गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

बिरूदावली, कर्तृत्व अन् मर्यादा...!

 

पुन्हा येरे माझ्या मागल्या... खरंच आपल्या लोकप्रतिनिधींकडून किमान लोककल्याणासाठी आवश्यक समाजकारणाची अपेक्षा ठेवायची का हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय.

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे का स्वराज्यरक्षक म्हणायचे , छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राम्हण प्रतिपालक म्हणायचे का कुळवाडी भूषण म्हणायचे या प्रश्नावर जो अखिल राजकीय काथ्याकूट चालू केला आहे हे नेमके काय आहे एका बाजूला भाजपचे धार्मिक ध्रुवीकरण अन् दुसरीकडे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे धार्मिक उदारीकरण दोन्हीही केवळ पक्षीय फायद्यासाठीचे राजकारणच. खरंतर या आधी सामान्य जनतेने याचा अर्थपुर्ण विचार केला असेल का अन् त्यानुसार त्यांची महापुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन निर्माण झालेला असेल का या बाबत माझ्या मनात तरी शंका आहे. कोणती बिरुदावली वापरली म्हणजे कर्तृत्व संकुचित अथवा व्यापक होते यावर जो काही बौद्धिक वर्ग चालू झालेला आहे व त्यासाठी जे काय तर्कवितर्क लढवले जात आहेत ते दोन्ही बाजूंच्या समर्थकांना योग्य वाटत असणार यात शंका नाही परंतु भाषेचा अन् भाषेत वापरण्यात येणाऱ्या बिरुदावल्या यांचा अभ्यास मुळांत किती व्यापक आहे यासाठी जर संशोधन केले व मराठी भाषेची अवस्था काय आहे अन् ती सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक मराठी शाळांची व त्यातील मास्तरांच्या गुणवत्तेची  वस्तुस्थिती काय आहे याचा धांडोळा घेतला तर आपला पोकळ अभिमानच अधोरेखित होईल अन् हे सर्व हिंग्लिश मराठी बोलणाऱ्या अन्  वागणाऱ्या तरूणांच्या डोक्यावरून जाण्याचीच शक्यता अधिक. 

बिरुदावली व तिचा संकुचित अथवा व्यापकपणा समजण्यासाठी मुळात आवश्यक प्रगल्भता वाढविण्यासाठी हे सभागृहांचे सन्माननीय सदस्य कोणत्या ध्येयधोरणांसाठी आग्रही आहेत. एकीकडे यावर्षी आपण चीनच्या लोकसंख्येचा विक्रम मोडत १४० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश  होणार आहोत अन् चीन लोकसंख्येच्या दृष्टीने आक्रसत जाणार आहे असं असूनदेखील लष्करी बजेट आपल्यापेक्षा तिप्पट असणाऱ्या चीनची अतिक्रमणाची भुक वाढत चालली आहे हे आपण गलवान, तवांगच्या निमित्ताने अनुभवतो आहोतच. तसेच पाकिस्तान सारखा टंचाई, महागाई व कर्जबाजारी असणारा देश असे आपली डोकेदुखी वाढवणारे शेजारी शत्रुराष्ट्रे असताना अशा परिस्थीतीत आपल्या देशातील बेरोजगार तरुणांसाठी , हवामान बदलामुळे शेती अन् पर्यायाने शेतकऱ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा दुरदृष्टीने विचार करत ठोस उपाययोजना करणार आहोत का तसेच ह्या खऱ्या आव्हानांसाठी सन्माननीय सदस्य किती सभागृह डोक्यावर घेतात.

खरंतर कुणाला कोणती व किती बिरुदावल्या लावायच्या हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा तसेच बौद्धिक आकलनशक्तीचा भाग आहे एक बिरुदावली वापरा अथवा एकावेळी अनेक बिरुदावल्या वापरा कोणत्याही महापुरुषांचे कर्तृत्व हे केवळ बोलण्याने नव्हे तर कृतीने सिद्ध झाले आहे अन् ते कधीही कोणत्याही संज्ञेने संकुचित अथवा व्यापक ठरणार नाही. मग या महापुरुषांच्या कर्तृत्वाचा कित्ता आपले भाषांतज्ञ लोकप्रतिनिधी गिरवणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. बिरुदावलीमुळे कर्तृत्वाच्या मर्यादा ठरत नाही तर कर्तृत्वामुळे बिरुदावलीच्या मर्यादा व्यापक होतात.


रविवार, १ जानेवारी, २०२३

झाकली मूठ सव्वा लाखाची....!

 

खरंतर सध्याच्या राजकीय घडामोडींवर काय बोलावे का केवळ ऐकावे, पहावे अन् सोडून द्यावे अशा द्विधा मनस्थितीत बहुतांश सुज्ञ नागरिक असावेत कारण डर्टी विद्याने जे बौद्धिक चाटण दिले आहे त्यानुसार हे जग फक्त तीन गोष्टींवरच चालते ते म्हणजे मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन.. म्हणजे एकुन काय तर प्रत्येक गोष्टीत स्वतःचं मनोरंजन करायचं अन् पुढल्या गोष्टी कडे वळायचं. हे सगळे जरी खरं मानलं तरी कुठल्याही अतिरेकाचा मग मनोरंजन असले तरी त्याचा देखील उबग येतो.

दिखाव्या पुरता असलेला लोकशाहीचा तमाशा व मिरवण्यापुरतीच असलेली संवैधानिक यंत्रणा मग तथाकथित लोकतांत्रिक पद्धतीने निवडून गेलेले लोकप्रतिनिधी सभागृहात जाऊन काय करतात याचं थेट प्रक्षेपणच उपलब्ध असते परंतु लोकांनाच लोकप्रतिनिधींकडून कोणत्या अपेक्षा आहेत अन् कोणत्या असाव्यात हेच माहित नसेल तर काय बोंबलायच...मग हिवाळी नंतर उन्हाळी असे अधिवेशन म्हणजे पुर्वीच्या दहावीच्या ऑक्टोबर-मार्चची वारी अन् त्या वारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तुलना सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या नितिमत्तेशी व्हावी. खोचक उपमा देत एकमेकांवर शाब्दिक कोट्या करणे एकमेकांना शालुतून जोडे मारणे नाहीतर नळावरच्या उणीधुणी काढणाऱ्या भांडणाची आठवण करून देणारे आरोप प्रत्यारोप किंवा चिखलफेक करणे हेच चित्र दिसत असते. मग विरोधी पक्षातील नेत्यांनी अमका घोटाळा झाला तमका घोटाळा झाला म्हणत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचे मग सत्ताधाऱ्यांनी तुमची अंडी पिल्ली सगळी माहितीयेत असा गर्भित इशारा द्यायचा मग परत तुम्ही गोविंदबागेत का भेटायला गेला होता हे आम्हाला माहीत आहे असा सुचक इशारा द्यायचा हा अन् असाच घटनाक्रम सतत चालू ठेवायचा अन् आपण कसे जनतेचे प्रश्न मार्गी लावले किंवा मांडले अशी वृत्त वाहिनीच्या दांडक्यासमोर तोंडपाटीलकी करायची.

मग आत्तापर्यंत कुठल्या घोटाळ्याचे काय झाले अन् काय सोक्षमोक्ष लावला याचं उत्तर कधीच मिळत नाही कारण आज सुपात असणारे उद्या जात्यात असतात म्हणून केवळ राजकीय सोपस्कार करत राहायचे अन् उत्तर न शोधण्याच्या मानसिकतेतून प्रश्न उपस्थित करत राहायचे हा एवढाच धंदा हो धंदाच करत आहेत.

किशोर कुमार चे एक गाणं आहे  'बंद मुठ्ठी लाख की खुली तो खाक की....' ते एकत्र असलं की किंमत असते या अनुषंगाने वापरलयं परंतू आपल्या कडे झाकली मूठ सव्वा लाखाची अशी म्हण आहे या दोन्ही गोष्टींचा वापर आपल्या लोकप्रतिनिधींकडून हमाम में सब नंगे यासाठी एकी दाखवत तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत झाकली मूठ ठेवत याचा चपखल वापर केला जातो अन् एवढं उघड गुपित असुन सुद्धा जनता जनार्दन गांधारी प्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधून झाकली मूठ सव्वा लाखाची समजत राहण्यातच धन्यता मानते हे विशेष. असो सरत्या वर्षाच्या ओझरत्या आठवणींना उजाळा देत नव्या वर्षाच्या आशादायक व सकारात्मक बदलासाठी आपल्या सर्वांनाच सद्बुद्धी लाभो याच नविन वर्षाच्या शुभेच्छा!