महिला सबलीकरण, महिला आरक्षण, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सन्मान या घोषणांचा अथवा धोरणांचा नुसता उदो उदो करून कसलाही पुरोगामी विचार अन् कृती अस्तित्वात येऊ शकत नाही त्यासाठी स्त्रियांविषयी आदर रक्तातच असावा लागतो. खरंतर केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर समस्त भारतीयांना आदर्श अन् प्रेरणादायी अशा महापुरुषाने आपल्या इथे जन्म घेतला याचा अभिमान असायलाच हवा अन् ते व्यक्तिमत्व म्हणजे एकमेवाद्वितिय छत्रपती शिवाजी महाराज.
त्यांच्या कारकिर्दीतील असंख्य उदाहरणे त्यांच्या उच्च कोटीच्या नैतिकतेची साक्ष देतात. उमरखिंडीत महाराजांच्या विरोधात लढलेली मोगली फौजेची रायबाघिणीचा पराभव होऊन देखील तिच्या हुद्द्या प्रमाणे तीचा मानसन्मान करत तीला परत पाठवले. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कर्नाटकातील बेळवाडीची किल्लेदार सावित्रीबाई देसाई ही महाराजांच्या सैन्या विरोधात लढत होती तिच्या किल्ल्याला तब्बल महिनाभर महाराजांचा सरदार सकुजी गायकवाड याने वेढा दिला होता अन् अखेर तीचा पराभव झाला मात्र सकुजी गायकवाडाने उन्मत्त होऊन तिच्यावर बलात्कार केला अन् जेव्हा ही गोष्ट महाराजांना समजली तेव्हा त्यांनी सकुजी गायकवाडाचे डोळे काढून आयुष्यभरासाठी कोठडीत ठेवले. तसेच सावित्रीबाई देसाई यांची क्षमा मागून त्यांचा यथोचित सन्मान राखला. यादवाडला सावित्रीबाई देसाई यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दुध पाजताना चे महाराजांचे शिल्प त्यांच्या सह्रदयतेचीच साक्ष देत आजही उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर आपल्यातील रांझ्याच्या पाटलाने पाटीलकीचा माज करत एका गरीब शेतकरी महिलेची अब्रु लुटली तेव्हा जराही विलंब न करता महाराजांनी त्याचे हातपाय तोडले. खरंतर आजच्या सारखी पी.आर.ओ. टीम ठेवून स्वतःच स्वतःची टिमकी वाजवण्याची त्या काळी प्रथा नसुन देखील एक मोगल इतिहासकार खाफीखान लिहतो ' जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे '. स्वकियांच्या बरोबरीने राजकीय विरोधकांच्या आई, बहिण, पत्नी, मुलगी अशा कोणत्याही स्त्रीचा महाराजांनी केवळ अन् केवळ सन्मानच केला.
महाराज केवळ सन्मान करुन थांबले नाहीत तर त्यांना बरोबरीचा दर्जा देत निर्णय प्रक्रियेत देखील सहभागी करून घेतले म्हणूनच त्यांच्या सूनांनी देखील हातात तलवार घेऊन मैदानं गाजवली हा इतिहास आहे.
कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला जेव्हा सैनिकांनी शिवाजी महाराजांच्या समोर उभे केले तेव्हा तिच्याकडे पाहुन 'अशीच आमची आई सुंदर, रुपवती असती तर आम्ही देखील सुंदर झालो असतो ' असं म्हंटल्याची बखरी मध्ये नोंद आहे. त्या स्त्रीचा मातेसमान आदर करुन त्यांची सौंदर्याकडे देखील पाहण्याची असाधारण दृष्टी अन् वृत्तीच अधोरेखित होते.
वास्तविक अशाप्रकारचा नैतिक संस्कार घडविणारा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला नाही हे आपलं खरं दुर्दैव.
जिजाऊंनी केलेले ज्वाज्वल्य संस्कार हेच या नैतिकतेचे खरे गमक आहे तेव्हा एक स्त्रीच सुशासन निर्माण करणारा पुरुष निर्माण करु शकते अन् त्या पुरुषातील उच्च कोटीची नैतिकता हाच स्त्री सन्मानाचा कणा असतो.
