बुधवार, ९ जानेवारी, २०१९

गोठलेली सद्सद्विवेकबुद्धी अन् समतोल विचारांची ऊब...



              आज एक बातमी वाचण्यात आली, कठैली, मुज्जफरानगर, उत्तरप्रदेश येथे एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शॉल घातली अन् त्याच्या पुढे शेकोटी पेटवून ठेवली याची स्थानीक यंत्रणांनी दखल घेत त्या व्यक्तीची चौकशी केली असता थंडी पासून संरक्षण करण्यासाठी आपण असे केले असल्याचा खुलासा त्याने केला.
सदरची व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा निष्कर्ष काढत त्याला सोडून देण्यात आले मग प्रश्न असा उरतो जर सदर व्यक्ती खरोखरच मनोरुग्ण असेल (कोणत्या वैद्यकीय चाचणी अथवा अधिकृत व्यक्ती नुसार ठरवले हे गुलदस्त्यातच आहे असो) तर त्याच्या योग्य मानसिक आरोग्यासाठीच्या उपाययोजनांची जबाबदारी न घेता यंत्रणा त्याला मोकाटच सोडणार असेल तर मग या यंत्रणेच्या आरोग्याच काय ती निरोगी आहे का केवळ कायदेशीर सोपस्कार पार पाडल्याबद्दल स्वतःचेच अभिनंदन करायचे. बर दुसरा मुद्दा असा या थंडीच्या लाटेचे कवतिक सोहळ्यात अनेक प्रार्थनास्थळात सदर मुर्तीला स्वेटर घालणारे व ती बातमी नवलाईने छापणारे मनोरुग्ण नव्हते का? का अशा गोष्टींना श्रद्धा अथवा भावनेचे कोंदण करीत बुद्धिभेद करायचा.
              एकतर कोणत्याही विचारधारेचा पुतळा बनवणाऱ्या अन् त्याच्याच उंची नूसार बौद्धिक उंची तपासणाऱ्या आपल्या अलिकडील संस्कृतीत असे कित्येक मनोरुग्ण अभिमानाने मिरवताना तसेच त्यापुढे माना तुकविणारे कोणताही जाती, धर्म अथवा पक्ष असा भेदाभेद न करता मोठ्या प्रमाणात आढळतात. अशावेळेस यंत्रणा हातावर हात ठेवून असते अन्यथा हातात हात घालून वावरते.
             विचारधारेपेक्षा कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ नसते किंबहुना ती नसावी तरच समाज मन निरोगी अन् मानवतावादाला अनुकूल असेल अन्यथा विचारधारेची शेकोटी पेटवून कृत्रिम ऊब निर्माण करणाऱ्या सत्ताभिलाषी धेंडांना त्यावरच आपली पोळी भाजून घेण्यातच रस असेल.आपण मात्र समतोल विचारांच्या मशाली पेटवून अशा धेंडांना धडा शिकवायचा हाच निर्धार कोणत्याही परिस्थितीत सद्सद्विवेकबुद्धी गोठवून टाकणार नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा