नुकताच 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट चक्क चित्रपटगृहात जाऊन पाहिला खरंतर पहिल्यांदाच स्त्री राज्यात असल्याचा भास झाला अन् कृष्णाला कसं वाटत असावं हे थोड्याफार प्रमाणात जाणवलं असो विनोदाचा भाग सोडला तर स्त्रीचं मन एकाच वेळी अनेक प्रकारच्या विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत असतं याचा प्रत्यय आला.
खरंतर सगळ्या प्रकारच्या नात्यात कमी जास्त प्रमाणात बेबनाव असतोच त्याला पाठीला पाठ लावून आलेल्या बहिणी देखील अपवाद नाहीत. समज, गैरसमज याचं रुपांतर अढी, धुसफूस ते मत्सर अन् अगदी द्वेषापर्यंत जाऊन पोहोचते.
खरंतर मत्सराचं दुसरं नाव स्त्री आहे ( Jealousy thy name is woman ) अशी इंग्रजी मध्ये म्हण आहे पण भारतीय स्त्रियांची मानसिकता पाहता वरवर जरी तसंच वाटत असले तरी तिच्या मनाला अनेक पदर आहेत. तिच्या वर वेगवेगळ्या नात्यांची जन्मतःच आलेली अपेक्षांची ओझी अन् ती पुर्ण करुन आदर्शवत स्त्रीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी व तशी ती सांभाळण्यासाठी ची तीची धडपड या सगळ्यातच तीचे कौतुक कमी अन् कुचंबणाच अधिक होते. हे सर्व करता करता कधी मासिक पाळी बंद व्हायची वेळ आली हे ध्यानातच येत नाही तरी अजून स्वतःसाठी काहीच जगलो नाही हे खरं दुखणं असतं. अशावेळी तिची स्वतंत्र व्यक्ती म्हणून होणाऱ्या घुसमटीला वाट मोकळी करून देण्यासाठी ती दुसऱ्या स्त्री कडेच अपेक्षेने पाहते. एका स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजेल अशी तीची खात्री खरंतर भाबडी आशा असते परंतु फिरून अपेक्षाभंगाचच दुःख पदरी पडते यातूनच निर्माण झालेल्या मानसिकतेचा दुष्परिणाम हेवेदावे, टोमणे, कुचाळक्या, दिखावा, टाळणे यातून दिसू लागतो.
या चित्रपटातील बहिणी पुर्वग्रह दुषित भावनांचे ओझे घेऊन मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात अन् त्या प्रवासात ज्यांच्या बद्दल अनेक वर्षे गैरसमज करुन घेत अढी निर्माण झाली होती त्यांच्याच सानिध्यात नात्याच्या सुगंधाची अन् समाधानाची कस्तुरी त्यांना गवसते. सगळ्यांनाच अशी कस्तुरी गवसू शकते फक्त गरज असती ते मनमोकळे असण्याची व मनमोकळेपणाने जगण्याची.
संसारात अनेक भुमिका जगत यंत्रवत झालेलं आयुष्य झुगारूनच स्वतःच प्रजातंत्र निर्माण करता आलं पाहिजे तरच संसारात राहून देखील स्त्री स्वतःच स्वतंत्र व्यक्तीमत्व घडवू शकते.
या चित्रपटाने अजून एक गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे तुमच्या कडे सामाजिक भान असणारी चांगली संहिता असेल तर कितीही मोबाईलमय जग झाले तरी लोकांना चित्रपटगृहात खेचून आणू शकतो.
स्वतःच्या मनावरचं समज-गैरसमजाचं ओझं पुढाकार घेऊन कमी केले अन् प्रत्येक स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठीच नसुन जगण्यातला खरा आनंद शोधण्यासाठी देखील असते हे समजले तर बाईपण भारीच असतं हे प्रत्येक स्त्रीला मनोमन पटेल यात शंकाच नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा