खरंतर जगात कुठेही गेलात तर आपल्याला कशाची ना कशाची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रतिकं आढळतातच. प्रत्येक व्यक्तीला आपापले वैचारिक वेगळेपण मांडण्यात अधिक रस असतो अन् जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा आपापल्या समविचारी मंडळींना खरंतर सध्याच्या युती-आघाडी सरकार प्रमाणे किमान समान कार्यक्रमा सारखं एकत्र करून आपापली प्रतिकं मिरवण्यात अभिमान देखील वाटतो इथपर्यंत काहीच गैर नाही अन् तसा अधिकार संविधानानेच प्रत्येकाला दिला आहे. परंतू जेव्हां आमचाच विचार अधिक योग्य अन् तोच स्विकारला पाहिजे हा अट्टाहास येतो तेव्हां आपसूकच अभिमानाची जागा अहंकाराने घेतली जाते.
सध्या ' हर घर तिरंगा ' ही संकल्पना केंद्र सरकारकडून शासकीय पातळीवर व्यापकपणे राबवली जातीय यात वरवर पाहता काही गैर नाही परंतू आपला राष्ट्रध्वज, आपला तिरंगा हे कशाचे द्योतक आहे तर जगात आपण भारतीय म्हणून एक आहोत अन् आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिक म्हणजे तिरंगा. लहानपणापासून १५ ऑगस्ट,२६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे करणे म्हणजे ध्वजवंदन, जिलेबी खाणं, देशभक्ती गीत लावणे आणि सार्वजनिक सुट्टी या स्वरूपात अनुभवत आलो आहोत अन् practice makes man perfect या धर्तीवर आपल्यात केवळ हे म्हणजेच राष्ट्रप्रेम हे अंगवळणी पडले आहे पण खऱ्या अर्थाने ते रुजलं गेले आहे का याचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. अन् सध्या असण्यापेक्षा दिसणं जास्त महत्त्वाचं झालं आहे. धंद्याच्या सुत्रा प्रमाणे ' जो दीखता है वो बिकता है ' मग अशा प्रकारे राष्ट्रभावना जागी (जागृत नव्हे) करण्यात रस असेल तर एक महान राष्ट्र म्हणून अन् त्यासाठी आवश्यक एक सक्षम, जागरूक नागरिक घडवण्यासाठी हर घर आरोग्य, हर घर मुल्य शिक्षण, हर घर संविधान यासाठी शासकीय पातळीवर व्यापकपणे व जोमाने काम होताना दिसत नाही.
असं म्हणतात माणूस हा भावनेने विकला अन् विकत घेतला जावू शकतो मग अशा मार्गाने राष्ट्रभावनेला साद घालून महत्त्वाच्या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होणार असेल तर देश सुजलाम सुफलाम होणार आहे का? अन् हर जूबाॅं केसरी म्हणत जिथं तिथं थूंकून देश घाण करणाऱ्यां व्यसन बहाद्दरांना तिरंग्यातील केशरी रंगाचे महत्त्व कळणार आहे का?
सद्ध्या समाजातील प्रेरणादायी व्याख्यान अथवा उपक्रमाचं बाजारपेठीय मुल्य पाहता केवळ अशी तात्पुरती उत्साह निर्मिती मुलभूत उर्मी निर्माण करु शकते का? जेव्हां अमृत महोत्सवा निमित्तानं हे होत असताना ७५ वर्षे होऊन देखील मुलभूत गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होणार असेल तर दुरदृष्टी तरी कुठून येणार.
भावनिक हिंदोळ्यावर झुलणाऱ्यांना झुलवत ठेवले की जमिनीवरील वास्तवापासून दूर ठेवणं सोपं जातं मुळातच स्वतःला अन् समाजाला प्रश्न न विचारण्याची मुलभूत शिक्षण व्यवस्था अशा भावनिक बाजारीकरणाला प्रोत्साहनच देणार हे कटू सत्य आहे.
" झंडे की तसबीर तो जहेन ओ दिल में छपी है।
अब देश की तकदीर बदलनाही मेरी हर आरजू की फितरत है। "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा