खरंतर एक वाईट घटना घडली सिंधुदुर्ग येथील केवळ नऊ महिन्यांपूर्वी नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. अर्थात कारण नैसर्गिक आहे.
परंतू मला वैयक्तिक या घटनेचं वाईट वाटले पण त्या पेक्षाही समाजात ढासळलेली नैतिकता अन् वैचारिक अधःपतन अधिक क्लेशदायक आहे असे वाटते. आपण पुतळ्यांच्या नावाखाली सर्वच महापुरुषांना प्रतिकात्मक सोपस्काराच्या प्रथा परंपरेत अडकवून त्यांच्या विचारधारेचे धिंडवडे काढलेत अन् ते मुकाटपणे उभे राहून हतबल व हताशपणे पाहत राहण्याशिवाय त्या पुतळ्यांना गत्यंतर उरले नाही यापेक्षा अधिक दुःखदायक काय असू शकेल.
वास्तविक गावोगावी अन् गल्लोगल्ली महापुरुषांचे नुसते पुतळे उभे करून आपण काय साध्य केले हा समाज म्हणून आपण स्वतःला प्रश्न विचारणार आहोत का, का केवळ उपऱ्या जयंत्या अन् पुण्यतिथ्या साजऱ्या करत धुडगूस घालत उन्मादक उत्सव साजरे करणार आहोत. इतिहासातून जी वैचारिक प्रेरणा व दूरदृष्टी आपण सर्वांनी घेतली पाहिजे ती कुठल्याही पातळीवर पाहायला व अनुभवायला मिळत नाही. असं म्हणतात जो देश आपला इतिहास विसरतो तो स्वतःचा भुगोल गमावून बसतो.
पुतळा पुन्हा उभा राहू शकतो अन् राहिल देखील पण त्यांचे वैचारिक संस्कार निर्माण करणाऱ्या व्यवस्था उभ्या करणार आहोत का हा मुलभूत प्रश्न आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा