लातूर जिल्ह्यातील चापोली येथिल एका विद्यार्थ्याची बातमी वाचली अन् काळजात चर्र झालं. हा विद्यार्थी दहावीत शिकत असून मंगळवारी त्याचा मराठीचा पेपर होता परंतू मंगळवारी पहाटे त्याच्या वडिलांचे निधन झाले अन् त्याच्यावर अक्षरशः दु:खाचा डोंगर कोसळला. एकीकडे वडिलांचा मृत्यू अन् दुसरीकडे दहावी सारख्या महत्त्वाच्या वर्षाची परिक्षा अशी अतिशय मन व मेंदु सुन्न करणाऱ्या द्विधा मनस्थितीत असताना नातेवाईकांच्या आधाराने आधी पेपर देण्याचा अन् पेपर झाल्यावर वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याचा अतिशय खडतर आणि निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारा निर्णय घेतला. डोळ्यात अश्रू अन् हातात लेखणी धरुन शिक्षणाची पर्यायाने पाठबळ गमावलेल्या आयुष्याची लढाई लढण्याचं मानसिक बळ तो दाखवू शकला हीच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे.
सध्या शिक्षणाचा ऑनलाईनने झालेला खेळखंडोबा अन् सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे एकंदरीतच शिक्षण क्षेत्राविषयी निर्माण झालेली अनास्था या पार्श्वभूमीवर असे काही तरी घडते हे शिक्षणाचा जीवनावश्यक पैलू अधोरेखित करतो. नाहीतरी शिक्षणापेक्षा हिजाब महत्त्वाचा मुद्दा करणारे राजकारण अन् अशा राजकारणाला बळी पडणाऱ्यांचे सत्कार समारंभ या शिक्षणाच्या दृष्टीने निरर्थक विषयाला चपराक मारणारे काम हे या विद्यार्थ्याने त्याच्या कृतीने सिद्ध केले आहे. हीच शैक्षणिक आस्था खऱ्या अर्थाने सर्व समाजात निर्माण होवो अन् सर्व समाज सुसंस्कृत अन् प्रगल्भ होवो हीच सदिच्छा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा