रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

मोबाईल मॅनिया....

 

म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये अशी एके काळच्या मराठी भाषेत म्हण होती परंतू हल्ली त्याचा मतितार्थ जास्त महत्त्वाचा आहे. कारण वर्तमानात घडणाऱ्या बातम्या बघितल्यावर नेमके हेच प्रतीबिंबीत होतंय अन् याचा प्रत्यय प्रकर्षाने येतोय.
एका आईने स्वतःच्या १३ वर्षाच्या मुलीला मोबाईलच्या अती वापरावरून सातत्याने होणाऱ्या वादातून स्वतःच्याच ११ वर्षाच्या मुला समोर कायमचं संपवलं आणि या प्रकाराने चिडलेल्या मुलाने आपल्या आईला भोसकून ठार केले.
एका अल्पवयीन मुलाने आपल्या अल्पवयीन बायकोला मोबाईलसाठी दुकानदाराला विकले.
एका सहा वर्षे वयाच्या मुलीला ८,१०,११ वयोगटातील तीन मुलांनी मोबाईल मधिल पॉर्न क्लिप‌ जबरदस्तीने दाखवण्याचा प्रयत्न केला अन् तीने या गोष्टीला नकार दिला म्हणून तीला दगडाने मारून टाकले.
या सर्व घटना नेमके काय प्रतीबिंबीत करतायंत सध्याचे पालक मुलांच्या मोबाईल व्यसनाधिनतेला अक्षरशः कावलेत अन् त्यासाठी ते इतकं टोकाचं पाऊल उचलतायत की अख्खं कुटुंबं त्यात उध्वस्त होतायंत दुसरीकडे आपल्या अल्पवयीन मुलांची लग्ने लावून आपले वैचारिक बुरसटलेपण अधोरेखित करताना डिजीटलायजेशन व आधुनिकतेच्या नावाखाली त्यांचीच मुलं ' बायको नको पण मोबाईल हवा ' असं म्हणतायत. तर तिसरीकडे या ८-१० वर्षाच्या मुलांकडे पॉर्न क्लिप‌ने भरलेले मोबाईल असतात अन् पालकांना त्याची फिकीर नाही किंबहुना स्वतःच्याच तथाकथित मनोरंजनासाठी पालकांनीच तो संग्रह जपून ठेवलेला असेल. नैसर्गिक बहर येण्या आधीच पोक्त पणाचं कोमेजलेपण लादलं गेले की नैसर्गिक खुजेपण अटळ आहे.
या बातम्या आपण केवळ अपवाद म्हणून पाहत असू शकतो परंतु ज्या पद्धतीने व वेगाने आधुनिकतेच्या नावाखाली नैतिकतेचा ऱ्हास होतो आहे ते पाहता हाच नियम होण्याचा धोका अधिक संभवतो.
मग प्रश्र्न असा पडतो की यात चुक नेमकी कशाची व कुणाची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बेसुमार प्रगतीची का केवळ कुणाच्या तरी दुनिया मुठ्ठी मध्ये घेण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी इनकमिंग ते रोजचा दिड-दोन जीबी डाटा मोफत वाटण्याच्या धोरणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या सरकारची.
तंत्रज्ञान विकसित झाले की स्वाभाविक व सहाजिकच माध्यमं देखील बदलत जातात. परंतु कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली ऑनलाईनचा जो सोपस्कार पार पडला गेला त्यात शिक्षण व्यवस्थेचे किती भल झालं अन् विद्यार्थ्यांचा कोणता शैक्षणिक विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे. सरकारी नाईलाजास्तव माकडाच्या हाती मात्र मोबाईल रूपी कोलीत दिलं गेलं हे नक्की. त्यातूनच वेब सिरीजच्या नावाखाली वारंवार अन् सहज उपलब्ध होणारा व्याभिचार , हिंसा व अर्वाच्य शिव्याने बरबटलेले संवाद नैतिकतेची व्याख्या बदलतायत अन् हेच सत्वहीन पोषण अंगवळणी पडते आहे. एखाद्या सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यासोबतच त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर व समाज व्यवस्थेवर होणारे दुरगामी दुष्परिणाम यावर धोरण राबवणाऱ्या जबाबदार यंत्रणांनी जास्त सजग असलं पाहिजे.
रिकामटेकड्या मनाला या तांत्रिक सुकाळाची जोड फार मोठा वैचारिक दुष्काळ निर्माण करत असताना तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असून त्याची फिकीर सरकार नामक यंत्रणेला नसेल अन् ती उदासीन व सुस्त असेल अन् निसर्ग आपल्याला नेहमीच संकटाची चाहूल देत असतो पण आपण मात्र झापडं लावून निसर्गालाच लहरी, तऱ्हेवाईक म्हणणार असु तर आपल्या सारखे करंटे आपणच. हा मोबाईल मॅनिया आपल्या तथाकथित भविष्याला गिळंकृत करीत असताना हताशपणे बघत बसण्यापेक्षा सुजाण नागरिकांनी जागृत होऊन समाजाला जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न केले पाहिजेत.

शनिवार, २९ मे, २०२१

शाश्वत सत्य...!

 

खरंतर आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षण स्वतःला बदलत जाणे त्यामुळे प्रत्येक क्षणाला काही ना काही शिकतच असतो पण लक्षात किती अन् कसं ठेवतो ते महत्त्वाचे व या प्रक्रियेचे सार म्हणजे आपल्याला असणारी जाणीव.
कोरोनाच्या महामारी ने मला काय शिकवलं याचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जिवंत आहोत यापेक्षा जगात महत्त्वाचं (आपल्या दृष्टीने) असं काही नाही.आपल असणं हे देखील अनिश्चित अन् शाश्वत सत्य आहेच पण आपण सारखं विसरतो तेव्हा रिमांयडर फ्राॅम यमलोक पण विशेष म्हणजे आपण आपलं असं जे काय व्यक्तीगत स्वातंत्र्य समजतो तसं देखील काही नसतं.आपण कृती न करता केवळ प्रतिक्रियात्मक जगत असतो.जस जशे अनुभव वाढत जातात तस तशे निष्कर्ष देखील बदलतात अन् ही प्रक्रिया कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अपुर्णच राहते.

आपल्याला सुखी राहायचं असेल तर एकतर अज्ञानी रहा किंवा निर्भीडपणे स्विकारा. आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा स्विकार करण्याचं ठरवतो तेव्हा आपण चिंतनशील होत त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.ज्या षडरिपूने ( राग,लोभ,मत्सर,द्वेष,भीती व चिंता ) आपण निसर्गतः व्यापलेले आहोत तेच आपल्या सर्व समस्येचे मूळ आहे किंबहुना आपल्या सतत चालणाऱ्या विचारचक्राला हेच षडरिपू प्रेरीत करत असतात. अन् यातूनच स्वतःच निर्माण केलेल्या समस्येच्या भ्रमरूपी जाळ्यात गुरफटत जात जगण्याचं सुख, समाधान हरवून बसतो.

आपण वरवर समानतेचा पुरस्कार करतो परंतू आपले सुख, समाधान आपण असमानतेतच शोधत असतो. सातत्याने तुलनात्मक दृष्टीने जगाकडे पाहत स्वतःचीच मनःशांती आपण गमावून बसतो. निसर्गाने निर्माण केलेल्या जीवसृष्टी कडे आपण तुलनात्मक दृष्टीने न पाहता जसं वैविध्यपूर्ण माध्यमातून पाहतो तोच दृष्टीकोन मानवाने इतर मानवा संदर्भात अंगिकारला पाहिजे.

सदगुरु वामनराव पै यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मला या समस्येच्या निराकरण करण्यासाठी उत्तम पर्याय वाटतो. एक म्हणजे " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " आणि त्यांनी सांगितलेली विश्वप्रार्थना " हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे." 

या दोन गोष्टी मनापासून आत्मसात केल्या तर आपण या षडरीपूं पासून अलिप्त राहून चांगले कर्म करण्यास प्रवृत्त होत एक चांगलं व्यक्तिमत्त्व अन् पर्यायाने चांगला समाज निर्माण करता येईल.

रविवार, ९ मे, २०२१

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातला समाज...!



आज १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खरंतर हा विषय मांडायला कुठल्याही औचित्याची गरज असता कामा नये परंतू सध्या सर्वजण अन् सर्व क्षण हे उर्त्स्फुत, सहज न राहता उत्साह पुरक अन् ठरवून घडवलेले असतात (म्हणूनच ते अधिक सत्वहिन, मुल्यहिन व बनावटी असतात) अन् अशावेळीच कुठल्याही भावना ओथंबून येतात म्हणूनच पोकळ जय घोष अथवा अभिवादन न करता काहीतरी वैचारिक मंथन व्हावे या उद्देशाने आजचा हा लेखन प्रपंच.

मुळातच कुठल्याही राष्ट्रपुरुषांच्या जीवन कहाण्या बघितल्यावर एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत केलेला वैयक्तिक संघर्ष अन् त्यातून निर्माण झालेल्या वैचारिक प्रगल्भतेतून इतरांसाठी उभारलेली क्रांती मग ज्ञानेश्वरांनी भोगलेला स्वसामाजिक बहिष्कार असो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनभुवलेले धर्माधारित पारतंत्र्यातील जुलुमशाही किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवलेला वर्णव्यवस्थेने माणूस म्हणून हिरावून घेतलेला जगण्याचा अधिकार सगळ्याच बाबतीत एकच गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे एखादाच अशक्य वाटणारे जीवीत कार्य करुन ठेवतो अन् इतरांनी ते अधिक पुढे नेणे तर दुरच पण एवढा काळ लोटूनही जे निर्माण केले ते टिकवून अंतिम स्तरापर्यंत झिरपवणे सुद्धा एक स्वप्नच राहिले आहे अन् याउपर ते पुर्ण करण्यासाठी यांनीच पुन्हा जन्माला यावे अशी विसंबून राहण्याची बेजबाबदार मानसिकता.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला काही एक कायदेशीर अधिकार दिले आहेत परंतू त्याचा आपल्या सोयीनुसार वापर करून घेतला की निवांतपणे आपापल्या उद्योगात रममाण व्हायचं परंतू बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने‌ वंचितांसाठी लढा उभा केला ते प्रत्येकजण मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असो आपापले जीवन जगताना त्या संवेदनशीलपणे ते अवलंबताना दिसतो का मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही पदावर काम करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्याही जातीधर्माचा एखादा रंजलेला, गांजलेला अथवा गरजू व्यक्ती आल्यास तुम्ही त्यांच्याशी कशाप्रकारे वागता यावरच तुमच्या विचारधारेत त्या त्या राष्ट्रपुरुषांचे किती अन् कसे विचार रुजलेत हे अधोरेखित होते.

आपल्या जनुकातून तसेच अनुभवातून आपल्या मेंदूत द्वेषाधिरीत‌ आपला अन् परका असे   विभाजन करणारी रेषा अस्तित्वात असते अन् कोणतेही शिक्षण अथवा राष्ट्रपुरुषांचे चरित्र ती रेषा पुसण्या ऐवजी अधिक ठळक करीत असेल तर ते त्या त्या व्यक्तींचे कोतेपण. जर आपल्याला एक चांगलं कुटुंब, चांगला समाज अन् पर्यायाने चांगला देश घडवायचा असेल तर आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात कोणत्याही जातीचा, धर्मांचा, वर्गाचा पुर्वग्रहदुषित द्वेष न करता निरपेक्षपणे सहकार्याची व उद्धाराची भुमिका घेतली पाहिजे तसेच राष्ट्रपुरुष हे कोणत्या समुहाचे नसुन प्रत्येक व्यक्तीच्या वैचारिक प्रबोधनाचे प्रेरणास्रोत असतात हा समज असेल तरच आपल्या राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातला समाज निर्माण करता येईल.

रविवार, २८ मार्च, २०२१

खरे डॅशिंग अन् खरे सिंघम...!

 काही अति भावनिक व एकांगी विचार असणाऱ्या लोकांना माझे विचार आवडणार अथवा पटणार नाहीत परंतू एखाद्या घटनेची दुसरी बाजू मांडावी असे मला वाटते म्हणून.

तर नुकतीच वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली तसेच त्यांनी यासाठी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वरीष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केले असल्याचे लिहिलं आहे. खरंतर हे सर्व दुर्दैवी आहे. परंतू मतभेद, वाईट किंवा मनाविरुद्ध वागणूक जगण्याच्या प्रत्येक धडपडीत सामावलेली आहे त्यासाठी एवढे टोकाचं पाऊल उचलणारी व्यक्तीचं किंबहुना तीचे सारासार विचार न करण्याची बुद्धी यासाठी अधिक जबाबदार आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षा देता समाजात ऐट, रूबाब असणारं एखादं अधिकाराच पद मिळवता अन् सगळं झालं असं तुम्हाला वाटतं परंतू निवडलेल क्षेत्र, त्याठिकाणी असणारे कामाचे स्वरूप, तिथं असणारा अनेक प्रकारचा हस्तक्षेप, ताण-तणाव तसेच सरकारी कामाच्या कार्यालयीन मर्यादा यातून आपला ठसा उमटवणारं आदर्श काम करणे या सगळ्या गोष्टींचा कितीसा विचार झालेला असतो. त्यातच महिला म्हणून दया भाव अन् विशेष कौतुक यांची शिदोरी तसेच माध्यमातून डॅशिंग, लेडी सिंघम अशा बिरूदावल्या देत दिलेली वारेमाप प्रसिद्धी अन् ती कनिष्ठ अधिकाऱ्याची असेल तर वरीष्ठ अधिकाऱ्यांना बोचणारं हा वास्तव मनुष्य स्वभाव (अर्थात माध्यमं देखिल अशा बातम्या दाखवून आम्ही कसे स्त्रीवादी आहोत हे दाखवण्यासाठी उतावळे असतात भले त्यांच्या क्षेत्रात किंवा सहकाऱ्यांची मुस्कटदाबी होत असते तेव्हा मुग गिळून गप्प राहणं पसंत करतात ) या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्वतःच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वापेक्षा अहंकारावर अधिक होतो अन् त्यामुळेच सारासार विचार न करता स्वतःच्या जीवनापेक्षा नोकरी जास्त प्रिय वाटते. दिपाली चव्हाण यांचे पती देखील सरकारी सेवेत आहेत म्हणजेच आर्थिक आधार असताना एकतर नोकरीच्या ठिकाणी तात्त्विक संघर्ष करावा अथवा जीवनात करण्यासाठी असंख्य पर्याय शोधावे त्या ऐवजी नोकरी सारख्या एका शुल्लक पर्यायासाठी तुम्ही तुमचं आयुष्य उधळून लावता याचाच अर्थ तो अधिकाराचा रुबाब अधिक मन व्यापतोय. माझ्या असं वाचण्यात आले की त्या गर्भवती होत्या जर ते खरं असेल तर मग जन्माला येणाऱ्या जीवाची देखील काहीही पर्वा वाटत नसेल तर तुम्ही आई व्हायचा संवेदनशील निर्णय घेताच कशाला.

खरंतर आत्महत्येला प्रवृत्त करण्याजोगे कुणी प्रयत्न केले असतील तर त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे परंतू केवळ या गोष्टीचा बभ्रा करण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाचं संतुलन न ढळू देता आपापले काम उत्तम करण्याची वृत्ती रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अन् असे प्रयत्न करणारेच खरे डॅशिंग व सिंघम असतात.



सोमवार, ११ जानेवारी, २०२१

टोमणे- विकृत मानसिकतेचा भाग

 

      एका महिलेने सासू सासरे सतत टोमणे मारत असतात यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी न्यायाधीशांनी हा प्रकार दैनंदिन जीवनाचा भाग आहे तेव्हा यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही असे मत मांडले.
अर्थातच हे मत बहुतेक सर्व साधारण लोकांना योग्य वाटू शकते परंतु त्याचा जाणिवपूर्वक मागोवा घेतला तर जी व्यक्ती या सततच्या अवहेलनेतून जाते तीला कोणत्या मनस्थितीतून जावे लागते याची संवेदनशीलपणे दखल न घेता केवळ त्या व्यक्तीला गृहित धरणे हे पुरोगामी विचारांच्या गप्पा मारणाऱ्या तथाकथित प्रगतीशील समाजालाही लाज आणणारे आहे. शारीरिक आरोग्य जेवढं आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे हा विचार तो देखील एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात प्रवेश केला असताना आपल्या गावीही नाही. कदाचित न्यायाधिश महाशयांचे बालपण लेक चालली सासरला , माहेरची साडी अश्या चित्रपटांच्या संस्कारात गेले असावे.
खरंतर याप्रकारच्या मानसिक त्रासाला महिलांना अधिक प्रमाणात सामोरे जावे लागत असले तरी लहान मुले, पुरुष यांना देखील याचा सामना करावा लागतो. सततचे टोमणे,अवहेलना यामुळे त्या व्यक्तीचे खच्चीकरण होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो अथवा त्यातून निर्माण झालेल्या व दबुन राहिलेल्या रागाचे रूपांतर एकतर मानसिक रोगांत किंवा हिंसक गुन्हेगारीत होऊ शकते. नुकतेच राजस्थान मधे एका एकवीस वर्षाच्या तरुणाने त्याच्या दहा वर्षांच्या चुलत भावाचा भर रस्त्यात ब्लेडने गळा कापला विशेष म्हणजे आजुबाजुचे लोक त्या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात मग्न होते. जेव्हा त्या तरूणाला ताब्यात घेतले तेव्हां त्या कृत्याचा त्याला कोणताही पश्चात्ताप नव्हता. मृत मुलाचे वडिल त्या तरूणाला तुला काही कळत नाही,जमत नाही असं बोलून त्याची सतत खिल्ली उडवत असत शिवाय त्यांनी त्याला शाळेत देखील जाऊ दिले नव्हते या सर्व गोष्टींचा परिणाम त्या तरूणाच्यमनावर झाला आणि त्याचा बदला त्याने त्याच्या मुलाचा खून करून घेतला. ही घटना सततच्या टोमण्याचे पर्यवसन एखाद्या भयंकर गुन्ह्यात होऊ शकते तसेच एखाद्याचे आयुष्य मातीमोल देखील होऊ शकते हेच दर्शवते. तेव्हां सततचे टोमणे हे दैनंदिन जीवनाचा भाग नसून टोमणे मारणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावातील विकृत मानसिकतेचा तो भाग आहे तेव्हा उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य तसेच राहत्या ठिकाणचं, कामाच्या ठिकाणचं वातावरण हे जेवढं मानसिक आरोग्याला पोषक, प्रेरणादायी तेवढां तो व्यक्ती तो समाज सुदृढ.