सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

संयत प्रतिक्रियेचे वेदनादायी स्थलांतर...!




वर्तमानपत्राचा ई-पेपर  झाल्यामुळे मोबाईल वरच ते जास्त वाचलं जातंय.प्रत्यक्ष वर्तमानपत्र अन् ई-पेपर मधे फरक एवढाच आहे की वर्तमानपत्रातील बातमीवर वाचकाची प्रतिक्रिया नोंदवायला पत्रव्यवहाराची वाट पाहावी लागते परंतू ई-पेपर मधे तात्काळ नोंदवता येते अन् इतरांना ती दिसते व त्यावर व्यक्त होता येते.हे किती योग्य-अयोग्य,किती चांगले-वाईट याबद्दल मी साशंक अन् थोडा निराश आहे कारण देखील तसंच घडलय मोबाईल वर मारूती चितमपल्ली यांची 'एका अरण्यॠषीचे वेदनादायी स्थलांतर' या मथळ्याखाली बातमी वाचत वाचत शेवटाकडे गेलो असता बातमीच्या खाली असलेल्या कमेंट कडे लक्ष गेले अन् धक्काच बसला एका वाचकाची (?) त्या बातमीवर प्रतिक्रिया (?) दिसली "आता सोलापूर ला येऊन चादरी विकत बस ".

मला हे वाचून राग आला परंतू त्याऐवजी त्याची समज व एकंदरीतच समाज माध्यमांतील समाजाची दिशा याविषयी अधिक चिंता वाटली.एका ८८वर्षाच्या गृहस्थाने संपूर्ण जीवन निसर्गातील पशूपक्षी,वृक्ष,मासे यांची अभ्यासपूर्ण माहिती गोळा केली व त्याचे पुस्तक रूपी कोश निर्माण केले ते एकाकीपणा मुळे त्यांचे आवडते ठिकाण सोडून नाईलाजाने गावी सोलापूरला स्थलांतर करतायेत या बातमी वर काय प्रतिक्रिया देतात. खरंतर ती प्रतिक्रिया नसून त्याच्या आजारी मानसिकतेची प्रतिक्षिप्तक्रीया आहे.त्यावर कहर म्हणजे अशा महाभागाने  स्वत:चे नाव एक हिंदुस्तानी असे ठेवलेले आहे अन् या सगळ्यांवर कडी म्हणजे त्या कमेंटला शेकडोंनी लाईक मिळतात.
एकंदरीतच सध्याचे वातावरण मग ते वास्तव असो की आभासी हे कमालीचे दुषित झाले आहे मध्यंतरी नाटकी वाह्यात प्रतिक्रियांच्या सामन्यात सगळ्यांनी ते अनुभवलं आहेच पण नुकतीच क्रिकेटची मॅच हरली म्हणून महेंद्रसिगं धोनीच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याची भाषा तथाकथित क्रिकेटचा फॅन करत असेल अन् टीआरपीचा झोल करून चॅनेल स्वतःचा अजेंडा राबवत गल्लेभरु पत्रकारिता करीत असेल तर समाजभान येणार कसे केवळ मनात येणाऱ्या भावना नोंदवण्याची घाई अन्‌ त्यासाठी तेवढीच तत्पर ट्रोलधाड ही समाजाची दिशाभूल अन् तरूण पिढीला दिशाहीन बनवते आहे.मग असा एक आभासी हिंदुस्तानी अन् त्याच्या विचारधारेचे शेकडो आभासी समर्थक हे केवळ एक उदाहरण आहे वास्तवात असे हजारो हिंदुस्तानी अन् त्यांचे लाखो समर्थक देशात छुप्या रीतीने वावरत असतील अन् ते द्वेष व थिल्लरपणाने बरबटलेले असतील तर ते खरे समाजाच्या अन् पर्यायानं देशाच्या वैचारिक आरोग्यासाठी घातकच आहे.याचे गांर्भिय वेळीच ओळखले व यावर वेळीच उपाययोजना केल्या तरच वर्तमान काळात संयत प्रतीक्रियेचे होणारं जे वेदनादायी स्थलांतर आहे ते रोखणे शक्य होईल.



शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

अदृश्य शत्रू अन् कागदी खेळाडू...


         सध्या अदृश्य शत्रू मुळे घडणाऱ्या दृश्य परिणामांची दाहकता पदोपदी जाणवत असताना अनेक अदृश्य शत्रू अधोरेखित करणाऱ्या धक्कादायक बातम्या देखील समोर येत आहेत.अशीच एक बातमी वाचण्यात आली ती म्हणजे क्रिडा उपसंचालक यांनी नुकतेच १९९७ ते २००५ दरम्यान २५९ जणांनी बोगस क्रिडा प्रमाणपत्र मिळवले असून त्यातील राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार खेळाची कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी सरकारी नोकरीत असणाऱ्या ५% राखीव जागांचा गैरफायदा घेत ३२ जणांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत असे स्पष्ट करीत त्यांच्यावर कारवाई केली आहे.विशेष म्हणजे सर्व ३२ जण प्रथम वर्ग अधिकारी म्हणून महाराष्ट्रात जिल्हाधिकारी,अधिक्षक, आयुक्त, शिक्षणाधिकारी अशा महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.

        शासन व्यवस्थेत महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारे हे महाभाग ज्या खोट्या पायावर उभे आहेत ते पाहता पायाभूत सुविधा निर्माण करणारी व्यवस्था किती तकलादू अन् दिव्यांग आहे हेच स्पष्ट होते.असे जिल्हाधिकारी कोणत्या प्रामाणिक अन् पारदर्शक व्यवहाराचा आदर्श ठेवणार तसेच असे शिक्षणाधिकारी कशाप्रकारे नैतिक शिक्षण तपासणार हा प्रश्र्नच आहे.

      एकीकडे खेळाच्या पातळीवर असणाऱ्या कफल्लकतेवर बोगस प्रमाणपत्राच्या कल्पकतेने मात करण्यासाठी तयार असणाऱ्या कागदी खेळाडूंचा भरणा भ्रष्टाचाराच्या ऑलिम्पिक साठीच जास्त लायक आहे. काही एक बौद्धिक क्षमता असलेले म्हणून त्यांच्याकडे पाहून काही एक स्वप्न बाळगणारे अनेक तरुण तसेच त्यांच्याकडे आशेने व सन्मानाने पाहणारा समाज यांच्या विश्वासाला जो तडा गेला आहे व जे अपरिमीत नुकसान झाले आहे ते दीर्घकाळासाठी न भरून येणारं असतं.

       टम्ब्लिंग व ट्रॅम्पोलीन अशा माहिती नसलेल्या खेळाच्या या चमकोगीरी करणाऱ्या खेळाडूं पेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन दिले तर देशाला ऑलिम्पिक मध्ये पदक तरी मिळेल परंतू महत्त्वाचे पद पदरात पाडून घेण्यासाठी कोलांट्या उड्या मारणारे असले कागदी खेळाडू देशाच्या प्रगतीसाठी अदृश्य शत्रूच आहेत व त्याचे दृश्य परिणाम व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्यात प्रतिबिंबीत होत राहील.


रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

सुsss शांतता...कोर्ट चालू आहे !


सद्ध्या आपल्या देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे कोरोना ही नक्की महामारी आहे का नाही तसेच त्यावर उपाय हुडकण्यात अर्थकारणाचा बोजवारा किती उडालेला आहे(अर्थात हा दैवी प्रकोप आहे असं दस्तुरखुद्द मंत्री बाईसाहेबांनी सांगितल्यामुळे बाकीच्यांनी कोणताही युक्तिवाद करण्यात अर्थ नाही असो) हे नसून सुशांतची हत्या झाली की आत्महत्या हे आहे. खरंतर सुशांतच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हता म्हंटल्यावर चावीवाल्याला बोलवल्यामुळे घोळ झाला त्याच वेळी सीआयडी ला एक फोन केला असता तर हे प्रकरण चिघळले नसते अन् मुंबई पोलीस ते सीबीआय व्हाया बिहार पोलीस असा त्याचा खेळ खंडोबा झाला नसता. आपल्या दयाभाऊने कोणतेही एक्सट्रा पैसे न घेता दरवाजा उघडला ( कदाचित तोडला ) असता अन् काही तासांच्या आतच सर्व प्रकरण निकाली निघाले असते पर्यायानं देशाचा व टिव्ही समोर तासनतास डोकं खाजवत खरंतर गांजवत बसणाऱ्यांचा वेळ सत्कारणी लागला असता. परंतू  दररोज हजारो घडणारे गुन्हे व त्यासाठी लागणारी सक्षम तपास यंत्रणा आणि त्या पुढेही जावून सक्षम न्यायव्यवस्था ही सुशांतसिंग या व्यक्तीला मिळणाऱ्या न्याया इतकीच देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणाऱ्या न्यायासाठी जास्त महत्त्वाची आहे. घटनेला अपेक्षित व्यापक देशहीत पाहणारे व दूरदृष्टी असणारे राजकारणी, प्रामाणिक शासकीय कर्मचारी तसेच जागरूक पत्रकारिता अन् या सर्वांसाठी आग्रही नागरिक याची नितांत गरज आहे परंतू हे जग मनोरंजन, मनोरंजन अन् मनोरंजन या तीनच गोष्टींवर चालते हे डर्टी असले तरी स्वच्छ वास्तव विद्या बालनने सांगून ठेवलेले आहे. तेव्हा कल्पनेतच रमणाऱ्या व सुखावणाऱ्यांना अफुची गोळी देण्यातच तथाकथित सर्व क्षेत्रातील सत्ताधाऱ्यांचे हीत आहे. आपण मात्र दैवी कृपा केव्हां होते याची वाट पाहू तोपर्यंत सुsss शांतता.....


मंगळवार, २ जून, २०२०

इथे ओशाळला मृत्यू....


इथे ओशाळला मृत्यू....
मृत्यू हा शब्द जरी उच्चारला तरी एक अनामिक भीती मनात निर्माण होते. मृत्यू जरी अंतिम सत्य असले तरी ते स्वीकारणे तेवढेच अप्रिय अन क्लेशदायक असते. सध्या निर्माण झालेल्या कोरोना नावाच्या महामारीत मृत्यू नावाची वेगळीच दहशत अन् नातेसंबंधातील संशय व भीतीने ग्रासलेली असंवेदनशीलता पाहायला मिळते आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळचे नातेवाईक हात लावायलाच काय पण अंत्यसंस्कार करण्यासाठी देखिल टाळाटाळ करीत आहेत.अशा परिस्थितीत ही जबाबदारी एक तर नेमून दिलेल्या चतुर्थ शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्यथा स्वयंस्फुर्तीने करणाऱ्या सामाजसेवकावर येऊन पडते.अशीच जबाबदारी गेली २५ वर्ष पार पाडणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी नागेश वाघमारे हे देखील सध्याचे कोरोना वाॅरीयर परंतू आजच्या परिस्थितीत केवळ भीतीपेक्षा स्वतःच्या मृत्यूचा धोका अधिक असताना कर्तव्याचे काटेकोर पालन करणारे नागेश वाघमारे हे अधिक कर्तव्यदक्ष.त्यांना याबाबत विचारले असता त्यांचे उत्तर असे होते की एक दिवस सगळ्यांनाच मरायच आहे मग एवढं घाबरून जगायचं कशाला.विशेष म्हणजे त्यासाठी 'मृत्यु' हा शब्दच त्यांनी स्वतःच्या मानेवर गोंदवला आहे.हल्ली टॅटू काढण्याची फॅशन असताना मृत्यू सारखा नकोसा वाटणारा शब्द गोंदणे हे त्यांनी मृत्यू नावाच्या भीतीवर विजय मिळवत त्या सत्याला धीरोदात्तपणे सामोरे गेल्याचे अधोरेखित करते. नागेश वाघमारे नावाच्या अशा मृत्युंजयास माझा त्रिवार सलाम.‌..!


शुक्रवार, ८ मे, २०२०

उषःकाल होता होता काळरात्र झाली....


            कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली एक एक दिवस पुढे सरकत असताना एकीकडे विशाखापट्टणम येथिल वायुगळतीची दुर्घटना ताजी असताना औरंगाबाद येथे १६ मजूर रेल्वेच्या मालगाडी खाली चिरडले गेल्याची बातमी आली अन् मन सुन्न झाले.
अदृश्य शत्रुशी सामना करत असताना लॉकडाऊन नावाच्या आधुनिक शस्त्रानीशी लढताना ते शस्त्र हाताळताना प्रत्येक जण आपापल्या परिस्थीनुसार तसेच गरजेनुसार बुद्धी वापरणार हे सत्य आपण नाकारू शकत नाही.गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात कदाचित महसुली उत्पन्नाच्या गरजेनुसार सरकारला व तथाकथित अर्थव्यवस्थेच्या योद्ध्यांसाठी देखिल ती नसेल परंतू गरीबीतील भुकेचा शाप भोगणाऱ्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचं घर,गाव सोडून वाट मिळेल तिकडे जाणे ही तेव्हा देखील केवळ गरज नसून अपरिहार्यता होती अन् आजदेखील अंधकारमय भविष्याच्या सावटाखाली एक एक दिवस ढकलताना गड्या आपुला गाव बरा अन् आपल्या माणसाची ऊब अधिक सुरक्षित वाटणे देखिल स्वाभाविक अन् सहाजिकच व त्यासाठी पाय फुटले तिकडे जाणे क्रमप्राप्त आहे. कदाचित भरल्यापोटी अन् आपापल्या कुटूंबकबिल्या सोबत आपापल्या घरी सुरक्षित असणाऱ्या आपल्याला किती बोचणार हा संवेदनशीलतेचा प्रश्र्न आहे.
रेल्वे रूळाचा आधार घेत मार्ग शोधणाऱ्या जीवांसाठी त्याच रेल्वे रूळाची मृत्यूशैय्या व्हावी यापेक्षा दुर्दैव ते काय तेव्हा चालून चालून दमलेल्या शरिराला अन् थकलेल्या मेंदूला रेल्वे बंद आहेत तरी रेल्वे रुळावर झोपावे का असले प्रश्र्न पडत नाहीत कळते ते फक्त इच्छित स्थळी लवकरात लवकर पोचणे.
बातम्या मधे रेल्वे रुळावर विखुरलेल्या भाकऱ्यांमध्ये त्या मजूरांचे मांसाचे तुकडे गोळा करतानाचे दृश्य पाहणे स्तब्ध करणारे होते मग त्यांच्या उरलेल्या सहकाऱ्यांनी ते डोळ्यासमोर पाहणे कीती काळजाचा थरकाप उडवणारा असेल हे तेच जाणोत.
साखरझोपेतील स्वप्नांचा उषःकाल होता होता काळरात्र झाली.
पण पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवण्या शिवाय गत्यंतर नाही. मजूर ही त्यांच्या कामाची तसेच परप्रांतीय ही त्यांच्या जन्म ठिकाणांची ओळख असू शकेल पण माझ्या दृष्टीने ते भारतीय आहेत अन् एक भारतीय म्हणून मी त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो.

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

भरारी...!

Take off your dreams high above the Cycles.....

जय जिजाऊ जय शिवराय...!


  
   कर्तृत्व असाधारण असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर पुतळ्यांचे देखील महत्व वाढते पण असामान्यपण समजायला जीवंतपणीचा संघर्ष महत्वाचा असतो. जन्म सार्थकी लागला म्हणजे काय हे महारांजाचे चरित्र अन् चारित्र्य अधोरेखित करते. ज्यांच्या एकाच आयुष्यातील दैदिप्यमान कामगिरीचा नुसता विचार जरी केला तरी दमल्या सारख होतं पण त्यांनी ते प्रत्यक्षात केलंय ही गोष्टच अचंबित अन् तेव्हढीच प्रेरीत करते. दुरदृष्टी,लढवय्या अन् निस्वार्थी शासक अश्या वृत्तीचे प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक प्रतिभेला मानाचा मुजरा...!
जय जिजाऊ जय शिवराय...!