मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

पुतळा उभा राहिल पण विचारधारेचे काय....!

 

खरंतर एक वाईट घटना घडली सिंधुदुर्ग येथील केवळ नऊ महिन्यांपूर्वी नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. अर्थात कारण नैसर्गिक आहे.

परंतू मला वैयक्तिक या घटनेचं वाईट वाटले पण त्या पेक्षाही समाजात ढासळलेली नैतिकता अन् वैचारिक अधःपतन अधिक क्लेशदायक आहे असे वाटते. आपण पुतळ्यांच्या नावाखाली सर्वच महापुरुषांना प्रतिकात्मक सोपस्काराच्या प्रथा परंपरेत अडकवून त्यांच्या विचारधारेचे धिंडवडे काढलेत अन् ते मुकाटपणे उभे राहून हतबल व हताशपणे पाहत राहण्याशिवाय त्या पुतळ्यांना गत्यंतर उरले नाही यापेक्षा अधिक दुःखदायक काय असू शकेल. 

वास्तविक गावोगावी अन् गल्लोगल्ली महापुरुषांचे नुसते पुतळे उभे करून आपण काय साध्य केले हा समाज म्हणून आपण स्वतःला प्रश्न विचारणार आहोत का, का केवळ उपऱ्या जयंत्या अन् पुण्यतिथ्या साजऱ्या करत धुडगूस घालत उन्मादक उत्सव साजरे करणार आहोत. इतिहासातून जी वैचारिक प्रेरणा व दूरदृष्टी आपण सर्वांनी घेतली पाहिजे ती कुठल्याही पातळीवर पाहायला व अनुभवायला मिळत नाही. असं म्हणतात जो देश आपला इतिहास विसरतो तो स्वतःचा भुगोल गमावून बसतो.

पुतळा पुन्हा उभा राहू शकतो अन् राहिल देखील पण त्यांचे वैचारिक संस्कार निर्माण करणाऱ्या व्यवस्था उभ्या करणार आहोत का हा मुलभूत प्रश्न आहे.

रविवार, २६ मे, २०२४

क्षमा विरस्य भुषणम् ...!

 



आज अचानक व्यवसायिक संबंधांतून मित्र झालेल्या इरफान चा फोन आला अन् काही विचारायच्या आधीच तो तिकडून म्हणाला उद्या मी हजला चाललोय माझं काय चुकलं असेल तर माफ कर अन् त्यांनी फोन ठेवला.

खरंतर मी काही वेळ स्तब्ध झालो नंतर मनात विचार आला की, ठरवलं तर आयुष्य किती सरळ अन् सोपं आहे. तिर्थक्षेत्री देवाला भेटण्यासाठी जाताना का असेना माफी मागण्याची पद्धत अथवा प्रथा किती शिकवणं देणारी आहे. देवाला भेटायला जाताना मन, चित्त शुद्ध असणे हेच देवाला अपेक्षित आहे. कुणाचेही कळत नकळतपणे मन दुखावण्याने त्यांच्या मनात आपल्या विषयी असणाऱ्या रागाचा किंवा आपल्याला कुणाविषयीही असणाऱ्या राग, द्वेष या भावनांचा केवळ माफी मागण्याने एका क्षणात निचरा होतो अन् मनावरचं अनामिक ओझं दूर होऊन मन हलकं होतं.

वारकरी संप्रदायात वयाचा मानाचा विचार न करता एकमेकांच्या पाया पडणं असो की दरवर्षी संवत्सरी रोजी, पर्युषण सणाच्या आठव्या आणि शेवटच्या दिवशी, जैन एकमेकांना “मिछामि दुक्कडम्” अर्थात मी तुमची मनापासून क्षमा मागतो असे म्हणणे असो की गौतम बुद्धांनी दिलेला क्षमाशील होण्याचा उपदेश आपल्याला खऱ्याअर्थाने आंतरीक शांततेकडे घेऊन जातो.

तुझ्या वाचून करमेना या मराठी चित्रपटातील "भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर..." हे गाणं सुद्धा आपल्याला क्षमा करून आपल्याच माणसांत रमायला शिकवते.

एकंदरीतच माफी मागणं व माफ करणं हेच खरं माणूस असल्याचे लक्षण आहे.

यानिमित्ताने मी देखील कळत नकळतपणे कुणाचेही मन दुखावले असेल तर मनापासून क्षमा मागतो. 



बुधवार, १० जानेवारी, २०२४

Mindful vs Mindful AI...!

 


Name Suchana Seth

MSc physics Topper of the Calcutta University.

Specialisation in Plasma and Astrophysics.

Degree in Sanskrit and topper too.

Expert in machine learning.

From 12 yrs Data Scientist in Newyork.

AI ethics expert

CEO, Mindful AI Lab listed in Top 100 AI industries.

Women of the year.

 काय मित्रांनो कसा वाटला बायो-डाटा एकदम प्रभावित करणारा ना? खरंतर एका एवढ्या उच्च शिक्षित, कर्तबगार महिले बद्दल अभिमानच वाटणार अन् तीचा करिअर ग्राफ पाहता ते साहजिकच आहे.

परंतू आज या महिलेची इथे चर्चा करण्याचे कारण म्हणजे या महिलेला नुकतेच अटक केले अन् त्याचं कारण ऐकुन तुम्हाला एकदम धक्काच बसेल ते कारण म्हणजे तीने स्वतःच्या ४ वर्षे वयाच्या मुलाला उशीने तोंड दाबून मारले अन् त्याचा मृतदेह बॅगेतून घेऊन जात असताना पोलिसांनी तीला पकडले.

समाजात शिक्षण , पद, पैसा अन् त्यातून मिळणारी प्रतिष्ठा हीच माणसाची उंची ठरवते परंतु त्याची नैतिक उंची ही त्याच्या जीवनमूल्यातच सामावलेली असते. एखाद्या कडे असणाऱ्या असामान्य बौद्धिक क्षमतेचे अप्रुप वाटू शकते पण सरतेशेवटी त्याच्याकडे असणारी मानवीय मुल्यं अधिक प्रभावी असतात.

सध्याचं जग क‌त्रिम बुद्धीमत्तेच्या चक्रव्युहाकडे  मार्गक्रमण करीत आहे अन् त्यातून येणाऱ्या ताणतणावासाठी नैसर्गिक मनःशांती आवश्यक आहे परंतु त्यासाठी सुद्धा आपण कृत्रिम बुद्धिमत्तेवरच भर देणार असू तर मानवी संस्कारांचा अभाव अश्याप्रकारची दुर्बुद्धीच देणार. खरंतर ही घटना Mindful vs Mindful AI यांच्यातील दरीतून निर्माण होऊ घातलेल्या अस्वस्थतेच्या परिपाकाची आहे.