31 डिसेंबर हा खरं तर वर्षाचा शेवटचा दिवस अन् माणसाला शेवट हा नेहमीच गोड व्हावा ही इच्छा असते अन् तसा तो गोड व्हावा म्हणून प्रत्त्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतोच कुणी मिळालेल्या गोड आठवणीतून तर कुणी झालेल्या चुका लक्षात घेऊन नव्यानं शिकत पुन्हा नव्याने मांडणी करण्याचा संकल्प करत.
जीवन म्हणजे खरंतर सरणारी वर्षे अन् वाढणारं वय यांचा एक आलेख आहे कधी चढता कधी स्थिर कधी उतरता अन् पुन्हा चढता. केव्हां तरी पुर्ण झालेला हा व्यक्तिगत आलेख मात्र कुणालाही पाहणं शक्य नाही अन् तो मनासारखं आरेखनं देखील शक्य नाही. आयुष्य हे असंच आहे क्षणभंगुर जे आहे ते आत्ता याक्षणी.
भगवत् गीतेतील "जे झाले ते भल्यासाठी , जे होत आहे ते भल्यासाठी अन् जे होणार आहे ते देखील भल्यासाठीच" हे केवळ वाक्य नसून आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे अन् तो ठेवूनच प्रत्येकाने वाटचाल करीत राहणे अपेक्षित अन् आवश्यक आहे.
कोणत्याही गोष्टीचा शेवट खरंतर शेवट नसतोच ती नविन कशाची तरी सुरुवात असते अन् ही शृंखला सातत्याने चालूच असते व राहते म्हणूनच व्यक्तिगत आयुष्य असो की जग सगळ्यांचं मुळ तत्वज्ञान आहे ते म्हणजे अंत: अस्ति प्रारंभ:।
