद्ध दांपत्यांनी गरीबी व शारीरिक असमर्थते मुळे चक्क कोळसा खाल्ला...! मी कधी विचारही करू शकत नाही इतकी वाईट अन् हताशाजनक कृती एखादा हतबलपणे करू शकतो.
संजय गांधी निराधार योजनेमुळे त्यांची सुरवातीची काही वर्षे बरी गेली परंतू काही तांत्रिक कारणामुळे ती बंद झाली ती पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक ठिकाणी खेटे घालूनही त्यांच्या हाती निराशाच आली अन् सरतेशेवटी हाती कोळसा घ्यावा लागला हे समाज म्हणून आपले अपयश आहेच पण त्याही पेक्षा व्यवस्था कशी रेड्यावर पाऊस पडल्याप्रमाणे वागते तसेच केवळ कागदोपत्री खर्डेघाशी करण्यात कामकाजपुर्तीचे समाधान मानत मनाशी मनाचे लिंकींग न का होवो पण तांत्रिक आधार लिंकचा आग्रह मात्र केला जातो इतकचं.
पण कोळसा कितीही उगळला तरी काळाच त्याप्रमाणे लाखो कोटीचा कोळसा घोटाळा एकवेळ पचवतील पण एखाद्याला खराखुरा कोळसा पचवताना शरीरापेक्षा मानसिक दृष्ट्या किती जड गेले असेल हे अधिक मन सुन्न करणारे आहे.जोपर्यंत या व अशाप्रकारच्या घटना आजुबाजूला घडत असतील तोपर्यंत प्रगतीशील, विकास हे शाब्दिक बुडबुडेच ठरतात.
लहानपणी मुलांना चांगल्या संगोपनासाठी आईवडिलांची गरज असते अन् पुढे वृद्धापकाळात त्यांना मुलांच्या आधाराची गरज भासते परंतू सगळ्यांनाच ती मिळतेच असे नाही.तेव्हा कौटुंबिक आधार सरकारी अथवा सामाजिक आधारा इतकाच किंबहुना त्याहून अधिक महत्वाचा असतो.तो प्रत्येकाने जपण्याचा व जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे तरच निराधार करणारी लिंक तुटेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा