सोमवार, ९ जुलै, २०१८

मानसिक गुलामगिरीची नांदी....!



          आजच्या दिवसातल्या दोन बातम्या भविष्यातील गंभीर धोक्याची घंटा आहेत यात माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही.
पहिली बातमी म्हणजे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात माऊलींच्या पायावर डोकं ठेवण्याचा कार्यक्रम उरकल्या नंतर भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या स्वयंसेवकांना केलेले मार्गदर्शन. त्यावेळी त्यांनी तुम्हाला तुमचा (प्रत्यक्षात यांचाच ) हेतू साध्य करायचा असेल तर तुमच्या पोस्ट , मॅसेजेस या टोकदार असल्या पाहिजेत असा शहाजोग सल्ला दिला तसेच येणाऱ्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी सायबर योद्धा होण्याचा मंत्र देखिल दिला आहे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार येणारा काळ सायबर युद्धाचा आहे. वरवर यात तथ्य असले तरी जो बागुलबुवा निर्माण करून अनिष्ट प्रथेला खतपाणी घालण्याचाच जो प्रकार घडत आहे त्याचे दूरगामी परिणाम भयंकर आहेत . कारण आधीच सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीला आपल्याला हवे तसे वापरण्यासाठी तथाकथित तज्ञांच्या फौजा तयार करण्याचा घाट उघडपणे घातला जातोय. अन् अशा फौजांच्या सेनापतीचे मनसुबे राष्ट्रहितापेक्षाही स्वहिताचेच अधिक आहेत हे ही न समजण्या इतके तांत्रिक प्रगत मानवी रोबॉट लढण्यासाठी सज्ज होतायत अन् याला (सत्ता अभिलाषी) मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा नेहमीप्रमाणे मम् म्हणतात हा येणारा काळ कीती धोकादायक आहे हेच सुचित करतो. यांच्या उत्तराला तशाच प्रत्युत्तराने सामना करण्यासाठी इतर पक्ष देखिल आपसूकच या आभासी युद्धात ओढले जाणार शेवटी काय स्वतः विचार न करणाऱ्यांचे मेंदू काबीज करणारे मास्टर माइंड आपल्या मनासारखी परिस्थिती निर्माण करून त्यांच्या मतावरच विजय मिळवित जनाधाराच्या गप्पा मारत लोकशाही चिरायु होवोच्या घोषणा देणार. यात 3 जी बी डाटा रोज उपलब्ध करणाऱ्यांची नुसती बोटंच नाहीतर आख्खी मुठच तुपात असणार अन् आपण या मुठीत घुसमटत असू हे वेगळे सांगायला नको.
आता दुसरी बातमी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील. याठिकाणी आय पी एस प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात येते. नुकताच येथील प्रशिक्षणार्थीचा निकाल लागला एकुण १२२ पैकी ११९ जण अनुत्तीर्ण सोप्या भाषेत नापास झालेत. तरी देखील ही मंडळी प्रोबेशनवर विविध ठिकाणी कार्यरत आहेत. हे म्हणजे लाल शेरा मारून देखिल वरच्या वर्गात ढकलण्यात आल्या सारखे झाले. नापास होणे इतपर्यंत ठिक पण त्यांचा प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग असणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड होय मग अशाच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून (भविष्यात येथे लातूर पॅटर्नचे गँगस्टर दिसू नये म्हणजे मिळवली ) निघणारे तथाकथित गुणवंत विद्यार्थ्यांचे भरघोस पीक जर सत्वहिन असेल तर शासन ज्यांच्यासाठी कार्यरत असते त्यांचे खरचं भले होणार आहे का अन् मग हीच मंडळी सामाजिक धोक्यांना पुरून उरणारेत का केवळ पदाचा टेंभा मिरवणारेत.
एकीकडे अति महत्त्वाकांक्षी सत्ताधारी अन् दुसरीकडे कृत्रिम गुणवत्तेवर आधारित प्रशासकीय यंत्रणा यांचा समतोल राखला जाणार का त्यांची अभद्र युती होणार यावरच आपले भविष्य अवलंबून आहे. एकीकडे अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोशल माध्यमांना सक्ती करणारे सरकार तशाच माध्यमाचा गैरवापर करत निरंकुश सत्ता मिळवणार असेल अन् त्यासाठी नियंत्रण करणारी यंत्रणा सक्षम नसेल तर पुढचा अशाप्रकारच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा काळ  हा मानसिक गुलामगिरीची नांदीच ठरणार आहे.

संदिप महामुनी.
sandeepmahamuni.blogspot.in

सोमवार, २ जुलै, २०१८

अगतिकतेच्या टोकावर.....!



रविवार सकाळ दिल्लीतील ११ जणांच्या सामुहिक आत्महत्या तसेच संध्याकाळ धुळ्यातील राईनपाडा येथील  ५ जणांच्या सामुहिक हत्यांनी अस्वस्थ करून गेली.
माणसातील या दोन विरुद्ध टोकाच्या भूमिका जीवन किती अनाकलनीय अन् अस्थीर झालय याचीच जाणीव अधोरेखित करतय.प्राथमिक तपासात सामुहिक आत्महत्या हे मोक्षप्राप्तीच्या विचाराधीन केलेले कृत्य असल्याचे समोर आले आहे.त्यावर त्यांच्या नातेवाईकांनी ते सर्व शिकलेले आहेत त्यामुळे अस काही करणार नाहीत अस म्हंटल आहे पण उच्च शैक्षणिक पदव्या घेणे अन् अंधश्रद्धाळू नसणे याचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो तर त्याची जडणघडण कोणत्या विचारसरणीत  होते यावर ते अवलंबून असते. वरुन कितीही शांत दिसणाऱ्या जीवनाच्या अंतरंगात किती अविचारी चक्रीवादळाने थैमान घातले आहे हे अशा काही तरी अनपेक्षित कृतीनेच समोर येते परंतू लोक त्याकडे केवळ औत्सुक्याच्या परिप्रेक्ष्यातून पाहत असतील तर काही दिवस ही बातमी चर्चेत राहते अन् कालनियमाप्रमाणे विरुन देखिल जाते.
दुसरीकडे एखादा  वॉट्स अप वरील मॅसेजचा स्वैर अर्थ काढत स्वतःच्या कल्पकतेने एखाद्याच्या बाह्य व्यक्तिमत्वावर व पेहराववर आधारित ( स्वच्छ शुभ्र पेहरावातले गुन्हेगार मात्र यांच्या आकलनाच्या पलीकडे असतात ही खरी शोकांतिका आहे..! ) एखाद्या व्यक्ती चा संशय येणे इथपर्यंत ठीक आहे पण त्या व्यक्तीला थेट गुन्हेगार  ठरवून त्याला स्वतःच शासन करणे अगदी कायदा व्यवस्थेला /पोलिसांना न जुमानता वेळ प्रसंगी त्यांच्यावर देखिल हल्ला करणाऱ्या सामुहिक मानसिकतेचा शोध घेणे आवश्यक आहे अन्यथा सुदृढ समाज मनाला नख लागणार यात शंका नाही. समुहाला स्वतःचा चेहरा नसतो अन् विचार ही नसतो असतो केवळ बेभानपणा. परंतू भानावर आल्यावर मात्र आपण निर्दोष लोकांचा बळी घेतला हे ध्यानात आल्यावर कुणाच्या पायावर डोकं ठेवून पापक्षालन करणारेत अन् त्यामुळे ज्यांच्या कुटुंबाचा आधारच गेलाय त्यांच्या दुःखाच काय त्यांना न्याय मिळणार आहे का अन् केव्हा अन् दोन-तीन हजारांच्या समुहातील पाच-दहा लोकांना(कोणता फार्म्युला वापरतात कुणास ठाऊक..! ) शिक्षा होऊन प्रश्न सुटणारे का? का त्यांच्या कुटुंबीयांची झालेली अपरिमित हानी भरुन येणार आहे.
वरील दोन्ही घटना माणूस केवळ माहिती ने भरलेला व भारलेला आहे इतकंच पण तो ज्ञानाने समृद्ध व जाणिवेने प्रगल्भ झालेला नाही हेच दर्शवते. हा पोकळ मानवी उत्क्रांत वाद विनाशाकडेच चालला आहे भले कुणी माकडापासून आपली निर्मिती झाली नाही म्हणो परंतू लोकंच ते आपल्या वर्तनाने खरं ठरवण्यासाठी अगतिक झाले आहेत अन् त्याच त्यांनी टोक गाठलय हेच सत्य विचारचक्र व्यापून टाकतय...

संदिप महामुनी.

बुधवार, ६ जून, २०१८

Inspirational dance move

सोशल मीडिया वर व्हायरल झालेला अन् तिची बातमी झालेला डान्स अंकलचा नव्वदच्या दशकातील 'आप के आ जानेसे 'या गाण्यावर केलेला नाच म्हणजे उत्स्फूर्त अन् मनसोक्त दिलखुलासपणाचा अविष्कार आहे तिथे वय, शिक्षण, हुद्दा,सामाजिक प्रतिमा यांचे अतिरेकी दडपण न घेता आपल्या अंगभूत कला गुणांना तसेच सुप्त ईच्छांना योग्य ठिकाणी व योग्य पद्धतीने वाट मोकळी करून दिली आहे.त्यांच्या डान्स स्टाईल चे सामान्यां पासून ते सेलिब्रिटीज पर्यंत सर्वांनाच कौतुक आहे.केवळ नाच केला म्हणून नव्हे तर अतिशय लयबद्ध व दिलखेचक पणे केलाय अगदी देश-विदेशात ते रातोरात स्टार झाले अर्थात यात इंटरनेट,सोशल मीडियाचा वाटा अधिक आहे पण हे एका दिवसात झालेले नाही त्यासाठी लहानपणापासूनची आवड वेगळ्या क्षेत्रात करियर करून देखिल त्यांनी मनापासून जोपासलीय अन् या पँशनलाच आज संधी मिळाली अन् अगदी या तीस पस्तीस वर्ष विस्मृतीत गेलेल्या जुन्या गाण्याला व त्यातील कलाकारांना देखिल लाईमलाईट मिळाला हे नाकारता येत नाही तसेच येणाऱ्या काळात सार्वजनिक सण समारंभात डीजेवर याची पुनरावृत्ती झाली अगदी पन्नाशीतही उत्साहाने थिरकली तर आश्चर्य वाटायला नको काही नाही तरी ताणतणावमुक्त राहतील.
Live ur passion in daily ups & downs once in lifetime it will recognized by society or at least satisfied oneself.
Hat's off to inspirational move....

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

Shridevi...


        Glamour never stays longlasting but beauty mesmerized us lifetime.Always miss Eyes having conviction power...

Courage thy name is woman...!


Hat's off to Major Kumud Dogara's strong hearted & self-discipline duty towards nation as  Major Kumud Dogra can be seen attending her martyr husband's funeral in the Army uniform along with her 5 days daughter.
Wife of a deceased IAF officer Wg Cmdr Dushyant Vats displayed exemplary & rare epitome of courage.
RIP Wg Cmdr Dushyant Vats

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

लिंक आधार टू निराधार ....


'भुकेला कोंडा अन् निजेला धोंडा' ही म्हण मी नुसती ऐकली होती मात्र कमीतकमी गरजेचे वर्णन करणे अन् ती अनुभवणे किंबहुना भोगणे हे कल्पनातित आहे.
आज वर्तमानपत्रातील एका वृद्ध दांपत्याविषयी बातमी वाचली अन् मन हेलावून गेलं. सोलापूरातील श्रमिक वसाहतीत राहणाऱ्या माचर्ल वृद्ध दांपत्यांनी गरीबी व शारीरिक असमर्थते मुळे चक्क कोळसा खाल्ला...! मी कधी विचारही करू शकत नाही इतकी वाईट अन् हताशाजनक कृती एखादा हतबलपणे करू शकतो.
संजय गांधी निराधार योजनेमुळे त्यांची सुरवातीची काही वर्षे बरी गेली परंतू काही तांत्रिक कारणामुळे ती बंद झाली ती पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक ठिकाणी खेटे घालूनही त्यांच्या हाती निराशाच आली अन् सरतेशेवटी हाती कोळसा घ्यावा लागला हे समाज म्हणून आपले अपयश आहेच पण त्याही पेक्षा व्यवस्था कशी रेड्यावर पाऊस पडल्याप्रमाणे वागते तसेच केवळ कागदोपत्री खर्डेघाशी करण्यात कामकाजपुर्तीचे समाधान मानत मनाशी मनाचे लिंकींग न का होवो पण तांत्रिक आधार लिंकचा आग्रह मात्र केला जातो इतकचं.
पण कोळसा कितीही उगळला तरी काळाच त्याप्रमाणे लाखो कोटीचा कोळसा घोटाळा एकवेळ पचवतील पण एखाद्याला खराखुरा कोळसा पचवताना शरीरापेक्षा मानसिक दृष्ट्या किती जड गेले असेल हे अधिक मन सुन्न करणारे आहे.जोपर्यंत या व अशाप्रकारच्या घटना आजुबाजूला घडत असतील तोपर्यंत प्रगतीशील, विकास हे शाब्दिक बुडबुडेच ठरतात.
लहानपणी मुलांना चांगल्या संगोपनासाठी आईवडिलांची गरज असते अन् पुढे वृद्धापकाळात त्यांना मुलांच्या आधाराची गरज भासते परंतू सगळ्यांनाच ती मिळतेच असे नाही.तेव्हा कौटुंबिक आधार सरकारी अथवा सामाजिक आधारा इतकाच किंबहुना त्याहून अधिक महत्वाचा असतो.तो प्रत्येकाने जपण्याचा व जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे तरच निराधार करणारी लिंक तुटेल.

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

वरकरणी...

                 

                आजकाल कुणीही तथाकथित छिंदम पदाधिकारी कोणत्याही विषयी काहीही बोलतो अन् ते महापुरुष अथवा धर्म या विषयी असेल तर समाजीक जाणीवा किती पोकळ अन् दांभिक आहेत याचीच साक्ष देतो.
माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार समाजातील बहुतांश लोकं याच छिंदम प्रवृत्तीची तोंड देखले अन् सोयीस्कर बोलणारे व वागणारे असतात.
भिन्न जात-धर्म,संस्कृती तसेच हजारो वर्षांचा इतिहास असणारा भारत तांत्रिक लोकशाहीचा मान राखत लादल्या गेलेल्या सार्वभौमाचा वरकरणी स्वीकार करत सर्वधर्म समभाव,बंधुभावाचा मुखवटा घालून प्रार्थनेतील परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून सदैव कसले प्रयत्न करतात हे न उलगडणारे कोडेच आहे मग एखाद्याचा मान ठेवने,सौजन्याने वागने व निष्ठा राखणे दुरच.
मताचा जोगवा मागताना जिकडे गुलाल तिकडे चांगभलं म्हणत मनातील वैयक्तिक अनादर,द्वेषपूर्ण विचार झाकून केवळ हो ला हो म्हणत त्या त्या जाती धर्मातील महापुरुषांच्या तसबीर अथवा पुतळ्याला हार तुरे घालत जयजयकाराच्या घोषणा देत वेळ मारून न्यायची मानसिकता त्यांच्यातील स्वार्थी अपरीहार्यताच दर्शवते.
कोणत्याही महापुरुषाला जात नसते असते ती फक्त सकल समाजाच्या उद्धाराची महत्वाकांक्षा परंतू त्या त्या महापुरुषाला त्या त्या समुहाला चिटकवत त्यांच्या भावनेला हात घालत आपलसं करण्याचा राजधर्म मात्र नेटाने पाळला जातो.
लोकं सुद्धा पेहराव,आभुषणं,अदब,चलचित्रातील भारावून टाकणाऱ्या दृष्य परिणामाच्या प्रभावात वावरतात अन् प्रतिकात्मक पुजा आर्चेलाच सर्वस्व मानत अनुनय केला जातो.परंतू सद्यस्थितिला समाजाचा उद्धार करण्यासाठी आवश्यक विचारधारेचं काय.एकाच समुहातील माणसे महापुरुषाच्या जन्म तिथीवरून देखिल एकवाक्यता दाखवू शकत नसतील तर भिन्न जाती धर्माच्या लोकांचा मेळ कधी लागणार.
महापुरुषांच्या जयंत्या तसेच धार्मिक उत्सव साजरे करणारे त्यांच्या विचारधारा किती आभ्यासतात.त्या त्या धर्मावर अथवा व्यक्तिमत्वावर गाढ श्रद्धा असणारे त्या त्या धर्मग्रंथाचे अथवा चरित्राचे किती वाचन करतात याचे उत्तर ९९.९९% नाही असण्याची शक्यताच अधिक आहे हे बोचरे वास्तव स्विकारण्याचे धाडस आपल्यात नाही ही खरी शोकांतिका.

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

जातीवंत इतिहास...!

               जातीवंत इतिहास...!
           मृतदेह कधी खोटं बोलत नाही अस म्हणतात खरतर मृतदेह बोलणंच नाही तर काहीच करू शकत नाही अगदी खरं-खोटं सुद्धा परंतु इतिहासातील गाडलेले मुडदे (नैतिक आदर ठेवून) मात्र बोलतच नाही तर इतरांना बोलतं करतात त्या पाठीमागे असणारे त्यानां बाहेर काढून जीवंत ठेवणारे बोलवते धनी हे संशोधकांपासून ते लेखकांपर्यंत अन् पुजकांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत थोड्या-जास्त प्रमाणात सगळेच असतात असं मला वाटतं.
भौगोलिक इतिहासाला त्या त्या काळातील प्रभावी व्यक्तिमत्व नेहमीच व्यापून टाकतात मग काहींच्या दृष्टीने त्यांना नायकत्व बहाल केले जाते तर विरोधी मत असणारे त्याला खलनायक ठरवून मोकळे होतात.एकाला वाटणारा नायक दुसऱ्याला खलनायक तर उलट दुसऱ्याला वाटणारा खलनायक पहिल्याला नायक भासतो अन् हा विरोधी मतप्रवाह समांतरपणे वर्तमानापर्यंत प्रवास करतो अन् प्रत्येकजण आपापल्या परिप्रेक्षातून पाहत तो कालातीत राहतो हेच खरं.
हे सगळे घडत असताना प्रत्येक घटना अथवा प्रसंग स्थल-काल वाचक असतो अन् हेच तारतम्य हरवून भावनेच्या भरात वाहवत जात प्रतिक्षिप्त क्रिया केली जाते.याच्या मुळाशी असते माणसाची माणसांनी केलेली विभागणी अन् त्या त्या समुहाची धर्म-जात वर्गवारी व त्यातूनच बनलेली पुर्वग्रहदुषित वर्षोंवर्षांची विचारसरणी.आपणच खरे सच्चे अन् लायक हा दुराग्रह दुराचार करण्यासाठी कारणीभूत ठरतो अन् मग जाता जात नाही तो जातीचाच माज.
स्वतःला लेबल लावून मिरवण्यामधे सुरक्षितता शोधणारे स्वतःच्या अंतरंगामधे डोकावण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत कारण त्यासाठी लागणारा तटस्थपणा, सद्सद् विवेक बुद्धी न झेपणारी असते.
आहे रे व नाही रे दोन्ही वर्गातील आपापल्या एकारलेपण व नाकारलेपण यातूनच निर्माण झालेल्या अपेक्षाभंगाचे दु:ख कवटाळत प्रक्षुब्ध होणे सोपे असते अन् त्याचा राग अशाच सम दु:खी टोळक्याचा भाग बनत असंबधपणे व्यक्त करणे त्याहूनही सोपे असते परंतू असंतोषी भिरकावलेला दगड कुणाला जात धर्म विचारत नाही तो फक्त त्याचं काम चोख करतो.
ज्या देशात अस्थिरतेत स्थिरता शोधणारे नेतृत्व असते तिथे सर्वसमावेशक विचाराला दुय्यम स्थान देत अशांततेचेच राजकारण केले जाते हा जातीवंत इतिहास आहे अन् तो नागरिकशास्त्रावर नेहमीच भारी पडतो.

मुडदे कभी झुठ नही बोलते .... मगर उनको इस्तेमाल करने वाले अपना अपना सच बोलते है।

संदिप महामुनी.

गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

संख्यात्मक पटकथा ....!

             
     
                 पटसंख्या कमी आहे म्हणून महाराष्ट्रातील १ हजार ३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षणखात्याने घेतला परंतू शिकून आपल्या मुलांना आश्वासक भविष्य मिळेल या आशेने मोल मजुरी करून पोट भरणाऱ्या पालकांच्या स्वप्नांचा मार्गच बंद झाला अन् काही हजारभर नियमित शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांना शाळाबाह्य करीत सक्तीची सुट्टी मिळाली.
जो देश जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहतोय त्या देशातील भावी पिढी शासकीय कर्मदारीद्र्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार असेल तर असल्या धोरण लकवाग्रस्त सरकारचं डोक ठिकाणावर आहे का? असं विचारण्याची वेळ पुन्हा स्वतंत्र भारतात आली आहे.मोल मजुरी करणारे पालक स्वतःची रोजंदारी बुडवून ४० किमी पार जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी धडकले अन् मुलांच्या समायोजनाचा फोलपणा दाखवला पण त्यांच्या पदरी निराशाच पडली.
शिक्षणासारख्या अत्यावशक ( अभ्यासक्रमाविषयीची अनास्था गृहित न धरता ) क्षेत्रातील व अधिकार कक्षेतील असंवेदनशील गणंगाकडून होणारे अपरिमित नुकसान येणाऱ्या पिढीला अराजकतेच्या गर्तेत ढकलतायत मग आधुनिकता, विकासाचा चेहरा भेसूर अन् विदारकच असण्याची शक्यता नाकरता येत नाही.
परदेशी संस्कृतीचे आकर्षण भारतीयांना नेहमीच खुणावते अन् त्यांच्या न पाहिलेल्या प्रगतीचे व त्याच्या मुळाशी असणाऱ्या विचारधारेशी न जाता वरपांगी कवतिक सोहळ्यात मश्गूल राहण्यात धन्यता मानणारे आपण भ्रमान्ध होण्यातच आनंद शोधणारे असतो हे खरे बोचरे वास्तव आहे.
याला सदोहरण स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते अन् ती जास्त संयुक्तिक देखिल आहे.जपान मधील होकायडो प्रांतातील कामी-शिराटाकी नावाचे आडबाजूला असणारे रेल्वेस्थानक (A44) आहे ते तेथील कमी प्रवासी संख्येमुळे बंद करण्याचा आर्थिक  निर्णय तेथील रेल्वे महामंडळाने २०१५ साली घेतला परंतू काना हाराडा नावाची एक शाळकरी मुलगी त्या स्थानकातून प्रवास करते हे समजल्यावर तीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उदात्त हेतूने तिच्या एकटीसाठी सकाळ-संध्याकाळ दोनवेळा रेल्वेसेवा शैक्षणिक वर्षाकालासाठी २०१६ पर्यंत चालू ठेवण्याचा आर्थिक आतबट्ट्याचा भावनिक अन् त्याही पलीकडे शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा निर्णय घेतला गेला.यातून केवळ भौतिक प्रगतीच्या चकचकाटा मागे असणाऱ्या शिक्षणासारख्या मुळ विषयाप्रतीच्या संवेदनशील विचारधारेचे केवळ अनुकरण न करता त्यातील धोरणात्मक उत्स्फूर्तता अंगी असणे अधिक गरजेचे आहे.केवळ संख्यात्मक पटकथा मांडून गुणात्मक जबाबदारीचे ओझे डोक्यावरून खांद्यावर नव्हे तर हाताबाहेर करण्याचा घाट घालणे अशोभनीयच नव्हे तर निंदनीय देखील आहे अन् अशा बेजबाबदारांची पटसंख्या जास्त आहे हि खरी शोकांतिका.....

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

रामभरोसे....



             साताऱ्यातील सरकारी दवाखान्यात एका महिलेचा परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे गर्भपात झाला असा आरोप राजकीय महिला कार्यकर्तीने केला अन् परिचारिकेने राजकीय महिला कार्यकर्तीच्या अहंकारामुळे घडले असे सांगितले यावर त्या महिलेच्या आईला प्रतिक्रिया विचारली असता आपण कुणालाही जबाबदार धरत नसुन स्वतःच्या नशिबाला दोष देतो असे हताश विधान केले.या घटनेतून शासकीय यंत्रणा अन् राजकीय व्यवस्था सामान्य माणसाच्या दृष्टीने कसे राम भरोसे आहेत अन् तो स्वतः नशिबाला बोल लावत कसा हतबल झाला आहे हेच प्रकर्षाने जाणवते.
             अशाच प्रकारची भावना कमी अधिक प्रमाणात सर्व देशात बघायला मिळते मग ते काश्मीरी जनता व सुरक्षा सैनिक असू की फेरीवाले,निरूपम व मनसे सैनिक अथवा धोरण व अंमलबजावणी सगळीकडे एक अनामिक अस्वस्थता भासते जी मानसिक अशांततेच्या मुळाशी आहे मग जोपर्यंत काहीतरी स्वयंप्रेरित कारण आहे तोपर्यंत उर्जा खर्च करायची अन् ती संपली की मानसिक द्वंद्व करीत गळून पडायचे.एखाद्याने अजेंडा बनवत आत्मसुखाच्या पायऱ्या चढायच्या अन् इतरांनी स्वार्थबुद्धीच्या कुवतींनुसार तो राबवायचा.मात्र सरळमार्गाने जाऊ इच्छीणाऱ्या सामान्याना काय कमवायचे अन् काय गमवायचे हेच कळत नाही मग जीवंत आहे म्हणून जगायचं का जगण्यासाठी जीवंत राहयचं हा अनुत्तरित प्रश्न घेऊन फक्त श्वास घेत राहायचं.सरते शेवटी त्या जगद् निर्मात्याला दोष देणे सोयीस्कर असते कारण त्याने लिहलेल्या नशिबाने एकदा थट्टा केली की राजाचा रंक होतो अन् आपला विश्वास असो अगर नसो आपल्या वाट्याला वाटाण्याचा अक्षताच येतात.का कुणास ठाऊक हे लिहीत असताना एक गाण आठवतय खेळ कुणाला दैवाचा कळला, तु असो, मी असो, कुणी असो....

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

मृत्यू एक कटुसत्य...!



दडते ते पाप, घडते ते पुण्य
चढते ती धुंदी, उरते ते शुन्य
जडतो तो जीव, लागते ती आस
बुडतो तो सुर्य, उरे तो आभास
कळे तोच अर्थ, उरे तोच रंग
ढळतो तो अश्रु, सुटतो तो संग
दाटते ती माया, सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव ते तर आभाळ
घन निळा डोह, कधी दृढ़ माया
आभाळमायाss  आभाळमायाss

संतोष
मृत्यूने तुझ्या जगण्याला मिळालेला पुर्णविराम जरी अस्वस्थ करणारा असला तरी आठवणींची साठवण करणे एवढेच शिल्लक राहिलय. मृत्यूनंतर (जर काही असेल तर) तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळून मोक्ष प्राप्ती होवो हीच त्या अद्वैताला प्रार्थना...

शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

काळवंडलेल्या स्वातंत्र्याचा दीनपणा....!

काळवंडलेल्या स्वातंत्र्याचा दीनपणा....!

गोरखपुर,उत्तरप्रदेश येथिल बाबा राघवदास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल मधे कृत्रिम अॉक्सिजन वीना ६३ जणांचा मृत्यू झाला त्यामधे जवळपास ३२ लहान बालकांचा समावेश आहे.कृत्रिम अॉक्सिजन पुरवठा करणाऱ्याचे ६४लाखाचे बिल थकित असल्याने त्याने पुरवठा थांबवला अन् हा अपघात घडला असं सांगण्यात आले.खरतर हा अपघात नसून संवेदनहीन व कर्तव्यच्युत व्यवस्थेने केलेली हत्या आहे.
सगळ्यात सन्माननीय व्यवसाय म्हणून मान्यता असलेल्या तसेच मानवीय जीवन हेच प्रमुख आधार व उद्देश्य असलेल्या व्यवस्थेत एवढ्या प्रमाणावर बेफिकरपणा अन् मुळ उद्देश्यालाच हरताळ फासला जात असेल तर आपण भौतिक दृष्ट्या प्रगत होत असून माणूस म्हणून मागासलेल्या मनोवृत्तीचे द्योतक आहोत हेच खरे.
चार दिवसांनी ७०वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना केवळ गुलामीच्या जोखडातून मुक्त झालोय पण गुलामी मानसिकतेतून कर्तव्याकडे पाहण्याची वृत्ती मात्र जैसी थे आहे.व्यक्ती तसेच व्यवस्था ह्या दोन्ही एकमेकांना पुरक असतात तेव्हा दोन्हीही नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असल्यास संपूर्ण समाज पर्यायाने देश विकलांग होतो.अन् असा भौतिकदृष्ट्या स्वतंत्र पण नैतिकदृष्ट्या विकलांग देश मर्यादित प्रगती करतो.इव्हेंट मँनजमेंटच्या जमान्यात अन् कानठाळ्या बसविणाऱ्या आत्ममग्न जल्लोषात करूणेची आर्त हाक ऐकण्यासाठी संवेदनशील मनाची गरज भासते मात्र एका मागून एक धडकत जाणाऱ्या ह्रदयद्रावक घटनांनी समाजमन बोथट झालय.कुणालाही कशाचच काही वाटत नाही दु:खसुद्धा एकाकी पडलय अन् पिडीतांपुरतं मर्यादित झालय.
हे दुश्चक्र थांबवायला हवे.शासन ही कुठली तांत्रिक बाब नसून लोकांनी लोकांच्या माध्यमातून लोकहितासाठी राबविलेली यंत्रणा असते ती व्यवस्थित चालण्यासाठी व्यवस्थेबरोबर संवेदनशील मनाची गरज असते.आपल्या पुर्वजांनी भोगलेल्या पारतंत्र्याचं दु:ख स्वातंत्र्यात जन्मलेल्या पिढीला समजण्यासाठी आपल्या जाणीवा प्रगल्भ पाहिजेत अन्यथा उजळमाथ्याने फडकणाऱ्या तिरंग्याभोवती काळवंडलेल्या स्वातंत्र्याची प्रभावळ तयार होईल अन् त्याचा दीनपणाच अधोरेखित होईल.
नकोत केवळ शुभेच्छांचा सोपस्कार;
नकोत नुसता जिलेबी अन् देशभक्ती गीतांचा भडीमार,
हवा त्यात कर्तव्यदक्षतेचा स्विकार

तेव्हांच बनेल सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा..!
BEWARE BEFORE BECOME GARBAGE

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

मीबी घडलो तुमीबी घडाना....!!

       
मीबी  घडलो  तुमीबी  घडाना....!


प्रत्येकजण आपापल्या कर्म सिद्धांतानुसार त्या त्या पद्धतीने आयुष्य जगत असतो.कोण का, कसे अन् तसेच का जगतो याला ठोस असे उत्तर नसते पण प्रेरणा देणारीे अनेक कंगोरे असलेली त्याची स्वतंत्र गोष्ट मात्र नक्की असते.
मी मागेवळून पाहतानाही कळतय अन् आठवतय तसं जीवनप्रवाह ज्या ओबडधोबड,कडीकपाऱ्यातून होत गेला तो माझं मलाच कोड्यात टाकत जातो पण प्रत्येक क्षण शृंखलारूपी आयुष्यातील महत्वपूर्ण टप्पा असतो हे मात्र खरं.


गुरुवार, २० जुलै, २०१७

BANG THE BAN....!!!

BANG THE BAN....!!!

            An innocent cartoon has tremendous power to threat world's second power underlines the importance of democracy.
Irony remarks are shortest cut to the truth.

"Winnie the pooh" u prove it love u.





बुधवार, १९ जुलै, २०१७

बा विठ्ठला तुझाच ह्यो विटाळ....!

बा विठ्ठला तुझाच ह्यो विटाळ....!

कृपादृष्टी व्हावी म्हणून तसबीरीला रोज साफसुफ करून गंध फुल वाहून पुजा अर्चा केली जाते अन् काही दिवसानी अनामिक भितीपोटी तर कधी वास्तूतज्ञाचे सल्ल्यानुसार तीच तसबीर बदलत त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नदीत फेकून सुटकेचा निश्वास टाकला जातो तेव्हा दुखावणाऱ्या धार्मिक भावना बोथट कशा होतात..?







बुधवार, १२ जुलै, २०१७

अबोल लेखणी अबोल कुंचला....!


माझे आवडते व्यंग्यकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन झाले  त्यांनी सामनाच्या उत्सव पुरवणीतून संडे मुड, बाप दाखव,भुईचक्र, रंगमंच या सदरातून विपुल लेखन केले तसेच अनेक सामाजिक अंगावर रेषांचे फटकारे मारले.त्यांच्या जाण्याने एक मार्मिक व्यंगचित्रकार, लेखक हरपला अन् आता विचारांना एक नवी दिशा देणारा दीपस्तंभ विझून गेला हे मी माझे वैयक्तिक नुकसान समजतो.त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच प्रार्थना..!
                     
                   
                भावपुर्ण श्रद्धांजली....!


सोमवार, १२ जून, २०१७

?! निजात्मभाव


              सोडा बॉटल चष्म्यातून बघावे लागणारे तारांकित वैधानिक ईशारे अथवा नियम व अटी म्हणजे र्निभेळ,निरामय जगण्यास अत्यावश्यक गोष्टींना कस्पटासमान लेखत फाट्यावर मारणे व उथळ गोष्टींचे प्रलोभन अधिक ठळक करीत कायदेशीर चौकटीत बसवल्याचे समाधान मानत राजरोसपणे ठकवणे.
"धुम्रपान व मद्यपान हानिकारक" अशा आशयाचे वैधानिक ईशाऱ्याच्या तळटीपाचे सोपस्कार करीत भडीमार करणाऱ्या दारूच्याच कंपनीचा सोडा विकणाऱ्या जाहीरातीपासून उत्तान व उन्माद आयटम साँगपर्यंत सर्वकाही जगण्यावर प्रभाव टाकते अन् नकळत हेच प्रचलित वास्तव आपले स्वभाव वैशिष्ट्ये बनते अन् वर्षोंवर्ष पिढ्यान् पिढ्या खपत तोच आपला निजात्मभाव बनतो.मग सोपस्कार फँशननुसार ईतिहासाची चाळण झालेली पानं कुरवाळत त्यातील पात्रं म्हणजेच महापुरुष जीवंत करीत त्यांची नको ती प्रेरणा घेवून शिवाजी/संभाजी नावाच्या बिड्या फुकतात.इतर वेळी दुखावणाऱ्या भावना अशावेळी मात्र निबर असतात.आधुनिक जीवनशैलीशी सोयीस्कर सांगड घालत या महापुरुषांना आपमतलबी पद्धतीने गोंजारत स्टाईल स्टेटमेंट बनवत धेडगुजरी प्रयोग सादर करीत वेगवेगळे झेंडे हातात घेत आपल्याच गोंधळलेल्या मानसिकतेत रममाण होत राहतात.
आपल्याला समस्यांच्या मुळाशी जावून त्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्यात स्वारस्यही नसते अन् जबाबदारीचे भानही नसते असतो तो केवळ सोपस्कार म्हणूनच न्यायालयाचा आदर राखत ५०१ मीटरवर बार चालू राहतो,डान्सबार एवजी कलापथक फुलतात अन् गुटख्या एवजी मावा चघळतात.
प्रवास जरी तेजस एक्सप्रेस मधुन केला तरी प्रवासी मात्र जनरल मानसिकतेचे असतील तर अशा आधुनिक विकासाची कास धरून काय साध्य होणार सरतेशेवटी वरवरची रंगरंगोटीचा लेप तडकणारच अन् आतील भेसूर चेहरा उघडा पडणारच.
सध्याच्या सामाजिक, राजकीय,आर्थिक परिस्थितीत जोपर्यंत प्रतिकात्मक नैतिकता हाच आपला निजात्मभाव असेल तोपर्यंत दिखावेगिरी करणारेच आदर्श असेल अन् जगणे हा एक सोपस्कार..!