आजच्या दिवसातल्या दोन बातम्या भविष्यातील गंभीर धोक्याची घंटा आहेत यात माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही.
पहिली बातमी म्हणजे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात माऊलींच्या पायावर डोकं ठेवण्याचा कार्यक्रम उरकल्या नंतर भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या स्वयंसेवकांना केलेले मार्गदर्शन. त्यावेळी त्यांनी तुम्हाला तुमचा (प्रत्यक्षात यांचाच ) हेतू साध्य करायचा असेल तर तुमच्या पोस्ट , मॅसेजेस या टोकदार असल्या पाहिजेत असा शहाजोग सल्ला दिला तसेच येणाऱ्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी सायबर योद्धा होण्याचा मंत्र देखिल दिला आहे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार येणारा काळ सायबर युद्धाचा आहे. वरवर यात तथ्य असले तरी जो बागुलबुवा निर्माण करून अनिष्ट प्रथेला खतपाणी घालण्याचाच जो प्रकार घडत आहे त्याचे दूरगामी परिणाम भयंकर आहेत . कारण आधीच सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीला आपल्याला हवे तसे वापरण्यासाठी तथाकथित तज्ञांच्या फौजा तयार करण्याचा घाट उघडपणे घातला जातोय. अन् अशा फौजांच्या सेनापतीचे मनसुबे राष्ट्रहितापेक्षाही स्वहिताचेच अधिक आहेत हे ही न समजण्या इतके तांत्रिक प्रगत मानवी रोबॉट लढण्यासाठी सज्ज होतायत अन् याला (सत्ता अभिलाषी) मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा नेहमीप्रमाणे मम् म्हणतात हा येणारा काळ कीती धोकादायक आहे हेच सुचित करतो. यांच्या उत्तराला तशाच प्रत्युत्तराने सामना करण्यासाठी इतर पक्ष देखिल आपसूकच या आभासी युद्धात ओढले जाणार शेवटी काय स्वतः विचार न करणाऱ्यांचे मेंदू काबीज करणारे मास्टर माइंड आपल्या मनासारखी परिस्थिती निर्माण करून त्यांच्या मतावरच विजय मिळवित जनाधाराच्या गप्पा मारत लोकशाही चिरायु होवोच्या घोषणा देणार. यात 3 जी बी डाटा रोज उपलब्ध करणाऱ्यांची नुसती बोटंच नाहीतर आख्खी मुठच तुपात असणार अन् आपण या मुठीत घुसमटत असू हे वेगळे सांगायला नको.
आता दुसरी बातमी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील. याठिकाणी आय पी एस प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात येते. नुकताच येथील प्रशिक्षणार्थीचा निकाल लागला एकुण १२२ पैकी ११९ जण अनुत्तीर्ण सोप्या भाषेत नापास झालेत. तरी देखील ही मंडळी प्रोबेशनवर विविध ठिकाणी कार्यरत आहेत. हे म्हणजे लाल शेरा मारून देखिल वरच्या वर्गात ढकलण्यात आल्या सारखे झाले. नापास होणे इतपर्यंत ठिक पण त्यांचा प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग असणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड होय मग अशाच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून (भविष्यात येथे लातूर पॅटर्नचे गँगस्टर दिसू नये म्हणजे मिळवली ) निघणारे तथाकथित गुणवंत विद्यार्थ्यांचे भरघोस पीक जर सत्वहिन असेल तर शासन ज्यांच्यासाठी कार्यरत असते त्यांचे खरचं भले होणार आहे का अन् मग हीच मंडळी सामाजिक धोक्यांना पुरून उरणारेत का केवळ पदाचा टेंभा मिरवणारेत.
एकीकडे अति महत्त्वाकांक्षी सत्ताधारी अन् दुसरीकडे कृत्रिम गुणवत्तेवर आधारित प्रशासकीय यंत्रणा यांचा समतोल राखला जाणार का त्यांची अभद्र युती होणार यावरच आपले भविष्य अवलंबून आहे. एकीकडे अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोशल माध्यमांना सक्ती करणारे सरकार तशाच माध्यमाचा गैरवापर करत निरंकुश सत्ता मिळवणार असेल अन् त्यासाठी नियंत्रण करणारी यंत्रणा सक्षम नसेल तर पुढचा अशाप्रकारच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा काळ हा मानसिक गुलामगिरीची नांदीच ठरणार आहे.
संदिप महामुनी.
sandeepmahamuni.blogspot.in















