रविवार, ६ जुलै, २०२५

प्रभामंडळ स्वरुप वारी...!



वारी अन् वारकरी महाराष्ट्राचं अन् अर्थात मराठी माणसांचं एक अजब रसायन आहे. वारीत प्रतिबिंबीत होणारा महाराष्ट्र अन् प्रत्येक वारकऱ्यामध्ये प्रतिबिंबीत होणारा मराठी माणूस हीच खरी ओळख आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची. वारीत जाणारे वारकरी अन् वारकऱ्यांमुळे बहरणारी वारी म्हटलं की  विठ्ठल नामाचा गजर ऐकू येतो अन् आपसूकच विठ्ठल नामाची गोडी लागू लागते.


संत विचारांची मांदियाळी जिथं जमते तिथं वारी सुरू होते.

अहंकार जिथं संपतो तिथं वारी सुरू होते. 

भेदभाव जिथं संपतो तिथं वारी सुरू होते. 

जिथं चराचरात सामावलेल्या परमेश्वरा बद्दल कृतज्ञता निर्माण होते तिथं वारी सुरू होते. 

जिथं विठ्ठल भेटीची ओढ लागते तिथं वारी सुरू होते. 

प्रत्येक माणसात जेव्हां बा विठ्ठल माऊली दिसू लागतो तेव्हां तिथं वारी सुरू होते. 

अन् पुढच्या वारीची ओढ जिथं लागते तिथं वारी पोहोचते.

हे न संपणारं रिंगण अन् प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणारी वारी हे वारकऱ्यांच्या पुर्णत्वाचेच प्रतिक आहे अन् खऱ्या अर्थाने विठ्ठला भोवती असलेल्या प्रभामंडळाचेच स्वरुप आहे.

संदीप महामुनी.