शनिवार, ३० जुलै, २०२२

वैचारिक दहशतवाद...!


      नुकतेच महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एका खासगी कार्यक्रमात गुजराती व राजस्थानी लोकांमुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे अन् ते निघून गेले तर मुंबईत काही उरणार नाही अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. कदाचित राज्यपालपदा सारखी शोभेची परंतू राजेशाही थाटाची अन् निवृत्तीसाठीची उत्तम सोय असणारी झुल अंगावर पांघरल्याच्या कृतार्थ भावनेतून (उपकाराची परतफेड) सदरची शब्द सेवा घडली असेल किंवा पुढे येणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून गुजराती व राजस्थानी मतदारांचे ध्रुवीकरण अथवा लांगुलचालन करण्याचा उद्देश ठेवून हा शब्द खेळ खेळला असेल.

खरंतर भारतीय संविधानाने कोणत्याही राज्यातील नागरिकांनी देशात कुठेही जाऊन राहण्याचा व काम करुन पैसा कमवण्याचा अधिकार बहाल केला आहे अन् तो रास्तच आहे. परंतू आपण जिथे जातो, राहतो तिथल्या संस्कृतीचा आदर करणे हे अपेक्षित अन् अंतर्भूत आहे हे प्रकर्षाने लक्षात ठेवले पाहिजे.

कोणीही व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली जन्मभूमी मग तो देश असो राज्य असो की शहर ते सोडण्याचा निर्णय आनंदाने नव्हे तर तात्कालिक परस्थिती नुसार घेत असतो. मग जेंव्हा तुम्ही दूसऱ्या शहरात, राज्यात अथवा देशात जाता तेंव्हा तिथल्या लोकांनी, संस्कृतीने, व्यवस्थेने स्विकारल्या शिवाय तुम्ही तिथं रूजू शकत नाही. जसं आपला जिथे जन्म झाला ती आपली जन्मभूमी आपल्याला प्रिय असते अन् ती असली पाहिजेच तशीच ज्या भूमीने तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम अन् उन्नत केलं त्या कर्मभूमी प्रती केवळ सन्मानच नव्हे तर कृतज्ञता देखील असलीच पाहिजे. जसं महाराष्ट्रातील गुजराती, राजस्थानी किंवा कोणत्याही प्रांतातील नागरिकाने आपापल्या मातृराज्यावर प्रेम केलं पाहिजे तसेच तिथल्या अडिअडचणी वेळी त्यांच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे अन् आपण जिथे राहतो तिथे फूट पाडणाऱ्या विध्वंसक शक्ती विरूद्ध स्थानिक बांधवांच्या हातात हात घालून प्रतिकार देखील केला पाहिजे याचप्रमाणे जे मराठी बांधव गुजरात, राजस्थान किंवा अन्य कोणत्याही राज्य किंवा देशात असतील त्यांनी आपापल्या कर्मभूमी प्रती मनात सन्मान अन् कृतज्ञता ठेवली पाहिजे अन् वेळप्रसंगी तिथल्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुःखात ठामपणे उभं राहिलं पाहिजे अन् हीच ज्ञानेश्वरांची खरी वैश्विकतेची शिकवण आहे अन् त्यासाठीच त्यांनी पसायदान मागितले आहे.

या प्रसंगी एक गोष्ट ती कथा आहे दंतकथा आहे माहीत नाही पण सांगावीशी वाटते एकदा काही पारशी लोक भारतात आश्रयासाठी आले तेंव्हा तिथल्या राजाने त्यांच्या समोर दुध आणि साखर ठेवली नंतर त्या पारशी लोकांच्या नेत्याने त्यातील साखर दुधात टाकून ती विरघळवली अन् त्यातून त्याने संदेश दिला की आम्ही आपल्या संस्कृतीत असेच सामावून जाऊ अन् गोडी देखील वाढवू अन् आज आपण पाहतो आहेच होमी भाभा असो की टाटा त्यांनी केवळ महाराष्ट्रात किंवा देशातच कर्तृत्व घडवलं नव्हे तर संपूर्ण जगात भारताचं नाव उज्ज्वल केले आहे परंतू आमच्यामुळे भारताची प्रगती झाली असले अहंकारी,कृतघ्न अन् कोत्यावृत्तीचे वक्तव्य त्यांनी कधीच केले नाही म्हणूनच केवळ महाराष्ट्रीयन म्हणून नव्हे तर भारतीय म्हणून त्यांचा सार्थ अभिमान आहे.

एक गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे केवळ अन् केवळ सत्तास्वार्थ, शुद्र महत्वकांशेसाठी  जातपात असो की धर्म, भाषा असो की राज्य अस्मिता अशा मुद्द्यांचा वापर करून नेहमीच वैचारिक दहशतवाद पोसला अन् पसरवला जातो अन् शस्त्रावीना केलेला हा दहशतवादी हल्ला माणसाच्या मेंदूचा ताबा घेत त्यालाच त्याच्या नकळत गुलाम बनवत एकमेका विरूद्ध शस्त्र घ्यायला भाग पाडतो. ह्या वैचारिक दहशतवादाला संपवायचे असेल तर जसे सीमेवर लढणारा सैनिक कोणत्याही जातीचा, धर्माचा, राज्याचा म्हणून नव्हे तर एक भारतीय म्हणून दहशतवादी असो की देशाचा शत्रू त्यांच्याशी प्राणपणाने लढतो त्याच भारतीयत्वाची जाण आपल्या विचारांत रूजवली पाहिजे अन् या वैचारिक दहशतवाद्यांशी लढलं पाहिजे.

जय हिन्द , जय महाराष्ट्र.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा