सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

संयत प्रतिक्रियेचे वेदनादायी स्थलांतर...!




वर्तमानपत्राचा ई-पेपर  झाल्यामुळे मोबाईल वरच ते जास्त वाचलं जातंय.प्रत्यक्ष वर्तमानपत्र अन् ई-पेपर मधे फरक एवढाच आहे की वर्तमानपत्रातील बातमीवर वाचकाची प्रतिक्रिया नोंदवायला पत्रव्यवहाराची वाट पाहावी लागते परंतू ई-पेपर मधे तात्काळ नोंदवता येते अन् इतरांना ती दिसते व त्यावर व्यक्त होता येते.हे किती योग्य-अयोग्य,किती चांगले-वाईट याबद्दल मी साशंक अन् थोडा निराश आहे कारण देखील तसंच घडलय मोबाईल वर मारूती चितमपल्ली यांची 'एका अरण्यॠषीचे वेदनादायी स्थलांतर' या मथळ्याखाली बातमी वाचत वाचत शेवटाकडे गेलो असता बातमीच्या खाली असलेल्या कमेंट कडे लक्ष गेले अन् धक्काच बसला एका वाचकाची (?) त्या बातमीवर प्रतिक्रिया (?) दिसली "आता सोलापूर ला येऊन चादरी विकत बस ".

मला हे वाचून राग आला परंतू त्याऐवजी त्याची समज व एकंदरीतच समाज माध्यमांतील समाजाची दिशा याविषयी अधिक चिंता वाटली.एका ८८वर्षाच्या गृहस्थाने संपूर्ण जीवन निसर्गातील पशूपक्षी,वृक्ष,मासे यांची अभ्यासपूर्ण माहिती गोळा केली व त्याचे पुस्तक रूपी कोश निर्माण केले ते एकाकीपणा मुळे त्यांचे आवडते ठिकाण सोडून नाईलाजाने गावी सोलापूरला स्थलांतर करतायेत या बातमी वर काय प्रतिक्रिया देतात. खरंतर ती प्रतिक्रिया नसून त्याच्या आजारी मानसिकतेची प्रतिक्षिप्तक्रीया आहे.त्यावर कहर म्हणजे अशा महाभागाने  स्वत:चे नाव एक हिंदुस्तानी असे ठेवलेले आहे अन् या सगळ्यांवर कडी म्हणजे त्या कमेंटला शेकडोंनी लाईक मिळतात.
एकंदरीतच सध्याचे वातावरण मग ते वास्तव असो की आभासी हे कमालीचे दुषित झाले आहे मध्यंतरी नाटकी वाह्यात प्रतिक्रियांच्या सामन्यात सगळ्यांनी ते अनुभवलं आहेच पण नुकतीच क्रिकेटची मॅच हरली म्हणून महेंद्रसिगं धोनीच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याची भाषा तथाकथित क्रिकेटचा फॅन करत असेल अन् टीआरपीचा झोल करून चॅनेल स्वतःचा अजेंडा राबवत गल्लेभरु पत्रकारिता करीत असेल तर समाजभान येणार कसे केवळ मनात येणाऱ्या भावना नोंदवण्याची घाई अन्‌ त्यासाठी तेवढीच तत्पर ट्रोलधाड ही समाजाची दिशाभूल अन् तरूण पिढीला दिशाहीन बनवते आहे.मग असा एक आभासी हिंदुस्तानी अन् त्याच्या विचारधारेचे शेकडो आभासी समर्थक हे केवळ एक उदाहरण आहे वास्तवात असे हजारो हिंदुस्तानी अन् त्यांचे लाखो समर्थक देशात छुप्या रीतीने वावरत असतील अन् ते द्वेष व थिल्लरपणाने बरबटलेले असतील तर ते खरे समाजाच्या अन् पर्यायानं देशाच्या वैचारिक आरोग्यासाठी घातकच आहे.याचे गांर्भिय वेळीच ओळखले व यावर वेळीच उपाययोजना केल्या तरच वर्तमान काळात संयत प्रतीक्रियेचे होणारं जे वेदनादायी स्थलांतर आहे ते रोखणे शक्य होईल.



शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

अदृश्य शत्रू अन् कागदी खेळाडू...


         सध्या अदृश्य शत्रू मुळे घडणाऱ्या दृश्य परिणामांची दाहकता पदोपदी जाणवत असताना अनेक अदृश्य शत्रू अधोरेखित करणाऱ्या धक्कादायक बातम्या देखील समोर येत आहेत.अशीच एक बातमी वाचण्यात आली ती म्हणजे क्रिडा उपसंचालक यांनी नुकतेच १९९७ ते २००५ दरम्यान २५९ जणांनी बोगस क्रिडा प्रमाणपत्र मिळवले असून त्यातील राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार खेळाची कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी सरकारी नोकरीत असणाऱ्या ५% राखीव जागांचा गैरफायदा घेत ३२ जणांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत असे स्पष्ट करीत त्यांच्यावर कारवाई केली आहे.विशेष म्हणजे सर्व ३२ जण प्रथम वर्ग अधिकारी म्हणून महाराष्ट्रात जिल्हाधिकारी,अधिक्षक, आयुक्त, शिक्षणाधिकारी अशा महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.

        शासन व्यवस्थेत महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारे हे महाभाग ज्या खोट्या पायावर उभे आहेत ते पाहता पायाभूत सुविधा निर्माण करणारी व्यवस्था किती तकलादू अन् दिव्यांग आहे हेच स्पष्ट होते.असे जिल्हाधिकारी कोणत्या प्रामाणिक अन् पारदर्शक व्यवहाराचा आदर्श ठेवणार तसेच असे शिक्षणाधिकारी कशाप्रकारे नैतिक शिक्षण तपासणार हा प्रश्र्नच आहे.

      एकीकडे खेळाच्या पातळीवर असणाऱ्या कफल्लकतेवर बोगस प्रमाणपत्राच्या कल्पकतेने मात करण्यासाठी तयार असणाऱ्या कागदी खेळाडूंचा भरणा भ्रष्टाचाराच्या ऑलिम्पिक साठीच जास्त लायक आहे. काही एक बौद्धिक क्षमता असलेले म्हणून त्यांच्याकडे पाहून काही एक स्वप्न बाळगणारे अनेक तरुण तसेच त्यांच्याकडे आशेने व सन्मानाने पाहणारा समाज यांच्या विश्वासाला जो तडा गेला आहे व जे अपरिमीत नुकसान झाले आहे ते दीर्घकाळासाठी न भरून येणारं असतं.

       टम्ब्लिंग व ट्रॅम्पोलीन अशा माहिती नसलेल्या खेळाच्या या चमकोगीरी करणाऱ्या खेळाडूं पेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन दिले तर देशाला ऑलिम्पिक मध्ये पदक तरी मिळेल परंतू महत्त्वाचे पद पदरात पाडून घेण्यासाठी कोलांट्या उड्या मारणारे असले कागदी खेळाडू देशाच्या प्रगतीसाठी अदृश्य शत्रूच आहेत व त्याचे दृश्य परिणाम व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्यात प्रतिबिंबीत होत राहील.