गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

एका कलादिग्दर्शकाची अपूर्ण कलाकृती....!

 


नामवंत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे ऐकुन धक्का बसला खरंतर कलाक्षेत्रात इतक्या अकस्मात अन् अनपेक्षित दु:खद घटना घडल्या आहेत त्यामुळे आता सहजासहजी धक्का बसत नाही परंतु कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची प्रतिभा अन् योगदान असामान्य होते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नितीन देसाई यांनी कला क्षेत्रात एवढे उत्तुंग यश मिळवले चार वेळा नॅशनल ऍवॉर्डस्, फिल्म फेअर ऍवॉर्डस् हेच अधोरेखित करतात.
सगळ्या गोष्टी भव्य दिव्य करण्याची मानसिकता अन् हातखंडा देखील. त्यातूनच बॉलिवूडला टक्कर देणारी एन डी स्टुडिओची निर्मिती ही निश्चितच कौतुकास्पद व तितकीच अभिमानास्पद बाब. परंतू हेच भव्य स्वप्न त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचे कारण व्हावे हे बोचणारे आहे.
खरंतर आर्थिक निर्णय, धाडस चुकू शकतात अन् प्रत्येक माणूस हा कायमच चुकांतूनच शिकत असतो मग आत्महत्ये सारखा एवढा टोकाचा निर्णय घेताना जास्तीत जास्त दुष्परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केला गेला पाहिजे. फारफार तर स्टुडिओ जप्त झाला असता, अटक झाली असती, काही काळ तुरुंगात जावे लागले असते परंतु बदनामीच्या भीतीने सगळं संपवून टाकणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. या देशातील उघड उघड नैतिकतेला तिलांजली देणारे निर्लज्ज राजकारणी व देशाला हजारो कोटीचा चुना लावून देशातून पळून गेलेले तथाकथित उद्योगपती यांच्या निगरगट्टपणाला देश सहन करतोयच की मग आपणच उभं केलेलं गेलं संपून अन् आलो रस्त्यावर तर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे घेऊ ना राखेतून झेप...हाच विचार झाला पाहिजे. इतक्या पदाने, सत्तेने, संपत्तीने मोठ्या असणाऱ्या  लोकांशी असणारे संबंध असून उपयोग काय. बोलून मार्ग काढता आला असता नाहीतर पुन्हा शुन्यावर आलो असतो पण स्वत:च्या प्रतिमा व स्वाभिमान यात अडकून पडणे अन् स्वत:ला व्यक्त होण्यापासून रोखणे हे खऱ्याअर्थाने आत्मघातकी आहे. खरंतर समाजात योग्यवेळी अन् योग्य पद्धतीने व्यक्त होण्याचे संस्कार आपल्या शिक्षणपद्धतीचा भाग असला पाहिजे.
जिमनॅस्टिकमध्ये तुम्ही हवेत किती कोलांट्या उड्या घेतल्या यापेक्षा तुम्ही जमिनीवर उभं राहताना कसं संतुलन केलं याला सर्वात जास्त महत्त्व असते. तसेच खऱ्या आयुष्यात देखील तुमच्या उपलब्धी, कामगिरी यांच्या आलेखापेक्षा तुमचा विचार किती नैतिक अन् संतुलित आहे हेच अधोरेखित होते. तुम्ही मिळवलेले अत्युच्च यश देखील एका हतबलतेतून घेतलेला निर्णयामुळे मातीमोल होते.
नितीन देसाई यांच्या जाण्याने एक प्रतिभा व अनुभव संपन्न कलादिग्दर्शक हरपला तसेच नवी पिढी एका मार्गदर्शका पासून वंचित राहिली ही सर्वात मोठी सांस्कृतिक हानी आहे असे मला वाटते. कोणत्याही कलाकृतीचा फिनिशिंग टच त्या कलाकृतीला पूर्णत्व बहाल करतो परंतु नितीन देसाई ही कलाकृती अपुर्णच राहिली ही शोकांतिका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा