खरंतर आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षण स्वतःला बदलत जाणे त्यामुळे प्रत्येक क्षणाला काही ना काही शिकतच असतो पण लक्षात किती अन् कसं ठेवतो ते महत्त्वाचे व या प्रक्रियेचे सार म्हणजे आपल्याला असणारी जाणीव.
कोरोनाच्या महामारी ने मला काय शिकवलं याचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जिवंत आहोत यापेक्षा जगात महत्त्वाचं (आपल्या दृष्टीने) असं काही नाही.आपल असणं हे देखील अनिश्चित अन् शाश्वत सत्य आहेच पण आपण सारखं विसरतो तेव्हा रिमांयडर फ्राॅम यमलोक पण विशेष म्हणजे आपण आपलं असं जे काय व्यक्तीगत स्वातंत्र्य समजतो तसं देखील काही नसतं.आपण कृती न करता केवळ प्रतिक्रियात्मक जगत असतो.जस जशे अनुभव वाढत जातात तस तशे निष्कर्ष देखील बदलतात अन् ही प्रक्रिया कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अपुर्णच राहते.
आपल्याला सुखी राहायचं असेल तर एकतर अज्ञानी रहा किंवा निर्भीडपणे स्विकारा. आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा स्विकार करण्याचं ठरवतो तेव्हा आपण चिंतनशील होत त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.ज्या षडरिपूने ( राग,लोभ,मत्सर,द्वेष,भीती व चिंता ) आपण निसर्गतः व्यापलेले आहोत तेच आपल्या सर्व समस्येचे मूळ आहे किंबहुना आपल्या सतत चालणाऱ्या विचारचक्राला हेच षडरिपू प्रेरीत करत असतात. अन् यातूनच स्वतःच निर्माण केलेल्या समस्येच्या भ्रमरूपी जाळ्यात गुरफटत जात जगण्याचं सुख, समाधान हरवून बसतो.
आपण वरवर समानतेचा पुरस्कार करतो परंतू आपले सुख, समाधान आपण असमानतेतच शोधत असतो. सातत्याने तुलनात्मक दृष्टीने जगाकडे पाहत स्वतःचीच मनःशांती आपण गमावून बसतो. निसर्गाने निर्माण केलेल्या जीवसृष्टी कडे आपण तुलनात्मक दृष्टीने न पाहता जसं वैविध्यपूर्ण माध्यमातून पाहतो तोच दृष्टीकोन मानवाने इतर मानवा संदर्भात अंगिकारला पाहिजे.
सदगुरु वामनराव पै यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मला या समस्येच्या निराकरण करण्यासाठी उत्तम पर्याय वाटतो. एक म्हणजे " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " आणि त्यांनी सांगितलेली विश्वप्रार्थना " हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."
या दोन गोष्टी मनापासून आत्मसात केल्या तर आपण या षडरीपूं पासून अलिप्त राहून चांगले कर्म करण्यास प्रवृत्त होत एक चांगलं व्यक्तिमत्त्व अन् पर्यायाने चांगला समाज निर्माण करता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा