रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

कुटायच भजन अन् डोक्याचं भजं....!

 

हल्ली ज्या काय राज्यीय, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय बातम्या सातत्याने आदळतायत त्या ऐकून, वाचुन, बघुन कोणता अन् कसला परिणाम होणार आहे याची जरा सुद्धा जाणीव लोकांना दुर्दैवाने होत नसावी म्हणूनच या गोष्टींचा अतिरेक बळावत चालला आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर खरा पक्ष कुणाचा ते गद्दार व्हाया खोके यापासून न टळणारी ईडा पिडा तसेच गुजरातराज्यामध्येच जाणारे उद्योग अन् योगायोगाने तिथलेच असणारे पंतप्रधान तर दुसरीकडे एकेकाळी सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या अन् सध्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या कॉंग्रेसचे भारत जोडो आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणारे युवराज भाजपाच्याच मार्गाने जात इतिहासातील मुडदे उकरत बसत नको ते खाद्य पुरवत असतील तर भरकटलेली अवस्थाच अधोरेखित होते अन् जोडण्या ऐवजी तोडण्याची शक्यता बळावते हे न‌ जाणवणे उपऱ्या विचारधारेचे  लक्षण आहे. केवळ इव्हेंट करण्याच्या कृतीला केवळ इव्हेंट करूनच प्रत्युत्तर देणार असाल तसेच मानसिक,आर्थिक अन् पर्यायाने शारीरिक समस्यांना कारणीभूत असणाऱ्या व आ वासून उभ्या राहिलेल्या वर्तमान परिस्थितीचा सारासार अन् सांगोपांग विचार करणार नसाल तर देश म्हणून आपणाला फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे अन् यासाठी कोणत्याही बाबा वेंगा किंवा नॉस्ट्रॅडॅमसची गरज नाही.

एकीकडे राजकीय पक्षांची धुळवड अन् दुसरीकडे फिल्म इंडस्ट्रीचे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली चालू असलेले ऐतिहासिक गल्लेभरू बाजारीकरण अन् त्यातून निर्माण होणारे व केले जाणारे वाद पाहता कोणत्या वेडात हे सगळे धावतायत हेच कळेनासे झाले आहे. ज्या सुशासन अन् रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यक्तिगत आयुष्य न जगता आपले सर्वस्व अर्पण केले हे त्यांचं कर्तृत्व बोलण्या पलिकडे कृतीत उतरलं नाही हे जळजळीत वास्तव आहे. महापुरुषांचे केवळ वाचाळ प्रदर्शन करण्या पलीकडे आपली मजल जाऊ शकत नाही कारण कुठल्याही पक्षाला अन् नेतृत्वाला ती निखळ तळमळ नाही, आहे तो केवळ सोपस्कार.

आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाचं अहंकारी अन् स्वमग्न नेतृत्व व त्यातून निर्माण झालेले रशिया-यूक्रेन युद्ध अन् या सर्वां भोवती फिरत राहणारं आंतरराष्ट्रीय राजकारण हे भविष्यातील महायुद्धाची नांदी आहे यातुन सावध होत आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता राखण्यासाठी दुरदृष्टीने पावलं उचलली पाहिजेत परंतु स्वत:चच घर सांभाळतानाच ससेहोलपट होत असेल तर जगाची उठाठेव कोण करणार अशी बहुतांश देशांची अवस्था झाली आहे. परंतू एकंदरीत स्वास्थ्य हे परस्परावलंबी असते हे लक्षात घेतलेच पाहिजे त्यासाठी कोणतेही संकट आपल्या उंबरठ्यापर्यंत येण्याची वाट बघण्याची आवश्यकता नाही. दुसरीकडे उद्योग क्षेत्रात विदेशी इलॉन मस्क, किंवा देशी अदानी अंबानी प्रवृत्ती सगळं गिळंकृत करण्यासाठी हपापलेली असणं अन् पैशाची ताकद वापरून नैसर्गिक चिव चिव बंद करण्याचा अट्टाहासचे ग्लोबलायझेशन सुसंस्कृतपणा च्या मुळाशी येणार आहे.

या अन् अशाच उबग आणणाऱ्या बातम्यांचा भडिमार म्हणजे तेच ते निरर्थक टाळ कुटायचं भजन झाले आहे अन् त्यामुळे अक्षरशः लोकांच्या डोक्याच भजं झालं आहे. खरंतर वेळ आली आहे की लोकांनी अशा चर्चेला अन् चर्चा करणाऱ्यांना नाकारण्याची कारण बाजाराचा नियम आहे जे विकतं ते चालतं म्हणून 'चलता है' ही वृत्ती सोडून जाणिवपूर्वक चांगल्या गोष्टीसाठी आग्रही रहाण्यातच शहाणपण आहे .

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।

ज्याचे अंगी मोठेपणा । तया यातना कठीण ।।

तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।

हा नम्रपणाच माणसाला सुखी राहण्याचा गुरुमंत्र आहे. तो सर्वांना लाभो ही सदिच्छा...