म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये अशी एके काळच्या मराठी भाषेत म्हण होती परंतू हल्ली त्याचा मतितार्थ जास्त महत्त्वाचा आहे. कारण वर्तमानात घडणाऱ्या बातम्या बघितल्यावर नेमके हेच प्रतीबिंबीत होतंय अन् याचा प्रत्यय प्रकर्षाने येतोय.
एका आईने स्वतःच्या १३ वर्षाच्या मुलीला मोबाईलच्या अती वापरावरून सातत्याने होणाऱ्या वादातून स्वतःच्याच ११ वर्षाच्या मुला समोर कायमचं संपवलं आणि या प्रकाराने चिडलेल्या मुलाने आपल्या आईला भोसकून ठार केले.
एका अल्पवयीन मुलाने आपल्या अल्पवयीन बायकोला मोबाईलसाठी दुकानदाराला विकले.
एका सहा वर्षे वयाच्या मुलीला ८,१०,११ वयोगटातील तीन मुलांनी मोबाईल मधिल पॉर्न क्लिप जबरदस्तीने दाखवण्याचा प्रयत्न केला अन् तीने या गोष्टीला नकार दिला म्हणून तीला दगडाने मारून टाकले.
या सर्व घटना नेमके काय प्रतीबिंबीत करतायंत सध्याचे पालक मुलांच्या मोबाईल व्यसनाधिनतेला अक्षरशः कावलेत अन् त्यासाठी ते इतकं टोकाचं पाऊल उचलतायत की अख्खं कुटुंबं त्यात उध्वस्त होतायंत दुसरीकडे आपल्या अल्पवयीन मुलांची लग्ने लावून आपले वैचारिक बुरसटलेपण अधोरेखित करताना डिजीटलायजेशन व आधुनिकतेच्या नावाखाली त्यांचीच मुलं ' बायको नको पण मोबाईल हवा ' असं म्हणतायत. तर तिसरीकडे या ८-१० वर्षाच्या मुलांकडे पॉर्न क्लिपने भरलेले मोबाईल असतात अन् पालकांना त्याची फिकीर नाही किंबहुना स्वतःच्याच तथाकथित मनोरंजनासाठी पालकांनीच तो संग्रह जपून ठेवलेला असेल. नैसर्गिक बहर येण्या आधीच पोक्त पणाचं कोमेजलेपण लादलं गेले की नैसर्गिक खुजेपण अटळ आहे.
या बातम्या आपण केवळ अपवाद म्हणून पाहत असू शकतो परंतु ज्या पद्धतीने व वेगाने आधुनिकतेच्या नावाखाली नैतिकतेचा ऱ्हास होतो आहे ते पाहता हाच नियम होण्याचा धोका अधिक संभवतो.
मग प्रश्र्न असा पडतो की यात चुक नेमकी कशाची व कुणाची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बेसुमार प्रगतीची का केवळ कुणाच्या तरी दुनिया मुठ्ठी मध्ये घेण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी इनकमिंग ते रोजचा दिड-दोन जीबी डाटा मोफत वाटण्याच्या धोरणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या सरकारची.
तंत्रज्ञान विकसित झाले की स्वाभाविक व सहाजिकच माध्यमं देखील बदलत जातात. परंतु कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली ऑनलाईनचा जो सोपस्कार पार पडला गेला त्यात शिक्षण व्यवस्थेचे किती भल झालं अन् विद्यार्थ्यांचा कोणता शैक्षणिक विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे. सरकारी नाईलाजास्तव माकडाच्या हाती मात्र मोबाईल रूपी कोलीत दिलं गेलं हे नक्की. त्यातूनच वेब सिरीजच्या नावाखाली वारंवार अन् सहज उपलब्ध होणारा व्याभिचार , हिंसा व अर्वाच्य शिव्याने बरबटलेले संवाद नैतिकतेची व्याख्या बदलतायत अन् हेच सत्वहीन पोषण अंगवळणी पडते आहे. एखाद्या सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यासोबतच त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर व समाज व्यवस्थेवर होणारे दुरगामी दुष्परिणाम यावर धोरण राबवणाऱ्या जबाबदार यंत्रणांनी जास्त सजग असलं पाहिजे.
रिकामटेकड्या मनाला या तांत्रिक सुकाळाची जोड फार मोठा वैचारिक दुष्काळ निर्माण करत असताना तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असून त्याची फिकीर सरकार नामक यंत्रणेला नसेल अन् ती उदासीन व सुस्त असेल अन् निसर्ग आपल्याला नेहमीच संकटाची चाहूल देत असतो पण आपण मात्र झापडं लावून निसर्गालाच लहरी, तऱ्हेवाईक म्हणणार असु तर आपल्या सारखे करंटे आपणच. हा मोबाईल मॅनिया आपल्या तथाकथित भविष्याला गिळंकृत करीत असताना हताशपणे बघत बसण्यापेक्षा सुजाण नागरिकांनी जागृत होऊन समाजाला जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न केले पाहिजेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा