शुक्रवार, ८ मे, २०२०

उषःकाल होता होता काळरात्र झाली....


            कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली एक एक दिवस पुढे सरकत असताना एकीकडे विशाखापट्टणम येथिल वायुगळतीची दुर्घटना ताजी असताना औरंगाबाद येथे १६ मजूर रेल्वेच्या मालगाडी खाली चिरडले गेल्याची बातमी आली अन् मन सुन्न झाले.
अदृश्य शत्रुशी सामना करत असताना लॉकडाऊन नावाच्या आधुनिक शस्त्रानीशी लढताना ते शस्त्र हाताळताना प्रत्येक जण आपापल्या परिस्थीनुसार तसेच गरजेनुसार बुद्धी वापरणार हे सत्य आपण नाकारू शकत नाही.गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात कदाचित महसुली उत्पन्नाच्या गरजेनुसार सरकारला व तथाकथित अर्थव्यवस्थेच्या योद्ध्यांसाठी देखिल ती नसेल परंतू गरीबीतील भुकेचा शाप भोगणाऱ्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचं घर,गाव सोडून वाट मिळेल तिकडे जाणे ही तेव्हा देखील केवळ गरज नसून अपरिहार्यता होती अन् आजदेखील अंधकारमय भविष्याच्या सावटाखाली एक एक दिवस ढकलताना गड्या आपुला गाव बरा अन् आपल्या माणसाची ऊब अधिक सुरक्षित वाटणे देखिल स्वाभाविक अन् सहाजिकच व त्यासाठी पाय फुटले तिकडे जाणे क्रमप्राप्त आहे. कदाचित भरल्यापोटी अन् आपापल्या कुटूंबकबिल्या सोबत आपापल्या घरी सुरक्षित असणाऱ्या आपल्याला किती बोचणार हा संवेदनशीलतेचा प्रश्र्न आहे.
रेल्वे रूळाचा आधार घेत मार्ग शोधणाऱ्या जीवांसाठी त्याच रेल्वे रूळाची मृत्यूशैय्या व्हावी यापेक्षा दुर्दैव ते काय तेव्हा चालून चालून दमलेल्या शरिराला अन् थकलेल्या मेंदूला रेल्वे बंद आहेत तरी रेल्वे रुळावर झोपावे का असले प्रश्र्न पडत नाहीत कळते ते फक्त इच्छित स्थळी लवकरात लवकर पोचणे.
बातम्या मधे रेल्वे रुळावर विखुरलेल्या भाकऱ्यांमध्ये त्या मजूरांचे मांसाचे तुकडे गोळा करतानाचे दृश्य पाहणे स्तब्ध करणारे होते मग त्यांच्या उरलेल्या सहकाऱ्यांनी ते डोळ्यासमोर पाहणे कीती काळजाचा थरकाप उडवणारा असेल हे तेच जाणोत.
साखरझोपेतील स्वप्नांचा उषःकाल होता होता काळरात्र झाली.
पण पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवण्या शिवाय गत्यंतर नाही. मजूर ही त्यांच्या कामाची तसेच परप्रांतीय ही त्यांच्या जन्म ठिकाणांची ओळख असू शकेल पण माझ्या दृष्टीने ते भारतीय आहेत अन् एक भारतीय म्हणून मी त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो.