रविवार, २५ जून, २०२३

मनाचं माकड अन् अंतरंग भाकड....!



 डिजिटल मनी, डॉक्युमेंटेशन पासून ऑनलाइन लर्नींग पर्यंतच्या सरकारी धोरणामुळे जग इतकं जवळ आलं आहे की मोबाईल हेच आपल्यासाठी जग बनलं आहे अन् सोशल मीडिया हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. काय पाहयचं असू दे, शोधायचं असू दे किंवा व्यक्त व्हायचं असू दे बहुतांश वेळा मोबाईलच  हातात घेतला जातो. जरा रिकामा वेळ मिळाला की माणूस मोबाईलशी खेळू लागतो खरंतर गेमर अन् युट्युबर आदर्श असणाऱ्या सध्याच्या तरुणाईचं जरा उलटं झालंय मोबाईल मधून वेळ मिळाला की थोडं बाहेरच्या जगाकडे बघितलं जाते. वॉट्सअप किंवा फेसबुक वर बघणे, व्यक्त होणे किंवा शेअर करून स्वत:ची सामाजिक प्रतिमा संवर्धन करण्यासाठी आग्रही असणारे रील्स, शॉर्टस् किंवा युट्युब व्हिडिओ पाहताना मात्र सुरवातीला वेगवेगळ्या प्रकारचे येणारे व्हिडिओ नंतर आपापल्या आकर्षण, आवड ते फॅन्टॅसी पर्यंत एकसुरी होतात. वास्तविक जगापेक्षा आभासी जगात जास्तीच मोकळीक असल्याने अन् आपली ओळख लपवून आपल्यातल्या विकृतीला मोकाट सोडण्याची मुभा असल्याने त्यातच अधिक रमतात. वारंवार तेच ते पाहून कंटाळा आला की मग थोडंसं ज्ञानामृत , नैतिकतेच्या चार वळसे चाटवायचे नंतर पुन्हा आपल्या नादात राहायचं.

म्हाताऱ्या-कोताऱ्या पर्यंत मुरलेल्या या नादामुळे कुणी कुणाला उपदेश द्यायचा हा अनुत्तरित प्रश्न निर्माण झाला आहे.

आभासी जग अन् वास्तव जग यातील फरक करण्याची क्षमता कमी कमी होत चालली आहे त्यामुळे वास्तवातील प्रत्येक कृती ही आभासी जगात व्यक्त होण्यासाठी केली जात आहे मग वाढदिवसाची पार्टी असो की लग्न समारंभ किंवा विठ्ठलाची वारी प्रोफाइल, स्टोरी अन् स्टेटस अपडेटला खाद्य मिळाले पाहिजे. वास्तविक जीवनात हेच फोटो बघून कडक भावा म्हणणारा गरज पडली की तडक निघुन जातो. 

खरंतर मोबाईल मधलं आभासी सोशल लाईफ अन् वास्तवातील सामाजिक भान यातलं अंतर समजणं समाज हितासाठी अत्यावश्यक आहे. दुरचं पाहण्याच्या नादात जवळचं पाहायचं राहिलं म्हणण्या ऐवजी मोबाईल मधलं पाहण्याच्या नादात आजुबाजुचं पाहायचं राहिलं असं म्हणण्याची वेळ येण्या आधी सावध झाले पाहिजे. हीच वेळ आहे भावनांना आवरायची अन् स्वःताला सावरायची अन्यथा मोबाईल वर येणाऱ्या सततच्या माहितीच्या भडीमारामुळे मनाचं माकड होण्यापासून अन् सतत नावीण्याच्या व तथाकथित क्रिएटिव्ह कल्पनांच्या हव्यासापोटी अंतरंग मात्र भाकड होण्यापासून आपण रोखू शकणार नाही.

बुधवार, ३ मे, २०२३

व्यवस्थेचे बैल...!

 


गौतमीला नाचताना खरंतर अश्लील अन् उत्तान हावभाव करताना पाहून तुंबलेल्या शौकीन मंडळींची अवस्था जनावरा सारखी होती असं आत्तापर्यंतच्या कार्यक्रमात घातलेल्या धुडगूसावरून तरी निदर्शनास येतेय पण नुकताच तीच्या खास कार्यक्रमात शर्यतीत सुद्धा न बुजणारा न बावरणारा बावऱ्या नावाप्रमाणेच बावरला 'बावऱ्या' म्हणजे तोच तो बैल ज्याच्यापुढे गौतमी दोन तास नाचली नशिब त्या बैलाला बांधून ठेवले होते नाहीतर बैल काय काय करू शकतो हे गौतमीला चांगलंच परिचयाचं असेल असो आपले दादा म्हंटल्याप्रमाणे कुणी कुणापुढे नाचल्यानं आपल्या पोटात दुखायचं काय काम नाय तरी पण एक सामाजिक किडा म्हणून आपला एक प्रश्न पडतो दीवास्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांपुढे गुबुगुबु करणारे नंदीबैल अन् बैलापुढे नाचणारी गौतमी पाटील यांच्यात सर्वाधिक विक्री मुल्य कुणाचं. नाचणारीला बैल काय अन् माणसं नावाची जनावरं काय दोन्ही सारखेच तीला सुपारी वाजली म्हणजे झालं पण राजरोसपणे नैतिकतेची सुपारी देणाऱ्या राजकीय व्यवस्थेसमोर लोटांगण घालणारे तथाकथित सुजाण नागरिक रोज उठून चा खेळ खंडोबा उघड्या डोळ्यांनी बघतायत अन् राजकीय व्यवस्थेने व कॉर्पोरेट मिडियाने जर नागरिकांचा बैल बनवला असेल तर मग एक बाई खऱ्याखुऱ्या बैला समोर नाचली म्हणुन बिघडलं कुठे.


मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

महाराष्ट्राचे 'बेपर्वा' भुषण...!

 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात १२ श्रीसेवक उष्माघाताने मृत्यू पावले अन् या कार्यक्रमाला गालबोट लागले अशी बातमी पसरली खरंतर गालबोट लागलं असं म्हणणें साफ चुकीचे असुन कार्यक्रमाची भरदुपारची वेळ,४२° तापमान, सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत एवढा ६ ते ७ तासांचा उन्हाचा तडाखा तसेच २० ते २५ लाख लोकांसाठी लागणारी वैद्यकीय, आपत्कालीन व मंडप व्यवस्था या कशाचाही संवेदनशीलपणे विचार न करता सरकारी तिजोरीतून १४ कोटी रुपये खर्च करून केलेलं ढिसाळ नियोजन, सत्कारमुर्ती व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मंत्री यांनी आपल्या सोयीनुसार अन् उपस्थित लोकांना गृहित धरत असंवेदनशीलपणे  निवडलेली वेळ अन् सगळ्यात महत्वाचे तारतम्याचा अभाव असणारे अंधभक्त या सर्वांनी घेतलेले ते बळी आहेत. हा उष्माघाताचा नव्हे तर आत्मघाताला प्रवृत्त करण्याचा गुन्हा आहे.

राजकीय व्यवस्थेला अनुयायांच्या संख्येत दिसणारा मतांचा आकडा ( दुर्दैवाने याला कुणीही अपवाद नाही ) अन् त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करत परस्पर फायदा करून घेण्यासाठीची हाव सामान्य माणसाच्या जीवावर बेतू शकते याची पर्वा आहे का?

तसेच स्वत:ला प्रबोधनकार, निरुपणकार, समाजसेवक समजणाऱ्या व्यक्तींना ज्या माणसांमुळे समाज घडतो त्या शेवटच्या एका घटकाला देखील माझ्यामुळे कसलाही त्रास होता कामा नये याची खरंच पर्वा आहे. का केवळ फॉलोअर, सबस्क्राईब,लाईक अन् शेअर करत घंटा बडवणाऱ्या संस्कृतीचे पाईक होण्यातच समाधान आहे. 

सरतेशेवटी परिस्थितीमुळे रंजलेल्या, गांजलेल्या तसेच हतबल झालेल्या सामान्य माणसाला आधाराची तसेच एका आशेच्या किरणाची गरज असते पण गरजवंताला अक्कल नसल्याने योग्य तो बोध अन् प्रेरणा न घेता पायावर लोटांगण घालत एखाद्या व्यक्तीला देवाऱ्ह्यात बसवून श्रीसेवक भक्तगण होण्यातच धन्यता अन् दर्शनाची ओढच अधिक असेल तर मग अशांना स्वत:ची तरी पर्वा असते का?

महाराष्ट्राला थोर संत, प्रबोधनकार, महापुरुषांची परंपरा लाभली आहे संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांपासून संत गाडगेबाबां पर्यंत तसेच शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरां पर्यंत अनेक भुषणावह व्यक्तींची मांदियाळी महाराष्ट्राने अनुभवलेली आहे परंतु ती कितपत रूजलेली आहे हा दुर्दैवी प्रश्न आहे.

२५ लाखांची पुरस्कार रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचं औदार्य औट घटकेचं ठरावं अन् त्याच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत श्रीसेवकांसाठी ६० लाख रुपये द्यावे लागावे हे बेपर्वाई चेच लक्षण आहे.

अंधभक्तांच्या शक्तिप्रदर्शनाने मनोमन सुखावणारे , पुरस्कारचे सोपस्कार करत दिल्लीच्या हुजुरांना राजकीय वातावरण कसं आपल्या बाजूने आहे हे दाखवण्यासाठीची चमचेगिरी करणारे कुठल्याही घटनेच्या मुळाशी न जाता त्यात असलेल्या फायद्याची पर्वा अधिक करतात अशी आपमतलबी सोपस्कार अन् बेफिकीर वृत्ती असणारेच खऱ्या अर्थाने बेपर्वा भुषण आहेत ही महाराष्ट्राची सांस्कृतिक शोकांतिका आहे.


शुक्रवार, २४ मार्च, २०२३

विष्षय हाय का.....!





 शिवराय नुसता मिरवायचा नाय तर गिरवायचा विषय हाय, 

राजे पुन्हा जन्माला यायचा नाय तर तो विचार पुन्हा जन्माला घालण्याचा विषय हाय.

शिवजयंतीला नुसत्या घोषणा अन् जयजयकार करण्याचा नाय 

तर जय भवानी म्हंटल्यावर आपसूकच जय शिवाजीन उर भरण्याचा विषय हाय

शिवाजी हा केवळ मराठी अस्मितेचाच नाय तर स्वराज्य घडवायचा विषय हाय

म्हणुनच म्हणतो मित्रानो शिवाजी फक्त बोलण्याचाच नाय तर करून दाखवायचा विषय हाय

शिवराय नुसता मिरवायचा नाय तर गिरवायचा विषय हाय

विषय एकच रयतेचा राजा राजा शिवछत्रपती....

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

बिरूदावली, कर्तृत्व अन् मर्यादा...!

 

पुन्हा येरे माझ्या मागल्या... खरंच आपल्या लोकप्रतिनिधींकडून किमान लोककल्याणासाठी आवश्यक समाजकारणाची अपेक्षा ठेवायची का हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय.

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे का स्वराज्यरक्षक म्हणायचे , छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राम्हण प्रतिपालक म्हणायचे का कुळवाडी भूषण म्हणायचे या प्रश्नावर जो अखिल राजकीय काथ्याकूट चालू केला आहे हे नेमके काय आहे एका बाजूला भाजपचे धार्मिक ध्रुवीकरण अन् दुसरीकडे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे धार्मिक उदारीकरण दोन्हीही केवळ पक्षीय फायद्यासाठीचे राजकारणच. खरंतर या आधी सामान्य जनतेने याचा अर्थपुर्ण विचार केला असेल का अन् त्यानुसार त्यांची महापुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन निर्माण झालेला असेल का या बाबत माझ्या मनात तरी शंका आहे. कोणती बिरुदावली वापरली म्हणजे कर्तृत्व संकुचित अथवा व्यापक होते यावर जो काही बौद्धिक वर्ग चालू झालेला आहे व त्यासाठी जे काय तर्कवितर्क लढवले जात आहेत ते दोन्ही बाजूंच्या समर्थकांना योग्य वाटत असणार यात शंका नाही परंतु भाषेचा अन् भाषेत वापरण्यात येणाऱ्या बिरुदावल्या यांचा अभ्यास मुळांत किती व्यापक आहे यासाठी जर संशोधन केले व मराठी भाषेची अवस्था काय आहे अन् ती सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक मराठी शाळांची व त्यातील मास्तरांच्या गुणवत्तेची  वस्तुस्थिती काय आहे याचा धांडोळा घेतला तर आपला पोकळ अभिमानच अधोरेखित होईल अन् हे सर्व हिंग्लिश मराठी बोलणाऱ्या अन्  वागणाऱ्या तरूणांच्या डोक्यावरून जाण्याचीच शक्यता अधिक. 

बिरुदावली व तिचा संकुचित अथवा व्यापकपणा समजण्यासाठी मुळात आवश्यक प्रगल्भता वाढविण्यासाठी हे सभागृहांचे सन्माननीय सदस्य कोणत्या ध्येयधोरणांसाठी आग्रही आहेत. एकीकडे यावर्षी आपण चीनच्या लोकसंख्येचा विक्रम मोडत १४० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश  होणार आहोत अन् चीन लोकसंख्येच्या दृष्टीने आक्रसत जाणार आहे असं असूनदेखील लष्करी बजेट आपल्यापेक्षा तिप्पट असणाऱ्या चीनची अतिक्रमणाची भुक वाढत चालली आहे हे आपण गलवान, तवांगच्या निमित्ताने अनुभवतो आहोतच. तसेच पाकिस्तान सारखा टंचाई, महागाई व कर्जबाजारी असणारा देश असे आपली डोकेदुखी वाढवणारे शेजारी शत्रुराष्ट्रे असताना अशा परिस्थीतीत आपल्या देशातील बेरोजगार तरुणांसाठी , हवामान बदलामुळे शेती अन् पर्यायाने शेतकऱ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा दुरदृष्टीने विचार करत ठोस उपाययोजना करणार आहोत का तसेच ह्या खऱ्या आव्हानांसाठी सन्माननीय सदस्य किती सभागृह डोक्यावर घेतात.

खरंतर कुणाला कोणती व किती बिरुदावल्या लावायच्या हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा तसेच बौद्धिक आकलनशक्तीचा भाग आहे एक बिरुदावली वापरा अथवा एकावेळी अनेक बिरुदावल्या वापरा कोणत्याही महापुरुषांचे कर्तृत्व हे केवळ बोलण्याने नव्हे तर कृतीने सिद्ध झाले आहे अन् ते कधीही कोणत्याही संज्ञेने संकुचित अथवा व्यापक ठरणार नाही. मग या महापुरुषांच्या कर्तृत्वाचा कित्ता आपले भाषांतज्ञ लोकप्रतिनिधी गिरवणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. बिरुदावलीमुळे कर्तृत्वाच्या मर्यादा ठरत नाही तर कर्तृत्वामुळे बिरुदावलीच्या मर्यादा व्यापक होतात.


रविवार, १ जानेवारी, २०२३

झाकली मूठ सव्वा लाखाची....!

 

खरंतर सध्याच्या राजकीय घडामोडींवर काय बोलावे का केवळ ऐकावे, पहावे अन् सोडून द्यावे अशा द्विधा मनस्थितीत बहुतांश सुज्ञ नागरिक असावेत कारण डर्टी विद्याने जे बौद्धिक चाटण दिले आहे त्यानुसार हे जग फक्त तीन गोष्टींवरच चालते ते म्हणजे मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन.. म्हणजे एकुन काय तर प्रत्येक गोष्टीत स्वतःचं मनोरंजन करायचं अन् पुढल्या गोष्टी कडे वळायचं. हे सगळे जरी खरं मानलं तरी कुठल्याही अतिरेकाचा मग मनोरंजन असले तरी त्याचा देखील उबग येतो.

दिखाव्या पुरता असलेला लोकशाहीचा तमाशा व मिरवण्यापुरतीच असलेली संवैधानिक यंत्रणा मग तथाकथित लोकतांत्रिक पद्धतीने निवडून गेलेले लोकप्रतिनिधी सभागृहात जाऊन काय करतात याचं थेट प्रक्षेपणच उपलब्ध असते परंतु लोकांनाच लोकप्रतिनिधींकडून कोणत्या अपेक्षा आहेत अन् कोणत्या असाव्यात हेच माहित नसेल तर काय बोंबलायच...मग हिवाळी नंतर उन्हाळी असे अधिवेशन म्हणजे पुर्वीच्या दहावीच्या ऑक्टोबर-मार्चची वारी अन् त्या वारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तुलना सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या नितिमत्तेशी व्हावी. खोचक उपमा देत एकमेकांवर शाब्दिक कोट्या करणे एकमेकांना शालुतून जोडे मारणे नाहीतर नळावरच्या उणीधुणी काढणाऱ्या भांडणाची आठवण करून देणारे आरोप प्रत्यारोप किंवा चिखलफेक करणे हेच चित्र दिसत असते. मग विरोधी पक्षातील नेत्यांनी अमका घोटाळा झाला तमका घोटाळा झाला म्हणत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचे मग सत्ताधाऱ्यांनी तुमची अंडी पिल्ली सगळी माहितीयेत असा गर्भित इशारा द्यायचा मग परत तुम्ही गोविंदबागेत का भेटायला गेला होता हे आम्हाला माहीत आहे असा सुचक इशारा द्यायचा हा अन् असाच घटनाक्रम सतत चालू ठेवायचा अन् आपण कसे जनतेचे प्रश्न मार्गी लावले किंवा मांडले अशी वृत्त वाहिनीच्या दांडक्यासमोर तोंडपाटीलकी करायची.

मग आत्तापर्यंत कुठल्या घोटाळ्याचे काय झाले अन् काय सोक्षमोक्ष लावला याचं उत्तर कधीच मिळत नाही कारण आज सुपात असणारे उद्या जात्यात असतात म्हणून केवळ राजकीय सोपस्कार करत राहायचे अन् उत्तर न शोधण्याच्या मानसिकतेतून प्रश्न उपस्थित करत राहायचे हा एवढाच धंदा हो धंदाच करत आहेत.

किशोर कुमार चे एक गाणं आहे  'बंद मुठ्ठी लाख की खुली तो खाक की....' ते एकत्र असलं की किंमत असते या अनुषंगाने वापरलयं परंतू आपल्या कडे झाकली मूठ सव्वा लाखाची अशी म्हण आहे या दोन्ही गोष्टींचा वापर आपल्या लोकप्रतिनिधींकडून हमाम में सब नंगे यासाठी एकी दाखवत तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत झाकली मूठ ठेवत याचा चपखल वापर केला जातो अन् एवढं उघड गुपित असुन सुद्धा जनता जनार्दन गांधारी प्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधून झाकली मूठ सव्वा लाखाची समजत राहण्यातच धन्यता मानते हे विशेष. असो सरत्या वर्षाच्या ओझरत्या आठवणींना उजाळा देत नव्या वर्षाच्या आशादायक व सकारात्मक बदलासाठी आपल्या सर्वांनाच सद्बुद्धी लाभो याच नविन वर्षाच्या शुभेच्छा!


शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

उलट प्रवास गोतास काळ...!

 

अती स्वार्थी, महत्त्वाकांक्षी अन् लालची लोक सोयिस्कर बोलतात सोयिस्कर भुमिका घेतात अन् आपल्याच बदलत्या भुमिकेसाठी तर्कवितर्क लावत या बोटावरची थुंकी त्या बोटावर करतात. अशी लोकं आपल्या तल्लख बुद्धीचा तसेच वक्तृत्व कलेचा वापर भ्रम निर्माण करण्यासाठी करतात अन् केवळ आशाळभूत तसेच मनोरंजन मानसिकतेचा तसेच अल्पमतीधारक वर्ग अशांच्या भुलथापांना बळी पडतो व यांना डोक्यावर घेऊन मिरवतो. सध्याचा काळ हा अशा सर्वपक्षीय गणंगांचा आहे. ज्या शिक्षण व्यवस्थेत प्रश्न पडत नाहीत अन् जीला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत किंबहुना मान्य नसतात तसेच जिथे वस्तूनिष्ठ तर्कसंगत वादविवाद होत नाहीत अशा व्यवस्थेतुन स्वतंत्र व प्रगल्भ विचारधारा निर्माण होणं दुरापास्त आहे. बाबासाहेबांनी शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दलीत वर्गाला दिला असे आपण समजत असलो तरी तो लोकशाहीच्या व्यापक हितासाठी समस्त जनांना लागू आहे. खरंतर बाल बुद्धिला नेमके समजण्यासाठी जरा जास्तच फोड करून सांगावे लागते हे कदाचित बाबासाहेबांकडुन राहुन गेलं असेल कारण शिका म्हणजे नेमकं काय शिकलं पाहिजे अन् त्यासाठी शैक्षणिक धोरण किती पारदर्शक अन् जबाबदार नागरिक घडवणारे असलं पाहिजे हे इथल्या शिक्षणसम्राट धुरिणांना व केवळ सत्तापदाचा टेंभा मिरवणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना तसेच लांगुलचालना करिता खोगीरभरती केलेल्या एकांगी शिक्षणतज्ञांना कळणं अन् कळलं तरी वळणं हा खरंतर खोटा आशावाद ठरेल अशी वस्तुस्थिती आहे. मग अशा शिक्षण व्यवस्थेतूनच निर्माण झालेले लोकशाहीचे तथाकथित चार स्तंभ हे समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासणारे असण्याचा धोका संभवतो मग अश्या असमान स्तंभावर अच्छादीत छत कोणाला आसरा देणार. मग वैचारिक गोंधळ उडालेल्यांना कशासाठी संघटित व्हायचं अन् कुणासाठी संघर्ष करायचा कसं समजणार.
ज्याप्रकारचा राजकीय व सामाजिक थिल्लरपणा राजरोसपणे सुरू आहे तो पाहता इथल्या लोकांच्या सहनशीलतेची विश्वविक्रमा साठी नोंद झाली पाहिजे कदाचित स्वमग्नेतेचा अतिरेकच यासाठी कारणीभूत असावा.
बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला हे राजकारणात असणाऱ्यांना अन् उठता बसता नाव घेणाऱ्यांना माहीत असणं स्वाभाविक हवे असो पण त्यांच्या बद्दल तांत्रिक माहिती असण्यापेक्षा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची व विचारधारेची दिशा माहिती असणे अधिक आवश्यक आहे किंबहुना सर्वच संत, महापुरुषांच्या बद्दल जो वाचाळपणा चालू आहे तो याच वरवरच्या उपऱ्या मानसिकतेतून निर्माण होतो आहे अन् यासाठीच तांत्रिक शिक्षणा ऐवजी नैतिक शिक्षण अधिक आवश्यक आहे. केवळ चांगले शैक्षणिक धोरण असणे पुरेसे नाही तर ते सर्वदूर पोहचणे आवश्यक आहे तरच सभ्य, सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाज निर्माण होईल अन् खऱ्या अर्थाने अंधारा कडून प्रकाशाकडे वाटचाल करू अन्यथा उलट प्रवास गोतास काळ ठरेल.

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

कुटायच भजन अन् डोक्याचं भजं....!

 

हल्ली ज्या काय राज्यीय, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय बातम्या सातत्याने आदळतायत त्या ऐकून, वाचुन, बघुन कोणता अन् कसला परिणाम होणार आहे याची जरा सुद्धा जाणीव लोकांना दुर्दैवाने होत नसावी म्हणूनच या गोष्टींचा अतिरेक बळावत चालला आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर खरा पक्ष कुणाचा ते गद्दार व्हाया खोके यापासून न टळणारी ईडा पिडा तसेच गुजरातराज्यामध्येच जाणारे उद्योग अन् योगायोगाने तिथलेच असणारे पंतप्रधान तर दुसरीकडे एकेकाळी सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या अन् सध्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या कॉंग्रेसचे भारत जोडो आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणारे युवराज भाजपाच्याच मार्गाने जात इतिहासातील मुडदे उकरत बसत नको ते खाद्य पुरवत असतील तर भरकटलेली अवस्थाच अधोरेखित होते अन् जोडण्या ऐवजी तोडण्याची शक्यता बळावते हे न‌ जाणवणे उपऱ्या विचारधारेचे  लक्षण आहे. केवळ इव्हेंट करण्याच्या कृतीला केवळ इव्हेंट करूनच प्रत्युत्तर देणार असाल तसेच मानसिक,आर्थिक अन् पर्यायाने शारीरिक समस्यांना कारणीभूत असणाऱ्या व आ वासून उभ्या राहिलेल्या वर्तमान परिस्थितीचा सारासार अन् सांगोपांग विचार करणार नसाल तर देश म्हणून आपणाला फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे अन् यासाठी कोणत्याही बाबा वेंगा किंवा नॉस्ट्रॅडॅमसची गरज नाही.

एकीकडे राजकीय पक्षांची धुळवड अन् दुसरीकडे फिल्म इंडस्ट्रीचे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली चालू असलेले ऐतिहासिक गल्लेभरू बाजारीकरण अन् त्यातून निर्माण होणारे व केले जाणारे वाद पाहता कोणत्या वेडात हे सगळे धावतायत हेच कळेनासे झाले आहे. ज्या सुशासन अन् रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यक्तिगत आयुष्य न जगता आपले सर्वस्व अर्पण केले हे त्यांचं कर्तृत्व बोलण्या पलिकडे कृतीत उतरलं नाही हे जळजळीत वास्तव आहे. महापुरुषांचे केवळ वाचाळ प्रदर्शन करण्या पलीकडे आपली मजल जाऊ शकत नाही कारण कुठल्याही पक्षाला अन् नेतृत्वाला ती निखळ तळमळ नाही, आहे तो केवळ सोपस्कार.

आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाचं अहंकारी अन् स्वमग्न नेतृत्व व त्यातून निर्माण झालेले रशिया-यूक्रेन युद्ध अन् या सर्वां भोवती फिरत राहणारं आंतरराष्ट्रीय राजकारण हे भविष्यातील महायुद्धाची नांदी आहे यातुन सावध होत आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता राखण्यासाठी दुरदृष्टीने पावलं उचलली पाहिजेत परंतु स्वत:चच घर सांभाळतानाच ससेहोलपट होत असेल तर जगाची उठाठेव कोण करणार अशी बहुतांश देशांची अवस्था झाली आहे. परंतू एकंदरीत स्वास्थ्य हे परस्परावलंबी असते हे लक्षात घेतलेच पाहिजे त्यासाठी कोणतेही संकट आपल्या उंबरठ्यापर्यंत येण्याची वाट बघण्याची आवश्यकता नाही. दुसरीकडे उद्योग क्षेत्रात विदेशी इलॉन मस्क, किंवा देशी अदानी अंबानी प्रवृत्ती सगळं गिळंकृत करण्यासाठी हपापलेली असणं अन् पैशाची ताकद वापरून नैसर्गिक चिव चिव बंद करण्याचा अट्टाहासचे ग्लोबलायझेशन सुसंस्कृतपणा च्या मुळाशी येणार आहे.

या अन् अशाच उबग आणणाऱ्या बातम्यांचा भडिमार म्हणजे तेच ते निरर्थक टाळ कुटायचं भजन झाले आहे अन् त्यामुळे अक्षरशः लोकांच्या डोक्याच भजं झालं आहे. खरंतर वेळ आली आहे की लोकांनी अशा चर्चेला अन् चर्चा करणाऱ्यांना नाकारण्याची कारण बाजाराचा नियम आहे जे विकतं ते चालतं म्हणून 'चलता है' ही वृत्ती सोडून जाणिवपूर्वक चांगल्या गोष्टीसाठी आग्रही रहाण्यातच शहाणपण आहे .

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।

ज्याचे अंगी मोठेपणा । तया यातना कठीण ।।

तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।

हा नम्रपणाच माणसाला सुखी राहण्याचा गुरुमंत्र आहे. तो सर्वांना लाभो ही सदिच्छा...



शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

भारतीय नौदलाला त्रिवार वंदन...!

 





आज भारतीय नौदल आणखी समृद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आज देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे अन् नक्कीच भारताची सामरिक ताकद अनेक पटींनी वाढली आहे. एक भारतीय म्हणून मला सार्थ अभिमान आहेच पण एक महाराष्ट्रीयन म्हणून मला आज विशेष आनंद होत आहे कारण भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि श नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ 'जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो' असा आहे.
भारताचे पहिले आरमार उभारणाऱ्या शिवरायांच्या राजमुद्रेपासून नौदलाच्या नव्या झेंड्यासाठी प्रेरणा घेतली आहे तसेच हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र


मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

मनोरुग्णाची संवेदना अन् शहिदांना मानवंदना...!

 



     मालेगाव शहरात २००५ मधे उभारण्यात आलेलं शहीद स्मारक राजकीय मतभेदांमुळे  उद्घाटनापासुन वंचित होते तसेच अनेक वर्षे झाकलेल्या स्थितीत होते.

काल अचानक एका मनोरुग्णाने चबुतऱ्यावर चढत स्वत:च्या शर्टाने ते साफ करत कागदाच्या पूडीतून आणलेला फुलांचा हार त्याला घातला अन् एक अनोख्या प्रकारे त्याचे उद्घाटन झाले. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे अन् यामागे काही दुसरा प्रकार आहे का याची चौकशी केली जातेय. 

असो एकंदरीतच या घटनेतील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तथाकथित सुशिक्षित अन् सुसंस्कृत समाजामध्ये तथाकथित आदर्शवाद दाखवण्याचा जो प्रयत्न म्हणून मग तो पुतळा असो की स्मारक असो त्याच्या उभारणीचा नेहमीच घाट घातला जातो पण त्यामध्ये वैचारिक प्रगल्भते पेक्षा सोपस्काराचा हेतू अधिक ठळक असतो. त्या पूतळ्यातील व्यक्तिच्या विचारांकडे अथवा स्मारकांतून मिळणाऱ्या कृतज्ञता तसेच प्रेरणादायी भावने कडे आपण किती संवेदनशीलपणे पाहतो किंवा किती संवेदनशील असतो हा खरा कळीचा प्रश्न आहे. निरोगी समाज म्हणून गृहित असलेली‌ संवेदनशीलता जर दिसत नसेल जाणवत नसेल अन् दुसरीकडे मात्र समाजाच्या दृष्टीने मानसिक संतुलन हरवलेला एखादा मनोरुग्ण ती संवेदनशीलता जोपासत असेल अन् आपल्या कृतीने ती दाखवत असेल तर नेमकं कुणाचं संतुलन बिघडलयं . 

खरंतर सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून, समाज म्हणून आपण कसे आहोत याचा विचार केला पाहिजे अन् आपापल्या भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे तरच अपेक्षित दर्जेदार लोकशाहीसाठी आवश्यक लोकशाहीचा दर्जा उंचावेल अन् ही लोकशाही टिकावी अन् वृद्धिंगत व्हावी यासाठी बलीदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शहिदांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल अन्यथा प्रतिकात्मकतेच्या मनोव्यापारासाठी प्रतीकांचा जो खेळ मांडला जातो त्याची अखेर मनोरुग्णाच्या संवेदनशिलतेनेच होईल.


Natural Introspection...!

 


Nature always inspire us to introspect...!

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

नवसाचं ओझं अन् देवाचा अवतार...!




    आज एक जण महादेवाच्या रूपात भेटला उत्सूकता म्हणुन त्याच्याशी बोललो तेव्हा त्यानी सांगितले तो एक बहुरूपी हाय पोलीस ठाण्यात नोंद हाय, भजन-किर्तन करतु , तबला वाजवतु अन् देवाचे फोटु बी विकतु... एवढे सगळे बायको, पाच मुलं यांचा संसार चालवण्यासाठी चालू आहे पण मी लोककलाकार असून मला सरकार कडून लोककलाकारांसाठी ची पैशाची मदत मिळत नाही त्यासाठी त्यावेळच्या भारताच्या अर्थमंत्र्यांना सुशिलकुमार शिंदे यांना भेटलो पण एवढा अर्थमंत्री असुन काय बी उपयोग झाला नाही ही त्याची खंत अजूनही ताजी आहे. तसं तर बायको, पोरं काय बी नसत तुमचं नाव सुद्धा नावालाच असतयं तुम्ही एकटं येताय अन् जाताय ही त्याची 'एकटा जीव सदाशिव' फिलॉसॉफी कदाचित स्वतःच स्वतःची समजूत काढत जगण्याचं बळ आणत असेल.

त्याला विचारलं पैश्यासाठी रोज अश्याच अवतारात रंगरंगोटी करून फिरता का तर म्हणाला नाय श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी करतो पण पैश्यासाठी नाय तर यातनं जमलेल्या पैशातला स्वत:ला एक रूपया सुद्धा घेत नाही तर गावातल्यांना देवाच्या नावानं जेवायला घालतो. मी विचारलं का तर म्हणाला पोरगं आजारी असताना नवस बोल्लो होतो. 

खरंतर आज पंचक्रोशीतील अनेक पालख्या पाचवडेश्वराच्या भेटीला येत होत्या माणसं देवाच्या नावानं चांगभलं करत ढोल ताशा वाजवत जात होते पण खरंतर या पालखी बाहेरच्या देवानं माझं लक्ष वेधून घेतले. देव देवळात नाही तर माणसात शोधावां असं संत गाडगेबाबा नेहमी सांगत असत खरंच देव माणसापेक्षा माणसाच्या दुःखात अधिक सामावलेला असतो . रोजच्या संघर्षासाठी देवाचे फोटो विकता विकता नवसाचं‌ ओझं वाहत प्रत्यक्षात त्याचा अवतार करून त्याच्या अवताराचीच वाट बघत असेल. 

कदाचित माणसाला माणसाच्यातल्या देवाचा साक्षात्कार होईल तेव्हा नवसाच्या ओझ्याची अन् देवाच्या अवताराची गरज भासणार नाही.


गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

उच्च कोटीची नैतिकता हाच स्त्री सन्मानाचा कणा...!


       महिला सबलीकरण, महिला आरक्षण, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सन्मान या घोषणांचा अथवा धोरणांचा नुसता उदो उदो करून कसलाही पुरोगामी विचार अन् कृती अस्तित्वात येऊ शकत नाही त्यासाठी स्त्रियांविषयी आदर रक्तातच असावा लागतो. खरंतर केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर समस्त भारतीयांना आदर्श अन् प्रेरणादायी अशा महापुरुषाने आपल्या इथे जन्म घेतला याचा अभिमान असायलाच हवा अन् ते व्यक्तिमत्व म्हणजे एकमेवाद्वितिय छत्रपती शिवाजी महाराज.

त्यांच्या कारकिर्दीतील असंख्य उदाहरणे त्यांच्या उच्च कोटीच्या नैतिकतेची साक्ष देतात. उमरखिंडीत महाराजांच्या विरोधात लढलेली मोगली फौजेची रायबाघिणीचा पराभव होऊन देखील तिच्या हुद्द्या प्रमाणे तीचा मानसन्मान करत तीला परत पाठवले. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कर्नाटकातील बेळवाडीची किल्लेदार सावित्रीबाई देसाई ही महाराजांच्या सैन्या विरोधात लढत होती तिच्या किल्ल्याला तब्बल महिनाभर महाराजांचा सरदार सकुजी गायकवाड याने वेढा दिला होता अन् अखेर तीचा पराभव झाला मात्र सकुजी गायकवाडाने उन्मत्त होऊन तिच्यावर बलात्कार केला अन् जेव्हा ही गोष्ट महाराजांना समजली तेव्हा त्यांनी सकुजी गायकवाडाचे डोळे काढून आयुष्यभरासाठी कोठडीत ठेवले. तसेच सावित्रीबाई देसाई यांची क्षमा मागून त्यांचा यथोचित सन्मान राखला. यादवाडला सावित्रीबाई देसाई यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दुध पाजताना चे महाराजांचे शिल्प त्यांच्या सह्रदयतेचीच साक्ष देत आजही उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर आपल्यातील रांझ्याच्या पाटलाने पाटीलकीचा माज करत एका गरीब शेतकरी महिलेची अब्रु लुटली तेव्हा जराही विलंब न करता महाराजांनी त्याचे हातपाय तोडले. खरंतर आजच्या सारखी पी.आर.ओ. टीम ठेवून स्वतःच स्वतःची टिमकी वाजवण्याची त्या काळी प्रथा नसुन देखील एक मोगल इतिहासकार खाफीखान लिहतो ' जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे '. स्वकियांच्या बरोबरीने राजकीय विरोधकांच्या आई, बहिण, पत्नी, मुलगी अशा कोणत्याही स्त्रीचा महाराजांनी केवळ अन् केवळ सन्मानच केला.

महाराज केवळ सन्मान करुन थांबले नाहीत तर त्यांना बरोबरीचा दर्जा देत निर्णय प्रक्रियेत देखील सहभागी करून घेतले म्हणूनच त्यांच्या सूनांनी देखील हातात तलवार घेऊन मैदानं गाजवली हा इतिहास आहे.

कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला जेव्हा सैनिकांनी शिवाजी महाराजांच्या समोर उभे केले तेव्हा तिच्याकडे पाहुन 'अशीच आमची आई सुंदर, रुपवती असती तर आम्ही देखील सुंदर झालो असतो ' असं म्हंटल्याची बखरी मध्ये नोंद आहे. त्या स्त्रीचा मातेसमान आदर करुन त्यांची सौंदर्याकडे देखील पाहण्याची असाधारण दृष्टी अन् वृत्तीच अधोरेखित होते.

वास्तविक अशाप्रकारचा नैतिक संस्कार घडविणारा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला नाही हे आपलं खरं दुर्दैव.

जिजाऊंनी केलेले ज्वाज्वल्य संस्कार हेच या नैतिकतेचे खरे गमक आहे तेव्हा एक स्त्रीच सुशासन निर्माण करणारा पुरुष निर्माण करु शकते अन् त्या पुरुषातील उच्च कोटीची नैतिकता हाच स्त्री सन्मानाचा कणा असतो.


बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

स्त्री सन्मान.. बोलाची कढी आणि बोलाचा भात...!

 

     

    बिल्कीस बानो प्रकरणाविषयी माहिती असण्याची शक्यता तशी कमीच खरंतर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचा पुन्हा उल्लेख अपरिहार्य पणे करावा लागतो आहे. गोध्रा हत्याकांडाची प्रतिक्रिया म्हणून ११ जणांनी त्यावेळी १९ वर्षाची तसेच पाच महिन्यांच्या गरोदर असणाऱ्या बिल्कीस बानो वर सामुहिक बलात्कार केला. त्यासाठी या नराधमांना २००२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. १५ वर्षाची शिक्षा भोगल्या नंतर माफी साठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली असता न्यायालयाने तो अधिकार घटना जिथं घडली तिथल्या सरकारने तो निर्णय घेण्याचे सुचवलं त्याप्रमाणे गुजरात सरकारने त्यांना तांत्रिक कायदेशीर तरतुदींचा वापर करून मुक्त केले. खरंतर तांत्रिक कायदेशीर तरतुदीं पेक्षा समाजाला कोणता संदेश दिला जातो याचा गांभीर्याने अन् संवेदनशीलपणे विचार झाला पाहिजे.

या नराधमांना स्वतःच्या कृत्याची किती उपरती झाली त्यांनाच ठाऊक पण त्यांना सोडलं इथपर्यंत ठीक पण काही महाभागांनी या लोकांचं मिठाई देऊन व हार घालून स्वागत केले. या कृतीतून सदसद्विवेकबुद्धीचा किती ऱ्हास झाला आहे हेच अधोरेखित होत आहे. बलात्कारासारख्या अतिशय गंभीर गुन्ह्याला धार्मिक अथवा बदल्याच्या भावनेतून पाहणं अन् त्याचा व्यक्तिगत तसेच सामाजिक पातळीवर सहज स्वीकार केला जातो हे पाहणे माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कारित रक्ताला कदापीही सहन होणार नाही.

खरंतर नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वतंत्रता दिनी पंतप्रधानांनी भाषणात स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे असे आवाहन केले अन् त्यांच्याच गुजरातने त्याला हरताळ फासला आहे. जात, धर्म, पंथ निरपेक्ष स्त्रीचा सन्मान राखलाचं गेला पाहिजे तसं न होता केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात होताना दिसत आहे हे भारतीय संस्कृतीसाठी अत्यंत खेदाची अन् शरमेची बाब आहे.


बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

भावनिक बाजारीकरण...!

    खरंतर जगात कुठेही गेलात तर आपल्याला कशाची ना कशाची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रतिकं आढळतातच. प्रत्येक व्यक्तीला आपापले वैचारिक वेगळेपण मांडण्यात अधिक रस असतो अन् जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा आपापल्या समविचारी मंडळींना खरंतर सध्याच्या युती-आघाडी सरकार प्रमाणे किमान समान कार्यक्रमा सारखं एकत्र करून आपापली प्रतिकं मिरवण्यात अभिमान देखील वाटतो इथपर्यंत काहीच गैर नाही अन् तसा अधिकार संविधानानेच प्रत्येकाला दिला आहे. परंतू जेव्हां आमचाच विचार अधिक योग्य अन् तोच स्विकारला पाहिजे हा अट्टाहास येतो तेव्हां आपसूकच अभिमानाची जागा अहंकाराने घेतली जाते. 

सध्या ' हर घर तिरंगा ' ही संकल्पना केंद्र सरकारकडून शासकीय पातळीवर व्यापकपणे राबवली जातीय यात वरवर पाहता काही गैर नाही परंतू आपला राष्ट्रध्वज, आपला तिरंगा हे कशाचे द्योतक आहे तर जगात आपण भारतीय म्हणून एक आहोत अन् आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिक म्हणजे तिरंगा. लहानपणापासून १५ ऑगस्ट,२६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे करणे म्हणजे ध्वजवंदन, जिलेबी खाणं, देशभक्ती गीत लावणे आणि सार्वजनिक सुट्टी या स्वरूपात अनुभवत आलो आहोत अन् practice makes man perfect या धर्तीवर आपल्यात केवळ हे म्हणजेच राष्ट्रप्रेम हे अंगवळणी पडले आहे पण खऱ्या अर्थाने ते रुजलं गेले आहे का याचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. अन् सध्या असण्यापेक्षा दिसणं जास्त महत्त्वाचं झालं आहे. धंद्याच्या सुत्रा प्रमाणे ' जो दीखता है वो बिकता है ' मग अशा प्रकारे राष्ट्रभावना जागी (जागृत नव्हे) करण्यात रस असेल तर एक महान राष्ट्र म्हणून अन् त्यासाठी आवश्यक एक सक्षम, जागरूक नागरिक घडवण्यासाठी हर घर आरोग्य, हर घर मुल्य शिक्षण, हर घर संविधान यासाठी शासकीय पातळीवर व्यापकपणे व जोमाने काम होताना दिसत नाही. 

असं म्हणतात माणूस हा भावनेने विकला अन् विकत घेतला जावू शकतो मग अशा मार्गाने राष्ट्रभावनेला साद घालून महत्त्वाच्या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होणार असेल तर देश सुजलाम सुफलाम होणार आहे का? अन् हर जूबाॅं केसरी म्हणत जिथं तिथं थूंकून देश घाण करणाऱ्यां व्यसन बहाद्दरांना तिरंग्यातील केशरी रंगाचे महत्त्व कळणार आहे का?

सद्ध्या समाजातील प्रेरणादायी व्याख्यान अथवा उपक्रमाचं बाजारपेठीय मुल्य पाहता केवळ अशी तात्पुरती उत्साह निर्मिती मुलभूत उर्मी निर्माण करु शकते का? जेव्हां अमृत महोत्सवा निमित्तानं हे होत असताना ७५ वर्षे होऊन देखील मुलभूत गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होणार असेल तर दुरदृष्टी तरी कुठून येणार.

भावनिक हिंदोळ्यावर झुलणाऱ्यांना झुलवत ठेवले की जमिनीवरील वास्तवापासून दूर ठेवणं सोपं जातं मुळातच स्वतःला अन् समाजाला प्रश्न न विचारण्याची मुलभूत शिक्षण व्यवस्था अशा भावनिक बाजारीकरणाला प्रोत्साहनच देणार हे कटू सत्य आहे.


" झंडे की तसबीर तो जहेन ओ दिल में छपी है।

अब देश की तकदीर बदलनाही मेरी हर आरजू की फितरत है। "

शनिवार, ३० जुलै, २०२२

वैचारिक दहशतवाद...!


      नुकतेच महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एका खासगी कार्यक्रमात गुजराती व राजस्थानी लोकांमुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे अन् ते निघून गेले तर मुंबईत काही उरणार नाही अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. कदाचित राज्यपालपदा सारखी शोभेची परंतू राजेशाही थाटाची अन् निवृत्तीसाठीची उत्तम सोय असणारी झुल अंगावर पांघरल्याच्या कृतार्थ भावनेतून (उपकाराची परतफेड) सदरची शब्द सेवा घडली असेल किंवा पुढे येणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून गुजराती व राजस्थानी मतदारांचे ध्रुवीकरण अथवा लांगुलचालन करण्याचा उद्देश ठेवून हा शब्द खेळ खेळला असेल.

खरंतर भारतीय संविधानाने कोणत्याही राज्यातील नागरिकांनी देशात कुठेही जाऊन राहण्याचा व काम करुन पैसा कमवण्याचा अधिकार बहाल केला आहे अन् तो रास्तच आहे. परंतू आपण जिथे जातो, राहतो तिथल्या संस्कृतीचा आदर करणे हे अपेक्षित अन् अंतर्भूत आहे हे प्रकर्षाने लक्षात ठेवले पाहिजे.

कोणीही व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली जन्मभूमी मग तो देश असो राज्य असो की शहर ते सोडण्याचा निर्णय आनंदाने नव्हे तर तात्कालिक परस्थिती नुसार घेत असतो. मग जेंव्हा तुम्ही दूसऱ्या शहरात, राज्यात अथवा देशात जाता तेंव्हा तिथल्या लोकांनी, संस्कृतीने, व्यवस्थेने स्विकारल्या शिवाय तुम्ही तिथं रूजू शकत नाही. जसं आपला जिथे जन्म झाला ती आपली जन्मभूमी आपल्याला प्रिय असते अन् ती असली पाहिजेच तशीच ज्या भूमीने तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम अन् उन्नत केलं त्या कर्मभूमी प्रती केवळ सन्मानच नव्हे तर कृतज्ञता देखील असलीच पाहिजे. जसं महाराष्ट्रातील गुजराती, राजस्थानी किंवा कोणत्याही प्रांतातील नागरिकाने आपापल्या मातृराज्यावर प्रेम केलं पाहिजे तसेच तिथल्या अडिअडचणी वेळी त्यांच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे अन् आपण जिथे राहतो तिथे फूट पाडणाऱ्या विध्वंसक शक्ती विरूद्ध स्थानिक बांधवांच्या हातात हात घालून प्रतिकार देखील केला पाहिजे याचप्रमाणे जे मराठी बांधव गुजरात, राजस्थान किंवा अन्य कोणत्याही राज्य किंवा देशात असतील त्यांनी आपापल्या कर्मभूमी प्रती मनात सन्मान अन् कृतज्ञता ठेवली पाहिजे अन् वेळप्रसंगी तिथल्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुःखात ठामपणे उभं राहिलं पाहिजे अन् हीच ज्ञानेश्वरांची खरी वैश्विकतेची शिकवण आहे अन् त्यासाठीच त्यांनी पसायदान मागितले आहे.

या प्रसंगी एक गोष्ट ती कथा आहे दंतकथा आहे माहीत नाही पण सांगावीशी वाटते एकदा काही पारशी लोक भारतात आश्रयासाठी आले तेंव्हा तिथल्या राजाने त्यांच्या समोर दुध आणि साखर ठेवली नंतर त्या पारशी लोकांच्या नेत्याने त्यातील साखर दुधात टाकून ती विरघळवली अन् त्यातून त्याने संदेश दिला की आम्ही आपल्या संस्कृतीत असेच सामावून जाऊ अन् गोडी देखील वाढवू अन् आज आपण पाहतो आहेच होमी भाभा असो की टाटा त्यांनी केवळ महाराष्ट्रात किंवा देशातच कर्तृत्व घडवलं नव्हे तर संपूर्ण जगात भारताचं नाव उज्ज्वल केले आहे परंतू आमच्यामुळे भारताची प्रगती झाली असले अहंकारी,कृतघ्न अन् कोत्यावृत्तीचे वक्तव्य त्यांनी कधीच केले नाही म्हणूनच केवळ महाराष्ट्रीयन म्हणून नव्हे तर भारतीय म्हणून त्यांचा सार्थ अभिमान आहे.

एक गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे केवळ अन् केवळ सत्तास्वार्थ, शुद्र महत्वकांशेसाठी  जातपात असो की धर्म, भाषा असो की राज्य अस्मिता अशा मुद्द्यांचा वापर करून नेहमीच वैचारिक दहशतवाद पोसला अन् पसरवला जातो अन् शस्त्रावीना केलेला हा दहशतवादी हल्ला माणसाच्या मेंदूचा ताबा घेत त्यालाच त्याच्या नकळत गुलाम बनवत एकमेका विरूद्ध शस्त्र घ्यायला भाग पाडतो. ह्या वैचारिक दहशतवादाला संपवायचे असेल तर जसे सीमेवर लढणारा सैनिक कोणत्याही जातीचा, धर्माचा, राज्याचा म्हणून नव्हे तर एक भारतीय म्हणून दहशतवादी असो की देशाचा शत्रू त्यांच्याशी प्राणपणाने लढतो त्याच भारतीयत्वाची जाण आपल्या विचारांत रूजवली पाहिजे अन् या वैचारिक दहशतवाद्यांशी लढलं पाहिजे.

जय हिन्द , जय महाराष्ट्र.

शनिवार, ४ जून, २०२२

विकृती ची स्वीकृती हीच आजची संस्कृती.....!

 

        खरंच जमाना बदलतोय , खूप फास्ट चाललंय जग , तंत्रज्ञान एवढ्या वेगाने बदलतंय की तो वेग साधनं एव्हढाच आयुष्य जगण्याचा उद्देश राहिलाय का हा प्रश्न सतावतो आहे.

आपण नेहमीच अशाप्रकारच्या चर्चा करत असतो पण माणसाला जोडणारा सोशल मीडिया खरंच आपल्यात सोशल सेन्स निर्माण करतोय का , का तथाकथित समाजप्रिय असणारा माणूस नावाचा प्राणी दुभंगलेल्या मानसिकतेत समाजात वावरताना दिसतोय. तोंडी लावण्यापुरतं प्रबोधन सोडलं तर जो तो तथाकथित आदर्श , दिखाव्याच जगणं सतत मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो अन् ते दिखाव्याचं आयुष्य म्हणजेच आपली प्रतिमा अन् अशा स्वप्रतिमेत स्वत:ला अडकवून खऱ्या जगण्याचा अर्थ अन् उद्देश आपण विसरत चाललो आहोत. 

सध्या इंस्टाग्राम रिल्स किंवा यु ट्यूब शॉर्ट्स वर व्हिडिओजचा जो काही धुमाकूळ चालला आहे तो पाहून जग यापूरतंच मर्यादित आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. अगदी पाड्यापासून वाड्यावस्त्या पर्यंत अन् गल्लीबोळातील झोपड्यांपासुन बंगल्यातील डायनिंग रूम पर्यंत सगळ्यांना एकाच व्यासपीठावर आणून ठेवणारा समानतेचा हा अनोखा उपक्रमच बनला आहे. प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अभाव असणारं स्वातंत्र्य व्यक्त करण्याचं जे व्यसन लागले आहे ते दुसरं तिसरं काही नसून सर्व मर्यादा धुडकावून केवळ आपल्या मनात चाललेला थिल्लर चाळा चव्हाट्यावर मांडण्याचा निर्लज्जपणा आहे अन् अशा भंपक गोष्टींना ट्रेन्डच्या नावाखाली माकडासारखे अंधानुकरण करत व्हायरल करण्यात धन्यता मानणारे हेडलेस क्रिएटीव्ह म्हणजे सगळ्यांवर कळस आहेत. फिटनेसच्या नावाखाली स्किन टाईट कपडे घालून केलेले स्वत:च्या आकार उकाराचं प्रदर्शन असो की खाजगी सेक्स लाईफचं सार्वजनिकरण किंवा चेष्टा मस्करीचा बाजार असो यात दडलेली असते विकृती. मनोरंजनाची व्याख्या बदलल्या मुळे केवळ नवी पिढीच नव्हे तर जूनी जाणती खोडं सद्धा जेव्हा एकांतात बसुन टाईमपास च्या नावाखाली हे सर्व कुतुहला पोटी बघत असतात तेव्हा आपसूकच हे आभासी जग आपल्या मनाचा कळत नकळत ताबा घेते मग अशा विकृती कडे 'चालतंय सगळं' म्हणत या गोष्टींचा आपण सहज स्वीकार करू लागतो. मग सारासार विवेकी विचार बोथट होऊन अशा वातावरणात जगण्याची सवय होते अन् आपसूकच मेंदू अशा विकृतीला स्विकृती देतो अन् बघता बघता ती संस्कृती होते अन् कालांतराने याचं रूपांतर परंपरेत होते. आजकालची लग्न पद्धती असो की काडीमोड ( डिव्होर्स ) याचं उत्तम उदाहरण आहे.

समाधानाने जीवन जगण्यासाठी आयुष्य हे उथळपणे नव्हे तर गांभीर्याने घेतले पाहिजे. तेव्हा आपण स्वत:च यापासून दूर राहून इतरांना तसेच नवीन पीढीला मर्यादेत राहण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे कारण म्हातारी मेल्याचं दु:ख नाही तर काळ सोकावता कामा नये अन्यथा विकृती ची स्वीकृती हीच आजची संस्कृती व्हायला वेळ लागणार नाही. 

शुक्रवार, १३ मे, २०२२

भोंगा...!

 

सध्या भोंगा हा विषय धार्मिक का सामाजिक असा वाद चालू आहे परंतु माझं म्हणाल तर भोंगा हा शब्द सर्वात पहिल्यांदा मी माझ्या लहानपणी माझ्या आईच्या तोंडून ऐकला होता ती त्यावेळी ' भोंगा पसरू नको ' अशी म्हंटली होती. तेव्हा मला लक्षात आलं की विनाकारण मोठ्यानं रडत बसण्याला भोंगा पसरणे असे म्हणतात. अन् म्हणून माझ्यासाठी तसा तो व्यक्तिमत्वाशी संबंधित सार्वजनिक आचरणाचा विषय वाटतो.

हा लहानपणीचा भोंगा एखाद्या व्यक्तीचं लक्ष वेधण्यासाठी होता परंतू हल्लीचा हा तांत्रिक भोंगा एका विशिष्ट व्यक्ती समुहाचे किंवा रस्त्यावरच्या गर्दीचं लक्ष वेधून घेण्यासाठी वापरला जातो. बोलण्याच्या बाबतीत आपला विचार कमी अन् आवाज अधिक तर गाण्याच्या बाबतीत आशय कमी अन् आपली आवड अधिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अथवा लादण्यासाठी याचा वापर सर्रास केला जातो. एखादं लग्न असो की धार्मिक सण , महापुरुषांच्या जयंत्या आपापल्या उत्साहाचा बाजार अन् उन्माद मांडण्याचा थिल्लरपणा जास्त अधोरेखित होतोय ( आता भोंग्यांना देखील लाजवेल असे डीजे आलेत ). या भोंग्यांनी मशिद , मंदिर अशा प्रार्थनास्थळांवर स्थान मिळवून आपापल्या भक्तीला सार्वजनिक स्वरूप दिले आहे. वास्तविक तुमची नमाज असो की आरती असो ही व्यक्तिगत न ठेवता ती अधिकाधिक समुहाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं कारण ईश्वर या संकल्पनेशी एकरूप होण्यासाठी विशिष्ट वेळेची किंवा आवाजाची अथवा समुहाची गरज नसते तर सद्विवेक विचारांच्या अनुसरन्याची आवश्यकता असते.

काही ठिकाणी भोंग्याला कर्णा देखील म्हणतात त्यावरून होणारा आवाज कर्णकर्कशचं अधिक असतो. तो केवळ अमुक एक डेसिबल किंवा तमुक एक डेसिबल असला पाहिजे एवढ्या पुरता मर्यादित न ठेवता, असला पाहिजे की नसला पाहिजे याविषयी ठाम सार्वजनिक नियम ठळकपणे स्पष्ट असले पाहिजेत.

आज मात्र सर्वच राजकारण या विषयाने ढवळून निघाले आहे परंतु केवळ सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही जात, धर्म समुहाचे लांगूलचालन न करता तसेच सार्वजनिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता त्याला प्राधान्यक्रम ठेवून कठोर नियमावली तसेच तेवढ्याच कठोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. सध्या नौटंकी वाचाळवीरांच्या भोंग्याच्या गर्दीत जनता जनार्दनासाठी आत्मचिंतन करायला सायलेंट झोन ची नितांत गरज आहे.