आजकाल कुणीही तथाकथित छिंदम पदाधिकारी कोणत्याही विषयी काहीही बोलतो अन् ते महापुरुष अथवा धर्म या विषयी असेल तर समाजीक जाणीवा किती पोकळ अन् दांभिक आहेत याचीच साक्ष देतो.
माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार समाजातील बहुतांश लोकं याच छिंदम प्रवृत्तीची तोंड देखले अन् सोयीस्कर बोलणारे व वागणारे असतात.
भिन्न जात-धर्म,संस्कृती तसेच हजारो वर्षांचा इतिहास असणारा भारत तांत्रिक लोकशाहीचा मान राखत लादल्या गेलेल्या सार्वभौमाचा वरकरणी स्वीकार करत सर्वधर्म समभाव,बंधुभावाचा मुखवटा घालून प्रार्थनेतील परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून सदैव कसले प्रयत्न करतात हे न उलगडणारे कोडेच आहे मग एखाद्याचा मान ठेवने,सौजन्याने वागने व निष्ठा राखणे दुरच.
मताचा जोगवा मागताना जिकडे गुलाल तिकडे चांगभलं म्हणत मनातील वैयक्तिक अनादर,द्वेषपूर्ण विचार झाकून केवळ हो ला हो म्हणत त्या त्या जाती धर्मातील महापुरुषांच्या तसबीर अथवा पुतळ्याला हार तुरे घालत जयजयकाराच्या घोषणा देत वेळ मारून न्यायची मानसिकता त्यांच्यातील स्वार्थी अपरीहार्यताच दर्शवते.
कोणत्याही महापुरुषाला जात नसते असते ती फक्त सकल समाजाच्या उद्धाराची महत्वाकांक्षा परंतू त्या त्या महापुरुषाला त्या त्या समुहाला चिटकवत त्यांच्या भावनेला हात घालत आपलसं करण्याचा राजधर्म मात्र नेटाने पाळला जातो.
लोकं सुद्धा पेहराव,आभुषणं,अदब,चलचित्रातील भारावून टाकणाऱ्या दृष्य परिणामाच्या प्रभावात वावरतात अन् प्रतिकात्मक पुजा आर्चेलाच सर्वस्व मानत अनुनय केला जातो.परंतू सद्यस्थितिला समाजाचा उद्धार करण्यासाठी आवश्यक विचारधारेचं काय.एकाच समुहातील माणसे महापुरुषाच्या जन्म तिथीवरून देखिल एकवाक्यता दाखवू शकत नसतील तर भिन्न जाती धर्माच्या लोकांचा मेळ कधी लागणार.
महापुरुषांच्या जयंत्या तसेच धार्मिक उत्सव साजरे करणारे त्यांच्या विचारधारा किती आभ्यासतात.त्या त्या धर्मावर अथवा व्यक्तिमत्वावर गाढ श्रद्धा असणारे त्या त्या धर्मग्रंथाचे अथवा चरित्राचे किती वाचन करतात याचे उत्तर ९९.९९% नाही असण्याची शक्यताच अधिक आहे हे बोचरे वास्तव स्विकारण्याचे धाडस आपल्यात नाही ही खरी शोकांतिका.