आज १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खरंतर हा विषय मांडायला कुठल्याही औचित्याची गरज असता कामा नये परंतू सध्या सर्वजण अन् सर्व क्षण हे उर्त्स्फुत, सहज न राहता उत्साह पुरक अन् ठरवून घडवलेले असतात (म्हणूनच ते अधिक सत्वहिन, मुल्यहिन व बनावटी असतात) अन् अशावेळीच कुठल्याही भावना ओथंबून येतात म्हणूनच पोकळ जय घोष अथवा अभिवादन न करता काहीतरी वैचारिक मंथन व्हावे या उद्देशाने आजचा हा लेखन प्रपंच.
मुळातच कुठल्याही राष्ट्रपुरुषांच्या जीवन कहाण्या बघितल्यावर एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत केलेला वैयक्तिक संघर्ष अन् त्यातून निर्माण झालेल्या वैचारिक प्रगल्भतेतून इतरांसाठी उभारलेली क्रांती मग ज्ञानेश्वरांनी भोगलेला स्वसामाजिक बहिष्कार असो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनभुवलेले धर्माधारित पारतंत्र्यातील जुलुमशाही किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवलेला वर्णव्यवस्थेने माणूस म्हणून हिरावून घेतलेला जगण्याचा अधिकार सगळ्याच बाबतीत एकच गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे एखादाच अशक्य वाटणारे जीवीत कार्य करुन ठेवतो अन् इतरांनी ते अधिक पुढे नेणे तर दुरच पण एवढा काळ लोटूनही जे निर्माण केले ते टिकवून अंतिम स्तरापर्यंत झिरपवणे सुद्धा एक स्वप्नच राहिले आहे अन् याउपर ते पुर्ण करण्यासाठी यांनीच पुन्हा जन्माला यावे अशी विसंबून राहण्याची बेजबाबदार मानसिकता.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला काही एक कायदेशीर अधिकार दिले आहेत परंतू त्याचा आपल्या सोयीनुसार वापर करून घेतला की निवांतपणे आपापल्या उद्योगात रममाण व्हायचं परंतू बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने वंचितांसाठी लढा उभा केला ते प्रत्येकजण मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असो आपापले जीवन जगताना त्या संवेदनशीलपणे ते अवलंबताना दिसतो का मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही पदावर काम करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्याही जातीधर्माचा एखादा रंजलेला, गांजलेला अथवा गरजू व्यक्ती आल्यास तुम्ही त्यांच्याशी कशाप्रकारे वागता यावरच तुमच्या विचारधारेत त्या त्या राष्ट्रपुरुषांचे किती अन् कसे विचार रुजलेत हे अधोरेखित होते.
आपल्या जनुकातून तसेच अनुभवातून आपल्या मेंदूत द्वेषाधिरीत आपला अन् परका असे विभाजन करणारी रेषा अस्तित्वात असते अन् कोणतेही शिक्षण अथवा राष्ट्रपुरुषांचे चरित्र ती रेषा पुसण्या ऐवजी अधिक ठळक करीत असेल तर ते त्या त्या व्यक्तींचे कोतेपण. जर आपल्याला एक चांगलं कुटुंब, चांगला समाज अन् पर्यायाने चांगला देश घडवायचा असेल तर आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात कोणत्याही जातीचा, धर्मांचा, वर्गाचा पुर्वग्रहदुषित द्वेष न करता निरपेक्षपणे सहकार्याची व उद्धाराची भुमिका घेतली पाहिजे तसेच राष्ट्रपुरुष हे कोणत्या समुहाचे नसुन प्रत्येक व्यक्तीच्या वैचारिक प्रबोधनाचे प्रेरणास्रोत असतात हा समज असेल तरच आपल्या राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातला समाज निर्माण करता येईल.