शुक्रवार, ८ मे, २०२०

उषःकाल होता होता काळरात्र झाली....


            कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली एक एक दिवस पुढे सरकत असताना एकीकडे विशाखापट्टणम येथिल वायुगळतीची दुर्घटना ताजी असताना औरंगाबाद येथे १६ मजूर रेल्वेच्या मालगाडी खाली चिरडले गेल्याची बातमी आली अन् मन सुन्न झाले.
अदृश्य शत्रुशी सामना करत असताना लॉकडाऊन नावाच्या आधुनिक शस्त्रानीशी लढताना ते शस्त्र हाताळताना प्रत्येक जण आपापल्या परिस्थीनुसार तसेच गरजेनुसार बुद्धी वापरणार हे सत्य आपण नाकारू शकत नाही.गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात कदाचित महसुली उत्पन्नाच्या गरजेनुसार सरकारला व तथाकथित अर्थव्यवस्थेच्या योद्ध्यांसाठी देखिल ती नसेल परंतू गरीबीतील भुकेचा शाप भोगणाऱ्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचं घर,गाव सोडून वाट मिळेल तिकडे जाणे ही तेव्हा देखील केवळ गरज नसून अपरिहार्यता होती अन् आजदेखील अंधकारमय भविष्याच्या सावटाखाली एक एक दिवस ढकलताना गड्या आपुला गाव बरा अन् आपल्या माणसाची ऊब अधिक सुरक्षित वाटणे देखिल स्वाभाविक अन् सहाजिकच व त्यासाठी पाय फुटले तिकडे जाणे क्रमप्राप्त आहे. कदाचित भरल्यापोटी अन् आपापल्या कुटूंबकबिल्या सोबत आपापल्या घरी सुरक्षित असणाऱ्या आपल्याला किती बोचणार हा संवेदनशीलतेचा प्रश्र्न आहे.
रेल्वे रूळाचा आधार घेत मार्ग शोधणाऱ्या जीवांसाठी त्याच रेल्वे रूळाची मृत्यूशैय्या व्हावी यापेक्षा दुर्दैव ते काय तेव्हा चालून चालून दमलेल्या शरिराला अन् थकलेल्या मेंदूला रेल्वे बंद आहेत तरी रेल्वे रुळावर झोपावे का असले प्रश्र्न पडत नाहीत कळते ते फक्त इच्छित स्थळी लवकरात लवकर पोचणे.
बातम्या मधे रेल्वे रुळावर विखुरलेल्या भाकऱ्यांमध्ये त्या मजूरांचे मांसाचे तुकडे गोळा करतानाचे दृश्य पाहणे स्तब्ध करणारे होते मग त्यांच्या उरलेल्या सहकाऱ्यांनी ते डोळ्यासमोर पाहणे कीती काळजाचा थरकाप उडवणारा असेल हे तेच जाणोत.
साखरझोपेतील स्वप्नांचा उषःकाल होता होता काळरात्र झाली.
पण पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवण्या शिवाय गत्यंतर नाही. मजूर ही त्यांच्या कामाची तसेच परप्रांतीय ही त्यांच्या जन्म ठिकाणांची ओळख असू शकेल पण माझ्या दृष्टीने ते भारतीय आहेत अन् एक भारतीय म्हणून मी त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो.

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

भरारी...!

Take off your dreams high above the Cycles.....

जय जिजाऊ जय शिवराय...!


  
   कर्तृत्व असाधारण असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर पुतळ्यांचे देखील महत्व वाढते पण असामान्यपण समजायला जीवंतपणीचा संघर्ष महत्वाचा असतो. जन्म सार्थकी लागला म्हणजे काय हे महारांजाचे चरित्र अन् चारित्र्य अधोरेखित करते. ज्यांच्या एकाच आयुष्यातील दैदिप्यमान कामगिरीचा नुसता विचार जरी केला तरी दमल्या सारख होतं पण त्यांनी ते प्रत्यक्षात केलंय ही गोष्टच अचंबित अन् तेव्हढीच प्रेरीत करते. दुरदृष्टी,लढवय्या अन् निस्वार्थी शासक अश्या वृत्तीचे प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक प्रतिभेला मानाचा मुजरा...!
जय जिजाऊ जय शिवराय...!






गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

महाराष्ट्र केसरी पैलवानाचे किर्तन.....!


महाराष्ट्र केसरी पैलवानाचे किर्तन.....! 

           संस्काराची परिभाषा नेमकी काय असते हे तुमच्याकडे असणाऱ्या शिदोरीवर अवलंबून असते. जर का ती शिदोरी सुसंस्काराची असेल तरच तो संस्कार झळाळून निघतो अन्यथा तो झोकाळून जातो.
दोन वेगवेगळ्या बातम्या वाचताना त्याचा आज प्रत्यय आला एक म्हणजे वारकरी संप्रदायातील एका मठाधिपतीने मारूतीबुवा कऱ्हाडकर मठाचा अध्यक्ष मीच या स्वार्थ बुद्धीने व अहंकाराने त्यानी विश्वस्तांनी ठराव करून मठाधिपती म्हणून निवडलेल्या व्यक्तीचा ठरवून चाकूने हल्ला करीत पंढरीनगरीतच खून केला विशेष म्हणजे सहकाऱ्याच्या डोक्यात विणा घातल्याच्या गुन्ह्यासाठी त्याने तीन महिन्याची तुरुंगाची हवा देखिल खाल्ली होती तसेच दोघांचे गुरु एकच असलेले बंड्यातात्या कऱ्हाडकर यांना देखील मारण्याचे त्याने ठरवले होते पण सुदैवाने ते बचावले अन् दुसरी म्हणजे महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेत विजेत्या कुस्तीपटूने ( हर्षवर्धन सदगीर ) उपविजेत्या ठरलेल्या व आपला मित्र असलेल्या कुस्तीपटूला ( शैलेश शेळके ) खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारली तसेच दोघेही एकाच गुरुचे चेले असल्याने शेवटी विजय गुरुचाच झाला ही प्रामाणिक भावना दोघांचीही होती.
तस पाहिल तर महाराष्ट्रीय संस्कृती मधे वारकरी अन् कुस्ती दोन्हीही अस्मितेचे प्रतिक आहेत. वारकरी संप्रदाय म्हटलं की अध्यात्मिक मार्गाने व संत परंपरेच्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोर पालन करीत सामान्य जनांना उपदेश करीत समाज सुसंस्कृत घडवण्यासाठी आग्रही असणे होय तर कुस्ती म्हणजे शारीरिक ताकदी बरोबर चपळता असणारा रांगड्या गड्याचे मैदानी कौशल्य दाखवण्याची क्रिडा स्पर्धा होय.
इथे मात्र ज्याने समाजाला दिशा दाखवायची त्यानेच दिशाहीन होत अध्यात्मिक तत्वज्ञानाशी फारकत घेत वारकरी संप्रदायाची 'वरुन किर्तन अन् आतुन तमाशा' अशी नकारात्मक प्रतिमा निर्माण केली. तर जिथे इर्षा, अहंकार, आक्रमकता निर्माण होण्याची संभावना अधिक तिथे संयम व नम्रता याचे प्रदर्शन दिसले. याचाच अर्थ तुमचे कार्यक्षेत्र कोणतेही असो त्यापेक्षा तुमची जडणघडण कोणत्या संस्कारातून झाली आहे हेच समाजाला अधिक प्रबोधनात्मक असते.

बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

Live बलात्कार ...


              आजकाल पुन्हा एकदा सामुहिक बलात्कार अन् निर्घृण हत्या याने देश ढवळून निघाला आहे.तसं तर रोजच कुठे ना कुठे अत्याचार घडतच असतात पण एखाद्या घटनेची बातमी सर्व माध्यमे व्यापून टाकतात मग वृत्तवाहिन्यांवर सविस्तर घटनाक्रम दाखवत ढासळलेल्या कायदा व्यवस्थेची चर्चा, निदर्शने, मेणबत्त्या फेऱ्या पुन्हा नविन घटना घडेपर्यंत काही दिवस चालू राहतात.
मला आठवतय साधारण वीस वर्षांपूर्वी गणेश उत्सव साजरा करताना जीवंत देखावा सादर करण्याची प्रथा होती त्यात एका मंडळाने live बलात्कार अशा नावाने देखावा सादर केला होता नेहमी प्रमाणे आकर्षण व उत्सुकता ताणली गेल्याने ते बघायला स्त्री-पुरूषांनी तोबा गर्दी केली होती.पोरकट वयात असल्याने मी पण रीतसर रांगेतून आत गेल्यावर पाहतोय तर मोठ्या काचेच्या बलात कार ठेवली होती अन् सगळे आशाळभूत नजरेने एकमेकांकडे पाहात स्वतःच्या मुर्खपणाला हसत बाहेर पडत होते.त्या प्रसंगाचा तेव्हा काही विचार केला नाही परंतू आज अस वाटतं दाखवणारे व बघणारे अशा दोन्ही घटकांतून बनलेला समाज त्यावेळी अन् आत्ताही बलात्कार या विषयी गांभीर्याने विचार करण्यापेक्षा उत्सुकता अथवा विनोदबुद्धीने घेतो यातच आपली सामाजिक मानसिकता अधोरेखित होते.
अगदी हैद्राबादच्या घटनेनंतरही त्याहून भयंकर घटना घडलीय त्यात चार मद्यधुंद माणसांनी रस्त्यावरच्या भटक्या कुत्रीला पकडून तीचे पाय अन् तोंड बांधून सामुहिक बलात्कार केला व नंतर काठीने बेदम मारहाण केली हा सर्व प्रकार एका रिक्षाचालकाने पाहिला अन् अती झाल्याने आरडाओरडा केला त्यामुळे ते चौघे फरार झाले.अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या या प्रसंगाने मन सुन्न झाले मग या विकृतीला काय म्हणणार कोणती मोजपट्टी घेऊन फरक शोधणार.महाराष्ट्र स्वतः जातीभेदाच्या सामुहिक अत्याचाराचे खैरलांजी ते मराठी आरक्षणाची ठिणगी पेटलेल्या कोपर्डी पर्यंत अनेक प्रसंगाचा साक्षीदार आहे.मात्र बलात्कार प्रवृत्ती थांबलेल्या नाहीत अन् दुर्दैवाने थांबणार देखिल नाहीत.कारण ज्या भौतिक परिस्थितीत मनुष्य वाढतो त्यात पुरषी अहंकार अन् बळाचा वापर करणे तसेच स्त्रीला शोभेची बाहुली व वासना शमवण्यासाठीचे साधन समजणे हेच संस्कार लादले जातात मग चित्रपट असो की जाहिरात आपण मात्र बाई वाड्यावर या अशा थुकरट विनोदावर यथेच्छ हासतो अन् अंगविक्षेप करत नाचतो देखील.
मुलींनी खासकरून शहरातील स्वातंत्र्याचा गैर अर्थ काढत अती आत्मविश्वासाने वावरणे योग्य नाही.अवेळी अन् अनोळखी अथवा जोखमीच्या ठिकाणी योग्यती काळजी घ्यावी.मला नागपूर येथे घडलेला एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे एक महिला जी स्वतः कर्नल होती अन् स्वतःच्या नवरा व मूलासोबत प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांची गाडी अडवत नवऱ्याला व मुलाला मारहाण करून तीच्यावर अत्याचार केले नंतर तीने न केलेल्या चुकीसाठी केवळ न्यायालयातच नव्हे तर आप्तस्वकीयांशी देखील लढा द्यायला लागला.यातून समाज मानसिक दृष्ट्या परिपक्व व व्यवस्था आग्रही नाही हेच स्पष्ट होते.
जोपर्यंत बलात्कार होण्याला कारणीभूत घटकांचा तसेच सार्वजनिक मानसिकतेचा सर्वसमावेशक व गांभीर्यपूर्वक विचार केला जात नाही तोपर्यंत बलात्कार live (जीवंत)... च राहणार.

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

#defeminism....

  
     Avoiding luxury doesn't mean to downtrodden a human being
#defeminism.... 





सत्तेचे शैय्यासोबती....

सत्तेचे शैय्यासोबती....

            महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक, त्यातील लागलेले निकाल अन् त्यातून तथाकथित स्थिर सरकार स्थापनेसाठी गेला महिनाभर चाललेले दावे-प्रतीदावे, राष्ट्रपती राजवट ते रामप्रहरीचे शपथग्रहण हे केवळ धक्कादायकच नव्हे तर उबग येऊन व्यवस्थेबद्दलची विश्वासार्हता गमावणारा घटनाक्रम आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी तसेच दिशादर्शक विचारधारा असणाऱ्या महापुरुषांचा वारसा सांगणार्‍या राज्यात सत्तेसाठी जो आट्यापाट्या चा खेळ खेळण्यासाठी जीवाचा आटापिटा चालू आहे तो पाहता कोणतेही तत्व अन् त्यातून निर्माण झालेली विचारधारा याला कसलीही किंमत राहिलेली नाही मग कोणीही कुठल्याही पक्षात असो.काल आपण कोणत्या पक्षात होतो आज कुठल्या पक्षात आहे काल कुणासाठी घशाला कोरड पडे पर्यंत अर्वाच्य शब्दात गरळ ओकली आज कुणाच्या गळ्यात गळे घालून मिरवतोय हे सर्व संग्रहीत करण्याची अद्यावत तंत्रज्ञान असताना कशाचीही तमा न बाळगता सोयीस्कर सारीपाट मांडला जातो.कारण आज अन् आत्ता केवळ याचाच हट्ट व स्वार्थ विचारात भिनला की मग नैतिकता व दूरगामी परिणाम यासर्वाला तिलांजली दिली जाते.
या सर्वाच्या मुळाशी ज्या समाजातून हे नेते तयार होतात तो समाज अर्थात जनता आहे कारण या जनतेचा पायाच भुसभुशीत तकलादू नैतिकतेवर तसेच दांभिक आदर्शवादावर आधारित आहे अन् म्हणूनच उघड उघड थिल्लरपणा करताना या लोकनेत्यांना काडीचीही शरम वाटत नाही.कारण लोकांनाच परखड ठाम कृती पेक्षा अलंकारिक, पुस्तकी वाक्यात घोळलेले तथाकथित विवेचन अपेक्षित असते.साचेबद्ध गोलमोल बोलण्यालाच सुसंस्काराचे कोंदण लाभल्यामुळे असु दे म्हणत निर्बुद्धपणे ते स्विकारले जाते.मी निष्ठेला जागून, कुणाशीही आप-पराभाव, शत्रुभाव तसेच ममत्व न बाळगता.... अशाप्रकारे शपथ घेणारे व तथाकथित उच्च पदावर कार्यरत असणारे परंतू त्या पदास नालायक असणारे असे शपथ देणारे यातून जो शपथ नावाचा सोपस्कार केला जातो यातच सर्व दांभिकपणा अधोरेखित होतो वास्तविक शपथ नावाच्या संपुर्णपणे उत्तरदायित्व व शब्दाला जागणाऱ्या अश्या गृहितकावर अधारित संकल्पनेचेच सार्वजनिक हसे झाले आहे.
जनतेचे भले करण्याची भलामण करणाऱ्या व लोकशाही रितीरिवाजाप्रमाणे निवडून आलेल्या तथाकथित लोकप्रतिनिधींची वागणूक ही सत्तेसाठी हपापलेली आहे कारण ज्याला कुणाचे भले करायचे असेल तर सत्ता ही एक माध्यम असू शकते पण एकमेव साध्य नव्हे.परंतू सत्तेच्या माध्यमातून स्वतःचा व आपल्या आप्तस्वकीयांचा जो काही आर्थिक, राजकीय फायदा साध्य करण्यासाठी ज्याप्रमाणे आसुसलेले आहेत ते पाहता सत्तेचे प्रामाणिक भागिदार होण्यापेक्षा सत्तेचे शैय्यासोबती होण्यातच धन्यता मानणारे आहेत हिच लोकशाहीची शोकांतिका आहे.