आधुनिकता ते आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची साधनं यांच्या व्याख्या इतक्या सहजपणे अन् झटपट बदलतायत की मोबाईल ही केवळ गरज राहिलेली नसून तो जीवनावश्यक मुलभूत घटक बनला आहे. आजच्या तरूणाईंचच नव्हे तर सर्व वयोगटातल्या व्यक्तिंचे भावविश्व याने व्यापून टाकले आहे.
मोबाईलवर असणाऱ्या अनेक ॲप्स पैकी बहुतांश ॲप्स मन रिझवण्याचं खरंतर टाईमपास करण्याचा सोपा मार्ग या नावाखाली वापरली जातात. सुरवातीला आपण वापरत असलेली ॲप्स AI technology चा धुर्त व चाणाक्ष वापर करून कधी आपल्या मनाचा अन् अपरिहार्यपणे मेंदूचा ताबा मिळवतात ते आपल्या गावीही नसते.
सध्याच्या इंस्टाग्राम रील्स, युट्युब शॉर्ट्स च्या व्हिडिओं वर नजर टाकली तर लक्षात येते की थिल्लरपणाचा एवढा सुळसुळाट (sorry सध्या आजारासाठी वापरणाऱ्या viral शब्दाला वेगळीच प्रतिष्ठा आहे) झालाय की ते सामान्य गोष्ट झाली आहे आताच्या भाषेत trending असते मग कोणीही उठतो वाकडी मान करून मैं झुकेगा नहीं सालाss म्हणत वाकडा-तिकडा चालत creativity ची खाज भागवतो. योगा, जीम, नृत्य याचा आधार घेत काही तरूणी ते वय वाढलेल्या तरूणी यांनी तर ताळतंत्रच सोडले आहे शरीर केवळ अन् केवळ प्रदर्शनासाठीच असते अन् तोच एकमेव लक्ष वेधून घेण्याचा व प्रसिद्धी मिळवण्याचा सोपा मार्ग आहे याबद्दल त्या इतक्या ठाम असतात की त्यांच्या आत्मविश्वासाचं रूपांतर boldness मधे परावर्तित होतं. मोकळेपणा आणि नग्नता यातील मुलभूत फरक न समजल्यामुळे मोकळा ढाकळा स्वभाव असण्यापेक्षा मोकळ्या ढाकळ्या अंगाचा स्वत:हून बाजार मांडत स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे या पुरुषी मनोवृत्तीला दुजोरा देतात भविष्यात स्ट्रिपिंग क्लब राजरोसपणे सुरू होतील अन् तिथे महिला प्रेक्षकांची संख्या लक्षणीय असेल. मग नंतर victim card खेळून काय उपयोग.
गोबेल्स निती नुसार एखादी गोष्ट वारंवार अन् वेगवेगळ्या लोकांकडून अनुकरणच नव्हे तर अंधानुकरण केली गेली की त्याला सहज मान्यता मिळते अन् बघता बघता त्याचं रूपांतर प्रथे मधे होते. मग अश्या कुप्रथा विकृतीला खतपाणी घालत सामाजिक ओळख मिळवून देतात.
खरंतर जास्त चिंताजनक बाब कोणती असेल तर ती म्हणजे वरील मंडळीच तिरंगा फडकवत जयहिंदच्या घोषणा देत देशप्रेमाचे दर्शन घडवतात तर कधी गणेश जयंतीच्या, ईदच्या भक्तीभावाने शुभेच्छा देतात तर कधी गड किल्ल्यांचा इतिहास जागवत शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचं मिरवतात. अश्या तुकड्या तुकड्या विचारात जगणारे कोणतीही विचारधारा अखंड अवलंबू शकत नाहीत केवळ वैचारिक गोंधळ घालून स्वत:ला खोटं समाधान देतात. असे तुकडे जोडून कोणतीही कोलाज कलाकृती निर्माण होऊ शकत नाही केवळ विरोधाभास अधोरेखित होतो. बहुआयामी असणे अन् बहु प्रतिमेत अडकणे यात मुलभूत फरक असतो, असे तुकड्या तुकड्यातील विचार व्यक्तीला छिन्न मानसिकतेचे म्हणजे स्किझोफ्रेनियाचे रुग्ण बनवू शकतो. तेव्हा आभासी जगातून निर्माण झालेली विरोधाभासी मानसिकता तुमच्या निरोगी आयुष्याला ग्रासून टाकण्या आधीच viral व trending पासून सावध राहा आणि सुरक्षित रहा.




















