काही अति भावनिक व एकांगी विचार असणाऱ्या लोकांना माझे विचार आवडणार अथवा पटणार नाहीत परंतू एखाद्या घटनेची दुसरी बाजू मांडावी असे मला वाटते म्हणून.
तर नुकतीच वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली तसेच त्यांनी यासाठी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वरीष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केले असल्याचे लिहिलं आहे. खरंतर हे सर्व दुर्दैवी आहे. परंतू मतभेद, वाईट किंवा मनाविरुद्ध वागणूक जगण्याच्या प्रत्येक धडपडीत सामावलेली आहे त्यासाठी एवढे टोकाचं पाऊल उचलणारी व्यक्तीचं किंबहुना तीचे सारासार विचार न करण्याची बुद्धी यासाठी अधिक जबाबदार आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षा देता समाजात ऐट, रूबाब असणारं एखादं अधिकाराच पद मिळवता अन् सगळं झालं असं तुम्हाला वाटतं परंतू निवडलेल क्षेत्र, त्याठिकाणी असणारे कामाचे स्वरूप, तिथं असणारा अनेक प्रकारचा हस्तक्षेप, ताण-तणाव तसेच सरकारी कामाच्या कार्यालयीन मर्यादा यातून आपला ठसा उमटवणारं आदर्श काम करणे या सगळ्या गोष्टींचा कितीसा विचार झालेला असतो. त्यातच महिला म्हणून दया भाव अन् विशेष कौतुक यांची शिदोरी तसेच माध्यमातून डॅशिंग, लेडी सिंघम अशा बिरूदावल्या देत दिलेली वारेमाप प्रसिद्धी अन् ती कनिष्ठ अधिकाऱ्याची असेल तर वरीष्ठ अधिकाऱ्यांना बोचणारं हा वास्तव मनुष्य स्वभाव (अर्थात माध्यमं देखिल अशा बातम्या दाखवून आम्ही कसे स्त्रीवादी आहोत हे दाखवण्यासाठी उतावळे असतात भले त्यांच्या क्षेत्रात किंवा सहकाऱ्यांची मुस्कटदाबी होत असते तेव्हा मुग गिळून गप्प राहणं पसंत करतात ) या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्वतःच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वापेक्षा अहंकारावर अधिक होतो अन् त्यामुळेच सारासार विचार न करता स्वतःच्या जीवनापेक्षा नोकरी जास्त प्रिय वाटते. दिपाली चव्हाण यांचे पती देखील सरकारी सेवेत आहेत म्हणजेच आर्थिक आधार असताना एकतर नोकरीच्या ठिकाणी तात्त्विक संघर्ष करावा अथवा जीवनात करण्यासाठी असंख्य पर्याय शोधावे त्या ऐवजी नोकरी सारख्या एका शुल्लक पर्यायासाठी तुम्ही तुमचं आयुष्य उधळून लावता याचाच अर्थ तो अधिकाराचा रुबाब अधिक मन व्यापतोय. माझ्या असं वाचण्यात आले की त्या गर्भवती होत्या जर ते खरं असेल तर मग जन्माला येणाऱ्या जीवाची देखील काहीही पर्वा वाटत नसेल तर तुम्ही आई व्हायचा संवेदनशील निर्णय घेताच कशाला.
खरंतर आत्महत्येला प्रवृत्त करण्याजोगे कुणी प्रयत्न केले असतील तर त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे परंतू केवळ या गोष्टीचा बभ्रा करण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाचं संतुलन न ढळू देता आपापले काम उत्तम करण्याची वृत्ती रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अन् असे प्रयत्न करणारेच खरे डॅशिंग व सिंघम असतात.
























