गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

सध्याच जग...!

 


वेगानं अन् त्वेषानं धावणारे जग.

सत्वहीन खाणं अन् तत्वहीन जगणं.

लायकी नसतानाही अती महत्वाकांक्षी असणारी लोकं.

प्रसिद्धी म्हणजेच यश अन् तथाकथित यशस्वी असणाऱ्यांनाच आदर्श समजणारा भवताल.

अती आरामाचे व्यसन अन् त्यासाठी तंत्रज्ञान अवलंबत्व.

माहिती म्हणजेच ज्ञान असा समज झाल्यामुळे सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान असल्याचा नव साक्षात्कार.

सगळ्यातलं सगळं कळतंय ही भावना.

माध्यमं नेहमीच समाजासाठी मुख्य अन् महत्वाचं प्रेरणास्रोत राहिलित परंतू माहितीचा केवळ प्रसार म्हणजे प्रज्ञावंत असल्याचा आभास निर्माण करणे अन् त्यातच रमणे.

मनोरंजन असो की प्रबोधन याचा येथेच्छ भडिमारामुळे आलेला उबग.

समाज चुटकी सरशी एवढा पुढारलाय की त्याला कोणत्याही समाज प्रबोधनाची गरज उरली नाही केवळ फायद्याच्या,आर्थिक उन्नती च्या वेगवेगळ्या क्लृप्त्या, फंडे यांचीच जास्त निकड भासतीय.

समोरासमोरचा संवाद, एखाद्या माणसा कडून प्रत्यक्षात ज्ञान घेण्यापेक्षा ऑनलाईन माहिती घेणे जास्त सोयीस्कर वाटते.

या पिढीला मग ती युवा असो, मध्यम वयीन असो की वृद्ध या तीन्ही टप्प्यातील लोकांना बांधून अन् पर्यायाने व्यापून टाकणारे तंत्र म्हणजेच हे मोबाईल नावाचं यंत्र होय.

यात अडकल्यामुळे हे जग धावतंय पण सध्याच्या या धावत्या जगाला उसंत हवीय का हा खरा प्रश्न आहे.

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

एक वर्तुळ पूर्ण झाले...!

 




एक वर्तुळ पूर्ण झाले...!

यावर्षीच्या सुरवातीलाच ऑटो एक्स्पो मध्ये टाटा सियारा चे जुने व नवे अशी दोन्ही मॉडेल ठेवली होती आता 25 नोव्हेंबर 2025 ला नवीन सियारा लाँच होत आहे त्याचीच जाहिरात आज मी बघितली अन् त्यात वापरलेली जी जुनी सियारा आहे ती माझी आहे ह्या गोष्टीचा मला मनोमन अभिमान वाटला. खरंतर सर रतन टाटा यांच्या इच्छे खातर टाटा मोटर्स त्यांची भारतातील पहिली एस यू व्ही सियारा पुन्हा एकदा बाजारात आणत होते त्यासाठी ते चांगल्या स्थितीत असलेल्या जुन्या टाटा सियाराच्या शोधात होते आणि फेसबुकवर त्यांनी माझ्या टाटा सियाराचे फोटो पाहिले व माझ्याशी संपर्क साधला. खरंतर ती देण्याच्या आठच महिन्या पूर्वी मी तिच्या रंगरंगोटी,फ्लोरिंग,टायर वगैरे यासाठी जवळ जवळ दीड लाख रुपये खर्च केले होते त्यामुळे ती विकावी असा काही प्रश्नच नव्हता. परंतू टाटा मोटर्स चे काही अधिकारी गाडी बघण्यासाठी कराड येथे आले अन् त्यांना पहिल्याच भेटीत माझी सियारा एकदम पसंत पडली अन् तुम्ही ही सियारा टाटा मोटर्सला द्याल का एका प्रोजेक्ट साठी आम्हाला ती हवीय अशी विचारणा केली. ते ऐकून खरंतर माझ्या मनात आनंद व अस्वस्थता अशा संमिश्र भावना निर्माण झाल्या. मी त्यांना नंतर सांगतो असे सांगितले.

त्यानंतर घरी या विषयांवर चर्चा झाली एका बाजूला पॅशन अन् दुसऱ्या बाजूला टाटा मोटर्सचा महत्वाकांक्षी प्रकल्प मग सरतेशेवटी सर रतन टाटा यांच्या विषयी असलेल्या प्रेम,आदर,सन्मान या भावना जास्त प्रभावी ठरल्या अन् मग माझी सियारा त्यांना देण्याचा निर्णय घेतला.

स्वतः सर रतन टाटा असते तर त्यांनी या गोष्टीची सहृदयतेने दखल घेतली असती याबद्दल मला विश्वासच नव्हे तर खात्री आहे कारण एखादी वस्तू असो की विचार त्यामध्ये एक भावनिक खोली किंवा ज्याला प्रेमातून निर्माण झालेला वेडेपणा (बहुतांश लोकांच्या दृष्टीने अव्यवहारिक निर्णय)असावा लागतो तो त्यांच्या ठायी होता.अशीच सियारासाठी वेडेपणा असणारी बरीच मंडळी माझ्या पाहण्यात आहेत मी सुद्धा अशा सियारा प्रेमवेड्यांच्या व्हॉट्स अप ग्रूप (पुणे सियारा, क्लब सियारा पॅन इंडिया ग्रूप)मधे होतो तेंव्हा उत्कट प्रेम आणि जिवापाड जतन करणे काय असते हे मी जवळून अनुभवलय. तेव्हां सर रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट लक्षात घेता सियारा स्वतः घेऊन टाटा मोटर्स पुणे येथील गेट वर जमा केली अन् ती पुण्याला नेण्यापूर्वी एक सुंदर आठवण म्हणून तिच्या सोबत प्रोफेशनल फोटोशूट सुद्धा केला.

असो एक स्वप्न सत्यात उतरतंय अन् आपल्या सारख्या पामरा कडून त्यासाठी खारीचा वाटा देण्याचं भाग्य लाभले हे ही नसे थोडके. खरंतर माझ्या पुरते बोलायचं झालं तर सर रतन टाटा यांना ती माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली च आहे अन् दुसरं म्हणजे जिथून ती सियारा जन्माला आली तिथेच ती परत गेली अन् एक वर्तुळ पूर्ण झालं व या सर्व गोष्टींसाठी मी माध्यम झालो हेच माझं भाग्य आहे.

संदीप महामुनी.

7020140216











सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

पोवाडा ऊर्जा, शहारा अन् प्रेरणादायी विचार यांचा जागर...!





 नुकतेच कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे (सर्किट बेंच) भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही गोष्ट घडत असताना मला एका गोष्टीने प्रभावित केले ती म्हणजे त्यांच्या समोर सादर करण्यात आलेला पोवाडा 

शाहीर विशारद डॉ.आझाद नायकवडी यांनी तो पोवाडा सादर केला खरंतर एखादी घटना अस्तित्वात येते तेंव्हा त्या पाठीमागे द्रष्टेपणाने कार्य केलेल्या थोर समाज सूधारकांचे योगदान ते सद्य स्थितीतील घडामोड याची मांडणी थोडक्यात अन् प्रभावीपणे विशद करण्याची ताकद काय असते तेच त्यांनी दाखवून दिले. अंगांगत रोमांच भरणे अन् भारावून जाणे काय असते हे आजच्या काळात देखील आपल्या पोवाडा संस्कृतीतून तेवढ्याच ताकदीने मांडता येते हेच प्रकर्षाने जाणवले अन् खरोखरच पोवाडा ऊर्जा, शहारा अन् प्रेरणादायी विचार यांचा जागर असतो हे अधोरेखित झाले.

शाहीराला अन् शाहिरी संस्कृतीला मानाचा मुजरा

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

पिरमाची माधुरी...!

 






माधुरीच्या पिरमात पडणारी मंडळी ह्यो ईषय काय नवीन नाय त्यो गजगामिनी फेम फिदा हुसेन बी सगळ्यास्नी माहीत हाईच पण आमची ही माधुरी लई येगळं प्रकरण हाय एकदम ईषय हार्ड... 

अब्जाधीश बापाच्या बेण्याचा हट्ट पुरवायच्या नादात...नाद बी केला त्योय बी कुणाचा.. आयाया... कोल्हापूरकरांचा इथं कुस्तीचं मैदान आसूदे नाय तर इथल्या मातीतला ईषय आसुदे कोण बी जाहागीरदार आडवा आला की चितपट करत आसमान दाखवणार म्हणजे दाखवणारच ईषय गोल..

ती नव्ह आमच्या काळजातली माणसं आसू दे नाय तर गाड्याघोडं एकदा का मनात बसलं की इथं त्याच्यासाठी काय पण असतय मग फायदा नुकसानीचा हिशोब नसतोय असतं ती फक्त पिरेम..

आमच्या माधुरीला नुसती हत्तिन समजून कोर्टाचा कागुद दाखवत वनताऱ्यात नेण्याचा ज्यो कपटीपणा क्येलाय त्यो डोस्क्यात ग्येलाय त्यांच्या बाजूनं पैशान ईकत घेतलेला काळा कोट आसू दे नाय तर सरकार ह्ये कोल्हापूर हायं बघितलय नवं इथं येक आवाज टाकला की पाच पाच लाख लोकं रस्त्यावर उतरायलायत. आमच्या साठी ती नुसती हत्तिन नव्हं महादेवी हाय अन् हिथं खुद्द आंबाबाई पाठीशी असतीया ह्ये इसरू नका.

जरा त्या आंबानीसनी बी कळाय पाहिज्ये पैशानं सगळं ईकत घेता यत नाय ज्या पैशानं ईमेजी उभी क्येलायती त्या असल्या नको त्या उद्योगा पायी डॅमेजी होत्याली हिथं सगळच ब्रॅन्ड असतया मग पायताण असलं तरी जगात भारी कोल्हापूरी...

रां... गप गुमान माधुरीला मागं धाडा  ईषय लय इस्कटायला लावू नका नाय तर खटक्यावर बोट जाग्यावर पलटी..

संदीप महामुनी, कराड.


रविवार, ६ जुलै, २०२५

प्रभामंडळ स्वरुप वारी...!



वारी अन् वारकरी महाराष्ट्राचं अन् अर्थात मराठी माणसांचं एक अजब रसायन आहे. वारीत प्रतिबिंबीत होणारा महाराष्ट्र अन् प्रत्येक वारकऱ्यामध्ये प्रतिबिंबीत होणारा मराठी माणूस हीच खरी ओळख आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची. वारीत जाणारे वारकरी अन् वारकऱ्यांमुळे बहरणारी वारी म्हटलं की  विठ्ठल नामाचा गजर ऐकू येतो अन् आपसूकच विठ्ठल नामाची गोडी लागू लागते.


संत विचारांची मांदियाळी जिथं जमते तिथं वारी सुरू होते.

अहंकार जिथं संपतो तिथं वारी सुरू होते. 

भेदभाव जिथं संपतो तिथं वारी सुरू होते. 

जिथं चराचरात सामावलेल्या परमेश्वरा बद्दल कृतज्ञता निर्माण होते तिथं वारी सुरू होते. 

जिथं विठ्ठल भेटीची ओढ लागते तिथं वारी सुरू होते. 

प्रत्येक माणसात जेव्हां बा विठ्ठल माऊली दिसू लागतो तेव्हां तिथं वारी सुरू होते. 

अन् पुढच्या वारीची ओढ जिथं लागते तिथं वारी पोहोचते.

हे न संपणारं रिंगण अन् प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणारी वारी हे वारकऱ्यांच्या पुर्णत्वाचेच प्रतिक आहे अन् खऱ्या अर्थाने विठ्ठला भोवती असलेल्या प्रभामंडळाचेच स्वरुप आहे.

संदीप महामुनी.





बुधवार, ३० एप्रिल, २०२५

राष्ट्रनिष्ठा...!



लढेन मी शस्त्रानेच, पण शस्त्रविवेक न सोडता

मोडेन मी कायदा ही, न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी

हिंसा घडेल, हिंस्त्रहिंसकाच्या नाशासाठी

आम्ही होऊ धर्मवेडे, धर्मवेड्यांच्या संहारासाठी

होऊ थोडे असंस्कृत, संस्कृतीच्या रक्षणासाठी

जे या मातीत राहतात, त्यांनी या मातीवर प्रेम करायला शिकायला हवं

कारण

ही मातीच तुम्हाला अन्न देते

तुमच्या श्वासांना प्राणवायू देते

आपल्या लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फाळांनी, ती आपला उर चिरुन घेते

आणि परत देते पेरलेल्या तरेख दाण्यागणिक हजार दाणे

म्हणूनच

तिने न मागता तुम्ही तीला द्यायला हवी

निष्ठा

ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं....