बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

Live बलात्कार ...


              आजकाल पुन्हा एकदा सामुहिक बलात्कार अन् निर्घृण हत्या याने देश ढवळून निघाला आहे.तसं तर रोजच कुठे ना कुठे अत्याचार घडतच असतात पण एखाद्या घटनेची बातमी सर्व माध्यमे व्यापून टाकतात मग वृत्तवाहिन्यांवर सविस्तर घटनाक्रम दाखवत ढासळलेल्या कायदा व्यवस्थेची चर्चा, निदर्शने, मेणबत्त्या फेऱ्या पुन्हा नविन घटना घडेपर्यंत काही दिवस चालू राहतात.
मला आठवतय साधारण वीस वर्षांपूर्वी गणेश उत्सव साजरा करताना जीवंत देखावा सादर करण्याची प्रथा होती त्यात एका मंडळाने live बलात्कार अशा नावाने देखावा सादर केला होता नेहमी प्रमाणे आकर्षण व उत्सुकता ताणली गेल्याने ते बघायला स्त्री-पुरूषांनी तोबा गर्दी केली होती.पोरकट वयात असल्याने मी पण रीतसर रांगेतून आत गेल्यावर पाहतोय तर मोठ्या काचेच्या बलात कार ठेवली होती अन् सगळे आशाळभूत नजरेने एकमेकांकडे पाहात स्वतःच्या मुर्खपणाला हसत बाहेर पडत होते.त्या प्रसंगाचा तेव्हा काही विचार केला नाही परंतू आज अस वाटतं दाखवणारे व बघणारे अशा दोन्ही घटकांतून बनलेला समाज त्यावेळी अन् आत्ताही बलात्कार या विषयी गांभीर्याने विचार करण्यापेक्षा उत्सुकता अथवा विनोदबुद्धीने घेतो यातच आपली सामाजिक मानसिकता अधोरेखित होते.
अगदी हैद्राबादच्या घटनेनंतरही त्याहून भयंकर घटना घडलीय त्यात चार मद्यधुंद माणसांनी रस्त्यावरच्या भटक्या कुत्रीला पकडून तीचे पाय अन् तोंड बांधून सामुहिक बलात्कार केला व नंतर काठीने बेदम मारहाण केली हा सर्व प्रकार एका रिक्षाचालकाने पाहिला अन् अती झाल्याने आरडाओरडा केला त्यामुळे ते चौघे फरार झाले.अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या या प्रसंगाने मन सुन्न झाले मग या विकृतीला काय म्हणणार कोणती मोजपट्टी घेऊन फरक शोधणार.महाराष्ट्र स्वतः जातीभेदाच्या सामुहिक अत्याचाराचे खैरलांजी ते मराठी आरक्षणाची ठिणगी पेटलेल्या कोपर्डी पर्यंत अनेक प्रसंगाचा साक्षीदार आहे.मात्र बलात्कार प्रवृत्ती थांबलेल्या नाहीत अन् दुर्दैवाने थांबणार देखिल नाहीत.कारण ज्या भौतिक परिस्थितीत मनुष्य वाढतो त्यात पुरषी अहंकार अन् बळाचा वापर करणे तसेच स्त्रीला शोभेची बाहुली व वासना शमवण्यासाठीचे साधन समजणे हेच संस्कार लादले जातात मग चित्रपट असो की जाहिरात आपण मात्र बाई वाड्यावर या अशा थुकरट विनोदावर यथेच्छ हासतो अन् अंगविक्षेप करत नाचतो देखील.
मुलींनी खासकरून शहरातील स्वातंत्र्याचा गैर अर्थ काढत अती आत्मविश्वासाने वावरणे योग्य नाही.अवेळी अन् अनोळखी अथवा जोखमीच्या ठिकाणी योग्यती काळजी घ्यावी.मला नागपूर येथे घडलेला एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे एक महिला जी स्वतः कर्नल होती अन् स्वतःच्या नवरा व मूलासोबत प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांची गाडी अडवत नवऱ्याला व मुलाला मारहाण करून तीच्यावर अत्याचार केले नंतर तीने न केलेल्या चुकीसाठी केवळ न्यायालयातच नव्हे तर आप्तस्वकीयांशी देखील लढा द्यायला लागला.यातून समाज मानसिक दृष्ट्या परिपक्व व व्यवस्था आग्रही नाही हेच स्पष्ट होते.
जोपर्यंत बलात्कार होण्याला कारणीभूत घटकांचा तसेच सार्वजनिक मानसिकतेचा सर्वसमावेशक व गांभीर्यपूर्वक विचार केला जात नाही तोपर्यंत बलात्कार live (जीवंत)... च राहणार.

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

#defeminism....

  
     Avoiding luxury doesn't mean to downtrodden a human being
#defeminism.... 





सत्तेचे शैय्यासोबती....

सत्तेचे शैय्यासोबती....

            महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक, त्यातील लागलेले निकाल अन् त्यातून तथाकथित स्थिर सरकार स्थापनेसाठी गेला महिनाभर चाललेले दावे-प्रतीदावे, राष्ट्रपती राजवट ते रामप्रहरीचे शपथग्रहण हे केवळ धक्कादायकच नव्हे तर उबग येऊन व्यवस्थेबद्दलची विश्वासार्हता गमावणारा घटनाक्रम आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी तसेच दिशादर्शक विचारधारा असणाऱ्या महापुरुषांचा वारसा सांगणार्‍या राज्यात सत्तेसाठी जो आट्यापाट्या चा खेळ खेळण्यासाठी जीवाचा आटापिटा चालू आहे तो पाहता कोणतेही तत्व अन् त्यातून निर्माण झालेली विचारधारा याला कसलीही किंमत राहिलेली नाही मग कोणीही कुठल्याही पक्षात असो.काल आपण कोणत्या पक्षात होतो आज कुठल्या पक्षात आहे काल कुणासाठी घशाला कोरड पडे पर्यंत अर्वाच्य शब्दात गरळ ओकली आज कुणाच्या गळ्यात गळे घालून मिरवतोय हे सर्व संग्रहीत करण्याची अद्यावत तंत्रज्ञान असताना कशाचीही तमा न बाळगता सोयीस्कर सारीपाट मांडला जातो.कारण आज अन् आत्ता केवळ याचाच हट्ट व स्वार्थ विचारात भिनला की मग नैतिकता व दूरगामी परिणाम यासर्वाला तिलांजली दिली जाते.
या सर्वाच्या मुळाशी ज्या समाजातून हे नेते तयार होतात तो समाज अर्थात जनता आहे कारण या जनतेचा पायाच भुसभुशीत तकलादू नैतिकतेवर तसेच दांभिक आदर्शवादावर आधारित आहे अन् म्हणूनच उघड उघड थिल्लरपणा करताना या लोकनेत्यांना काडीचीही शरम वाटत नाही.कारण लोकांनाच परखड ठाम कृती पेक्षा अलंकारिक, पुस्तकी वाक्यात घोळलेले तथाकथित विवेचन अपेक्षित असते.साचेबद्ध गोलमोल बोलण्यालाच सुसंस्काराचे कोंदण लाभल्यामुळे असु दे म्हणत निर्बुद्धपणे ते स्विकारले जाते.मी निष्ठेला जागून, कुणाशीही आप-पराभाव, शत्रुभाव तसेच ममत्व न बाळगता.... अशाप्रकारे शपथ घेणारे व तथाकथित उच्च पदावर कार्यरत असणारे परंतू त्या पदास नालायक असणारे असे शपथ देणारे यातून जो शपथ नावाचा सोपस्कार केला जातो यातच सर्व दांभिकपणा अधोरेखित होतो वास्तविक शपथ नावाच्या संपुर्णपणे उत्तरदायित्व व शब्दाला जागणाऱ्या अश्या गृहितकावर अधारित संकल्पनेचेच सार्वजनिक हसे झाले आहे.
जनतेचे भले करण्याची भलामण करणाऱ्या व लोकशाही रितीरिवाजाप्रमाणे निवडून आलेल्या तथाकथित लोकप्रतिनिधींची वागणूक ही सत्तेसाठी हपापलेली आहे कारण ज्याला कुणाचे भले करायचे असेल तर सत्ता ही एक माध्यम असू शकते पण एकमेव साध्य नव्हे.परंतू सत्तेच्या माध्यमातून स्वतःचा व आपल्या आप्तस्वकीयांचा जो काही आर्थिक, राजकीय फायदा साध्य करण्यासाठी ज्याप्रमाणे आसुसलेले आहेत ते पाहता सत्तेचे प्रामाणिक भागिदार होण्यापेक्षा सत्तेचे शैय्यासोबती होण्यातच धन्यता मानणारे आहेत हिच लोकशाहीची शोकांतिका आहे.


गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

निरागसपणातील दृष्टि...!


        बालपणीच्या निरागसपणातील दृष्टि मोठेपणी जेव्हा दृष्टिकोन असते तेव्हा आयुष्य हे बालसुलभ होते.

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

आयता घरोबा अन् राजकारणाचा खेळखंडोबा ...!

आयता घरोबा अन् राजकारणाचा खेळखंडोबा ...!

            सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 'अतिशय गोंधळ वाढवणारी व दूरगामी गंभीर परिणाम करणारी ' असेच तीचे वर्णन योग्य ठरावे. काही वर्षांपूर्वी एखाददुसरा नेता पक्षांतर करत असे तेव्हा त्याचा दुष्परिणाम मर्यादित पण एकंदर राजकीय व्यवस्थेवर न जाणवण्या इतपत असायचा परंतू सध्याच्या सत्ताधारी पक्षाने जो नविनच फंडा आणून ज्या घाऊक पद्धतीने नेत्यांची आयात केली आहे ती पाहता विरोधी पक्ष नावाला सुद्धा शिल्लक राहिल का अशी शंका येते.
सैरभैर झालेले सत्तेत असलेले व नसलेले नेते एकंदर राजकीय दृष्ट्या अपरिपक्वतेचे तसेच सुस्पष्ट विचारधारेचा अभाव असल्याचे द्योतक आहेत. उठता बसता ज्या लोकशाहीच्या नावाने गळा काढत असतात त्या लोकशाहीत विरोधी पक्षच अस्तित्वात नसेल अथवा नाममात्र असेल तर ती केवळ कुडमुडी लोकशाहीच उरेल याचे भान सुज्ञ जणांना असणे आवश्यक आहे.
सत्ताधारी पक्ष साम दाम दंड भेद वापरून विरोधी पक्षाला जेरीस आणून, बघताय काय सामील व्हा नाहीतर बघूनच घेतो अशा अर्विभावात वावरतायत अन् विरोधी पक्षातील नेते इडा पीडा टळो म्हणत कळपात सामील होतायत. सामील होणारे जर खरच प्रामाणिक असतील तर कर नाही त्याला डर कशाला पाहिजे त्यांच्या स्वविकासाच्या व्यवहारातच पाणी मुरत असेल तर वरकरणी जनविकासाची बोंब मारून काय फायदा अन् अशांकडून नैतिक विचारधारेची अपेक्षा ठेवून देखिल काय उपयोग सरते शेवटी उपेक्षाच हाती राहणार.
गळती लागलेली टाकी वापरून प्रवास सुरळीत पार पडेल का? अन् दुरुस्तीचा प्रयत्न करून देखिल न थांबणाऱ्या गळतीमुळे भांबावलेले गळकी टाकी प्रमुख हतबल अन् उद्विग्न होणे स्वाभाविक आहे त्यातूनच मुरब्बी व मुत्सद्दी साहेबांसारख्याचा तोल ढासळत असेल तर परिस्थिती बिकट झाली आहे असे समजावे. परंतू अशा परिस्थितीला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत कारण केवळ साम दाम दंड भेद वापरून निवडुन येण्याची पात्रता असणारे मग ते गाव गुंड असो, खाणसम्राट असो, शिक्षणसम्राट असो की उपद्रव मुल्य असणारे विशिष्ट जाती-धर्माचे नेते असो अशांची मोळी बांधून सत्तेचा सोपान मिळवण्याची सवय लागलेल्यांना लोककल्याणकारी विचारधारेचा पाया होता का मग विचारधारेशी निष्ठावान सहकाऱ्यांची मजबूत फळी कशी घडणार.
दुसरीकडे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स समजणारा पक्ष 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे सोयीस्कर विसरत बकासुरासारखा खात सुटला आहे तेव्हा अशा प्रवृतीला अजिर्णतेचा आजार संभवतो. सतरंज्या उचलून वेगळ्या विचारांसाठी झटणारे व त्या पक्षाचा झेंडा घेतलेले जुने जाणते कार्यकर्ते या मेगा भरतीमुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक अन् अशा निष्ठावंताना गृहित धरून त्यांचे नेते राजकीय आखाडा तयार करीत असतील अन् बघा कोण कोणते पाटील अन् राजे आमच्या तंबूत येतात अशी शेखी मिरवत टाळ्या घेत असतील तर टाळ्या वाजवणारेच अशांना टाळा मारण्याची भाषा करतील. स्थानिक अन् स्थलांतरित हा वाद जिथे सर्व जगाला भेडसावतोय तो पक्ष पातळीवर पोचायला वेळ लागणार नाही अन् याची सुरुवात देखिल काही ठिकाणी झाली आहे. तेव्हा या पोटफुगीचा धोका स्वपक्षाला देखिल होऊ शकतो. स्थुल व कृश दोन्ही अवस्था शारीरिक दृष्ट्या अयोग्य तसेच संख्याबळाचा टोकाचा फरक हा देखील सुदृढ लोकशाहीला घातकच.
या साऱ्यात सध्या बघ्याची भूमिका घेणारे अन् उद्याचे तथाकथित मतदार राजे कोणता झेंडा घेऊ हाती म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणे कोणता शिक्का मारू माथी विचारत फिरणार आहेत. मग मात्र आयता घरोबा मांडणाऱ्यांनी व तशा प्रकारची खेळी खेळणाऱ्यांनी राजकारणाचा कसा खेळखंडोबा चालविला आहे हे केवळ पाहण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.


गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

HATE U to HATS OFF....

I HATE MY TEACHER

he is reason for my scars
he shouts at me
he likes it when I sweat, when I fall
when I can't even breathe
he is reason for my pain
he doesn't care for my sleep
i hate because he never gives up
because he is always right
and most of all
i hate him because
because he believe in me
more than i do in myself

THANK YOU COACH



Congratulations
world Champion 🏆
P V Sindhu

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

Happy world photography day...!

#Happy #world #photography #day...!


#ताडपत्रीची कुशी अन् वीटेची उशी
झोप असावी तर अशी...



#उजळणाऱ्या मनाशी बालपणीचा संवाद

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

नैसर्गिक समन्वय ...!


नैसर्गिक समन्वय ...!
निसर्ग अन् मानवाचा संबंध परस्पर पुरक असावा किंबहुना तो असतो परंतू आपण जेव्हा निसर्गाच्या अफाट क्षमतेला गृहीत धरतो तेव्हा येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी किती असमर्थ आहोत याची जाणीव होते.
जलमय झालेल्या अर्ध्या महाराष्ट्राने व त्यात अडकलेल्या हजारो कुटुंबे, पशू यांनी याचीच जाणीव करून दिली आहे.
कालनियमाप्रमाणे सर्व काही पुर्ववत होईल परंतू उरलेल्या काही कटू आठवणी कायम राहतील मग आता तरी आपण काही शिकणार आहोत का?
वरवर पाहता ही आपत्ती नैसर्गिक असली तरी मानवाने निसर्गाला गृहित धरून केलेला अर्निबंध हस्तक्षेप देखिल तितकाच जबाबदार आहे. काही वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी अभद्र युती करत विकासाच्या नावाखाली बिल्डर धार्जिणे धोरण राबविले जातात अन् नैसर्गिक नदी, नाले, ओढे व त्यासाठी असणारे पर्यावरण पुरक नियम धाब्यावर बसवून अनाधिकृत अतिक्रमणे उभी केली जातात. हीच बांधकामे मताच्या राजकारणाच्या सोयीसाठी नियमित देखिल होतात. शासन अजून पोहचलेले नाही, लोकप्रतिनिधी गायब आहेत अशी तक्रार करणारे पूरग्रस्त अशावेळेस सोयीस्कर मौन बाळगतात. खरतरं लोकप्रतिनिधींना तसेच प्रशासनाला प्रश्न विचारण्याची तीच योग्य वेळ असते. आजार होण्यापुर्वीच जर काळजी घेतली तर होणारी हानी आपण टाळू शकतो परंतू अशा धोरणात्मक वागण्याला आपल्याकडे नेभळटपणाचं लक्षण समजले जाते. मात्र जेव्हा महापूरा सारखी गंभीर परिस्थिती उद्भवल्या नंतर आपल्यातल्या माणुसकीला जास्तच पाझर फुटतो अन् अशा घटनेचे भावनिक अनुषंगाने अवलोकन सुरू होते अगदी या प्रतिकूल परिस्थितीत देखिल आमचा प्रतिनिधी कसा सर्वात आधी पोहचला याची वारंवार उजळणी करत प्रसारमाध्यमे आपले इति कर्तव्य पार पाडतात. नैसर्गिक मानसिकते नुसार संकटसमयी लोक एकत्र येतात मदतीचा हात देतात ते योग्यच परंतू अशावेळेस इंधनावर दुष्काळ अथवा तत्सम आपदे करिता लावण्यात येणारा अतिरिक्त कर जेव्हा शासन गोळा करत असते अन् रोजच्या इंधनाची खपत बघता तो आकडा किती मोठा असेल याची आपल्याला सहज कल्पना येईल तेव्हा त्या रकमेचा विनियोग सरकारने करीत त्याचा तपशील पारदर्शकपणे जाहीर केला पाहिजे अन् आपण देखील तो जाणून घेतला पाहिजे.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, पोलीस, स्थानिक प्रशासन आपापले कर्तव्य व्यवस्थित पार पाडतात परंतू त्यांच्यावर ही वेळ कमीत कमी यावी यासाठी नैसर्गिक संपत्तीचे म्हणजे नदी, नाले, ओढे, जंगल यांचे व्यवस्थापन, नदीतील पाणी पातळीच्या निळी/तांबडी रेषांचा संख्याशास्त्रीय अभ्यास, राज्याराज्यातील धरण धोरण यावर समंजसपणे तसेच आग्रही भूमिका घेतली पाहिजे. खरतरं लोक व लोकप्रतिनिधी यांच्यातील ध्येय-धोरण संबधीत नैसर्गिक समन्वय असणे हेच खऱ्या लोकशाहीचे लक्षण आहे.
संदीप महामुनी.

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

माऊली..माऊली..माऊली..



 ज्ञानीया वारीच्या उगमाची होई इथे सांगता
अंतरंगाची ओढ फक्त तुझ्या दर्शनाची आता

"बा विठ्ठला तु जगाचा होऊनी
आज भेटी मज तु माऊली रूप घेऊनी"

माऊली ..माऊली ..माऊली..


#NaturalDiamonds.....

#NaturalDiamonds
... 

सोमवार, ८ जुलै, २०१९

#GoogleGuy.....


       गोगलगाय अन् पोटात पाय असे म्हणतात पण आजकाल च्या धावपळीच्या आयुष्यात ते संथ व शांतपणे जगण्याची गरज शिकवणारी  #GoogleGuy




सोमवार, १ जुलै, २०१९

#Yellowism



       

Yellowism is an autonomous phenomenon in contemporary visual culture. It derived from the visual arts and despite this fact, is not classified as art, what is in accordance with its essence.
Yellowism: 'Neither art, nor anti-art . . . it is about yellow'
'Examples of Yellowism can look like works of art, but are not works of art




बुधवार, १ मे, २०१९

माझ्या तमाम मराठीबांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

माझ्या तमाम मराठी बांधवांना 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....




मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजत मागे सरे
मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
वादळापरी आम्ही पुढेच चालतो,
जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो
मराठा कधी न संगरातुनी हटे,
मारुनी दहास एक मराठा कटे
सिंधु ओलांडूनी, धावली संगिनी, पाय आता न मागे फिरे
मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
व्हा पुढे आम्हा धनाजी, बाजी सांगती,
वीर हो उठा कडाडतात नौबती
विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी,
पूर्वजांपरी आम्ही अजिंक्य संगरी
घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी, मृत्यु आम्हा पुढे घाबरे
मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
भारता आम्ही तुलाच देव मानतो,
हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो
राखतो महान आमची परंपरा,
रक्त शिंपुनी पवित्र ठेवतो धरा
ह्याच मातीवरी प्राण गेला तरी, आमची वीर गाथा उरे
मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजत मागे सरे



बुधवार, २४ एप्रिल, २०१९

पोरकट लोकशाहीचा थुकरट उत्सव....


              अतिशय उदात्त अन् उमद्या हेतूने प्रेरित लोकशाहीचा स्विकार आपण केला त्यासाठी आवश्यक अन् उपयुक्त संविधान देखिल लागू केले. जनतांत्रिक प्रक्रियेतून लोकप्रतिनिधींची निवड केली जात खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य यावे म्हणून आपण आग्रही राहिलो. परंतू आज ७० वर्षानंतरही केवळ ५०-६०% मतदान होत असेल तर आपली लोकशाही खरचं सुदृढ झाली का रोडावली. केवळ लोकशाहीचा उत्सव म्हणत सोपस्कार अन् सोयीस्कर मानसिकतेचे प्रदर्शन मांडणार असू तसेच उदासीन राहणार असू तर आलेल्या परिस्थितीला दोष देण्याचा अधिकार आपण गमावून बसतो.
आजदेखील उमेदवारांची पात्रता ही कागदोपत्री अन् निवडून येण्याची कसब यावरच आधारित असेल अन् तथाकथित सत्ताभिलाषी राष्ट्रीय पक्ष देखिल संख्याबळाचा डाव खेळत असतील तर जनता जनार्दनाचे नव्हे आकडेमोड करणाऱ्या हिशोबनिसांचेच सरकार येणार. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख असो की महिन्याला ६०००रुपये आमचं ठरलय,स्टाईल ईज स्टाईल अशा जुमल्यावर किंवा टॅग लाईन व व्यक्तिगत खालच्या पातळीवरील टीका यावर जर निवडणूकीच वारं फिरत असेल तर मग जाहीरनामा, वचननामा याचा एका बाजूला सोपस्कार अन् दुसऱ्या बाजूला सोयीस्कर विसर पडणारच.
निवडणूक आयोग व तिची कार्यप्रणाली म्हणजे बिगबॉस मालिकेतील त्या अज्ञात व्यक्ति प्रमाणे नियमाचं तुणतुणं वाजवत अधिकाधिक प्रेक्षकांचे मनोरंजन कसे होईल ते पाहायचे एवढीच उरते. मला वैयक्तिक निवडणूक आयोग भारतीय मतदारांना अल्प बुद्धी गृहीत धरून अथवा स्वतःच्या बुद्धीने निर्णय न घेणारा अस समजत नियम बनवतो असे वाटते. जनता देखिल स्वतःला तसेच समजत वागते मग प्रगल्भता येणार कोठून. कुठला पुतळा आहे हे ही माहित नसणारे अन् त्याकडे ढुंकूनही न पाहणारे पायरीला पाचशे असताना निवडणुकी पुरते पुतळे झाकून इति कर्तव्य बजावल्याचे समाधान मानण्यात काय हशील. हात चिन्ह असेल तर सगळ्यांनी ते खिशात ठेवायचे काय.
ईव्हीएम मशीन असो की मतपत्रिका जोपर्यंत मतदानाचा खरा उपयोग अन् ताकद समजत नाही तोपर्यंत त्या प्रक्रियेचा फायदा उठवणारेच अग्रभागी राहणार अन् बाकीचे मेंढरासारखे फरफटत जाणार.
जोपर्यंत मुलभूत शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडत नाही अन् सुज्ञ मतदारांचा टक्का वाढत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रौढ लोकशाही निर्माण होणार नाही. मग अशा पोरकट लोकशाहीचा उत्सव साजरा करणे म्हणजे थुकरट विनोदच ठरतो. 

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

निरागसपणा....

            
         
  
            मिझोरम मधिल एक मुलगा सायकल चालवत असताना त्याच्या सायकलखाली कोंबडी चे पिल्लू आले तेव्हा ते पिल्लू घेऊन तो थेट दवाखान्यात गेला अन् जवळचे सर्व पैसे देत त्या कोंबडीच्या पिल्लावर उपचार करा असे तेथील कर्मचाऱ्यांना सांगू लागला. तेव्हा ते आश्चर्यचकित तसेच भावूक झाले. 
ज्या निरागसपणे त्याने कृती केली ती कौतुकास्पद तर आहेच पण मोठ्यांना बोध देणारी आहे. 
Innocence is "u r not afraid about ur guilt but accept it bravely  & try to repair it with all ur efforts" 
Mistakes r uncontrollable & uncomfortable too but keep innocence & be innocent life is beautiful.... 

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

तारुण्याच वारं की तारुण्याचा वारू...


              चकाचक आयुष्यात कचाकच भरलेला सेक्स अन् पचापच थुकाव तस शिव्यांनी बरबटलेले बोलणे म्हणजे आजकालच्या पिढीची कलात्मक स्वातंत्र्य अन् सो कॉल्ड स्पेस ची वास्तववादी कल्पना. या मार्गाने जाणारी प्रत्येक गोष्ट आपलीशी मानने, हक्काची समजणे अन् तेच खरं बेफिकीर जगणं वाटणे हे ठराविक वयाच्या बेभान उसळत्या रक्ताचा जागतिक तोंडावळा असतो अन् थोड्याफार फरकाने सर्वांना तो लागू असतो. फरक आहे तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील समाज माध्यमाच्या सुकाळाचा. आज वास्तव अन् अभासी यातील पुसटशी रेषा या माध्यमांनी केव्हाच पुसून टाकली आहे. आपल्याच प्रतिध्वनींच्या कोषातून समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्यातून निर्माण झालेल्या एकाकी बुद्धिमत्तेचा निष्कर्ष त्यांना एकीकडे एकलकोंडे तर दुसरीकडे दुभंगलेल्या मानसिकतेचे बनवत आहे. अशांना मग आयुष्य जगताना थिल्लरतेचेच आकर्षण व थिल्लरतेचाच आदर्श वाटतो. मग त्यांना शिस्त अन् सुसंस्काराच्या गोष्टी नेभळटपणाची लक्षण वाटतात. तेव्हा प्रचार नावाची यंत्रणा व राजनीतिक धोरण तज्ञ अशांना गृहीत धरून स्वतःच्या हातचे बाहुले बनवत स्वतःचीच विषयपत्रिका (अजेंडा ) राबवतात.  मग दुधारी शस्त्रा प्रमाणे अशा तरुणांची संख्या राष्ट्राची ताकद न राहता ती राष्ट्रीय समस्या बनते. मनोरंजनातून झालेला प्रवास नकळत मनोरुग्णतेत परावर्तित होत जातो. ही क्रयशक्ती योग्य मार्गाने हाताळणे हे शासन म्हणून राज्यकर्त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.त्यावर ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्याऐवजी त्यांना भुलथापा देऊन सत्तेसाठी चुचकारण्यावर भर देणारे व त्यासाठी आगतिक झालेले लोकनेते होण्यातच धन्यता मानणारे कसला देश घडवणारेत त्यांनाच ठाऊक. तरूणांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक सबलीकरण हाच खरा विकासाचा पाया आहे अन् त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. तेव्हा तारूण्याच वारं वाहू द्यायचे का तारूण्याचा वारू दौडावयाचा हे त्यांनीच ठरवायचे आहे. 

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

नैतिकतेचे गोडवे अन् सद्सद्विवेकबुद्धीची कडू मात्रा...

नैतिकतेचे गोडवे अन् सद्सद्विवेकबुद्धीची कडू मात्रा...
               भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. काही ढोबळ निकषांनुसार हे सत्य असले तरी खरोखरीच तसेच असेल व त्याचा देशातील शेवटच्या घटका पर्यंत लाभ होत असेल याची खात्री देता येत नाही.आतमधे पोकळ, किडलेल्या व्यवस्थेला वरवरची मलमपट्टी करण्यात धन्यता मानणारे व सगळे आलबेल आहे असे भासवणारेच अधिक.
सध्या या लोकशाहीचा उत्सव निवडणूकीच्या माध्यमातून साजरा होणार आहे अस अलंकारिक भाषेत तथाकथित बुद्धिजीवी म्हणत असले तरी सामान्यपणे लोकशाहीचा अर्थ अन् निवडणूकीच्या माध्यमातून अपेक्षित मतितार्थ खरच कळत असेल असे मला वाटत नाही.स्वार्थाचा झेंडा घेणारे व देणारे उन्मादी उत्साहित लोकशाहीचा खरा उत्सव साजरा करण्यापेक्षा एक सोपस्कार एवढ्याच मानसिकतेतून पाहत असतात.
सत्ताधारी सत्ता टिकवण्यासाठी तर विरोधी पक्ष सत्ता मिळवण्यासाठी आतूर असतात मग त्यासाठी साठमारी ते हाणामारी अन् फोडाफोडी ते तडजोडी सर्व पर्याय खुले असतात कारण सर्वसामान्य जनतेला तिच्याच कर्मदरिद्र्यामुळे गृहीत धरलेले असते. नुकत्याच एका जेष्ठ अशा जाणत्या राजाने मी माझ्या घरातील बालहट्ट पुर्ण करू शकतो परंतू दुसर्‍याच्या घरातील बालहट्ट पुर्ण करू शकत नाही असे वक्तव्य केले तसेच दुसर्‍या मर्द मराठी सेनाप्रमुखाने आम्ही स्वतःच्या मुलाबरोबर दुसर्‍यांचेही लाड पुरवतो असे सांगितले यावर तिथे हशा अन् टाळ्या झडल्या अन् ते बघणाऱ्याला व ऐकणाऱ्यांना त्यांच्या हजरजबाबी वक्तृत्व कलेचे कोण कौतुक वाटले.एवढीच आपली प्रगल्भ भुमिका.परंतू प्रगल्भ लोकशाहीसाठी असणारी निवडणूक प्रक्रिया ही काय बायका-मुलांचे हट्ट अन् लाड पुरवायला आंदण दिले की काय?  असा प्रश्न मतदाराला किंवा पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्याला पडत नाही हीच लोकशाहीची खरी शोकांतिका आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यां पासून मतदारां पर्यंत सर्वांना गाजर दाखवत खिशात ठेवण्याची किमया त्यांना चांगलीच अवगत आहे.मग असले लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे राजकारणी जन सेवक नसून वरकरणी चुचकारणारे सत्ता सेवकच असतात.
उघड उघड स्वार्थकारण करणारे पैशाच्या व संस्थेच्या मक्तेदारीमुळे तसेच लाचार व तुमच्या साठी कायपण म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे फुरफुरत असतात अनैतिकतेचे पाढे गिरवणारेच तथाकथित नैतिकतेचे गोडवे गात असतात.खरी लोकशाही अंगी बाणवायला मात्र सद्सद्विवेकबुद्धीची कडू मात्राच घ्यावी लागते.

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

अब तुम्हारे हवाले वतन साथियों....

अब तुम्हारे हवाले वतन साथियों....

                        देश म्हणजे केवळ डोंगर-पर्वत किंवा नदी-समुद्र यानी वेढलेला भुप्रदेश नव्हे तर त्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा समुह म्हणजे देश.या देशाचे पर्यायाने इथे राहणाऱ्या लोकांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी स्वखुशीने खडतर मार्ग निवडत वेळप्रसंगी स्वतःच्या ईच्छा आकांक्षांना दुर्लक्षित करत स्वसुखाचा त्याग करून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता -50°C असो की 50°C सदैव खडा पहारा देत सीमेवर तैनात राहणारा सैनिक म्हणजे इथे राहणाऱ्या तमाम लोकांच्या सुरक्षित भावनेचा आधारस्तंभच होय. सुरक्षित भावना ज्यामुळे आपण आपापली दिनचर्या बिनदिक्कत चालू ठेवू शकतो. ज्या मध्ये माझ्या मते नुकत्याच झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे विशेष काही बदल झाला नसावा कारण अजून देखिल सीमेवर तैनात असलेला तो जवान डोळ्यात तेल घालून बाह्य शत्रूवर लक्ष ठेवून आहे.काळजीत असतील ती त्यांची कुटुंबे बाकी आपापल्या कुटुंबकबिल्यासोबत सेल्फीमग्न असतील. निषेधाचे इती कर्तव्य पार पाडून देशाच्या एकता व अखंडता यासाठी आवश्यक गोष्टी न करता सोयीस्कर साचेबद्ध एकांगी विचारसरणी शेअर करण्यात मश्गुल सोशल मीडियालिस्ट पुन्हा पाट्या टाकण्यात धन्यता मानतील.मग बलिदान का व कुणासाठी वर वर देशप्रेमाची उकळी फुटणारे  किंवा आम्ही सुद्धा सोबत आहोत अशी उबळ येणारे यांच्यासाठी,
का या देशात राहून धर्माधारित शत्रू राष्ट्राचे गोडवे गाणारे यांच्यासाठी, हाच प्रश्न प्राणाची आहुती देताना मनात येत नसेल, देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक जवानाच्या या भावना नसतील.मग सहा फुटाचा देह जेंव्हा पावशर मांसाच्या तूकड्यात तिरंग्यात लपेटून घरी येतो तेव्हा त्यापेक्षा अधिक बोथट विचारसरणीची गर्दी पाहून त्याच्या आत्म्याला काय यातना होत असेल.                                                          माणसांपासून बनलेला समाज अन् समाजसमुहापासून बनलेला देश वैचारिक दृष्ट्या सुसंस्कृत अन् सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकालाच पार पाडायची आहे. प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिक व व्यापक हितासाठी योगदान दिले पाहिजे याच देशसेवेची अपेक्षा मनी बाळगत, अब तुम्हारे हवाले वतन साथियों म्हणत स्वतःचे प्राण अर्पण करत तो आपले कर्तव्य पार पाडतोय गरज आहे ती आपण आपले कर्तव्य पार पाडण्याची.....
                        जय हिंद...!



गुरुवार, २४ जानेवारी, २०१९